प्रवासात पिण्यासाठी पाण्याची सोबत करणाऱ्या पाण्याच्या बाटलीने पाणीटंचाईच्या या काळात स्वयंपाकघरातील एक कोपरा पटकाविला असून घराला टाळे लावून कामधंद्याच्या निमित्ताने दिवसभर बाहेर जाणाऱ्या तरुण दाम्पत्याने पिण्याच्या पाण्याचे वीस लिटरचे जार आणून ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही मोठय़ा गृहनिर्माण सोसायटींना या जोडप्यांची सोय म्हणून पाण्याचे हे जार सोसायटीच्या कार्यालयात उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे बाटलीबंद पाण्याला मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली असून याचा फायदा भाजी, डाळीच्या किरकोळ विक्रेत्यांप्रमाणे पाणी विक्रेत्यांनी उठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारात ७० रुपयांना मिळणारा २० लिटरचा जार ८० ते ९० रुपयांनी मिळू लागला आहे.
या देशात कधीकाळी पाणीही विकले जाऊ शकते याची खात्री असलेल्या पार्ले समूहाने सर्वप्रथम १९९३ मध्ये बिस्लरी या बाटलीबंद मिनरल पाण्याची विक्री सुरू केली. जगात आज तीन हजारापेक्षा जास्त बाटलीबंद पाण्याचे ब्रॅन्ड असून देशातील ही संख्या १८० पर्यंत आहे. दहा हजार कोटींची आर्थिक उलाढाल असणाऱ्या या ब्रॅन्डमध्ये बिस्लरी, किनली, अ‍ॅक्वाफिना, हिमालय यांसारख्या नामांकित ब्रॅन्डला मोठय़ा प्रमाणात मागणी असून यापूर्वी केवळ प्रवासात एखादी पाण्याची बाटली विकत घेणारे नागरिक आता सर्रासपणे घरात पिण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा वापर करू लागले आहेत. त्यात बहुतांशी शहरी भागात पाणीकपात झाल्याने पाणीपुरवठा मर्यादित वेळेत केला जात आहे. याच वेळेत नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या पती-पत्नींची संख्याही जास्त वाढली असल्याने रात्री उशिरा घरी आल्यानंतर पाण्यावरून तू तू मै मै टाळण्यासाठी निदान बाटलीबंद पाण्याचा आधार घेतला जात आहे. त्यामुळे या पाण्याला मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली असून आठवडय़ासाठी दहा जारांची नोंदणी करणाऱ्या दुकानदारांनी याची मागणी दुप्पट ते तिप्पट नोंदवली आहे. बाटलीबंद पाण्यात १०० मिलिलिटरपासून २० लिटपर्यंत सात प्रकारात पाणी बाटलीबंद केले जात आहे. यात घरासाठी २० लिटरच्या जारांना जास्त मागणी असल्याचे किरकोळ व्यापारी महेशभाई पटेल यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तीव्र पाणीटंचाईमुळे मागणी तिपटीने वाढली आहे. बिस्लरीची पाण्यातील उलाढाल ६० टक्के आहे. दुष्काळ काळात ही मागणी नेहमीपेक्षा दुप्पट होत आहे. बाजारात ब्रॅन्ड आणि स्थानिक जारबंद पाण्याची किंमत दुकानदार एकच ठेवत असतात. त्यामुळे ग्राहक ब्रॅन्ड घेणे सोयीस्कर समजतो. उत्पादक आणि विक्रेते यांच्या साखळीत कमविणारे हे दुकानदार आहेत. २० लिटरचा एक जार आमच्याकडून केवळ १५ रुपयात भरून घेतला जातो, पण तो बाजारात ७० ते ८० रुपयांनी विकला जात आहे. यात नफा वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांचा आहे. ग्राहकांनी स्थानिक पाणी विकत घेण्यास प्राधान्य देणे काहीच हरकत नाही.
-संजय भैसाने, अ‍ॅक्टोप्लस, भागीदार, नवी मुंबई</strong>

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Booming bottled water market