नवी मुंबई: डिजिटल अटक दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या तीन जणांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यात अजून अनेक संशयित आरोपींचा सहभाग असून त्यांचा शोध सुरु आहे. या संशयित आरोपींच्या विरोधात सायबर गुन्हेगारी व्यतिरिक्त संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कलम लावण्यात आले आहे. हे संशयित आरोपी बनावट आंतरराष्ट्रीय  कॉल सेंटर चालवत होते. देशभरात त्यांच्याविरुद्ध ७३ ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. गुन्ह्याचा तपास सुरू असून, आणखी बळी समोर येण्याची शक्यता आहे.

रमेश बाबुलाल शेट (पटवा), (वय ४५ वर्षे,) अमिश दिपक तुलशीदास शाह, (वय ४२ वर्षे,) दोघेही मुंबईत राहत असून राजकुमार गेलाराम नारंग,( वय ५५ वर्षे) हा  अहमदाबाद, गुजरात येथे राहणारा आहे. हि अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. 

नवी मुंबई येथे डॉक्टर/प्रोफेसर म्हणुन नोकरी करणाऱ्या एका महिलेची तब्बल १ कोटी ८१ लाख ७२ हजार ६६७ रुपयांची फसवणूक १४ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान या त्रिकुटाने अन्य साथीदारांच्या मदतीने केली होती. संशयितांनी  व्हॉट्सअप अॅपवरून संपर्क करून, स्वतः आयकर विभागाचे असल्याचे भासवून नवी दिल्लीतील वाजीपूर मधील ग्लोबल ट्रेडिंग कंपनीचा  ८ लाख ६२ हजार २३० रुपयांचा कर देणे बाकी असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असल्याची  थाप मारली होती. यावर विश्वास बसावा म्हणून  सीबीआय, सक्त वसुली संचानालय सर्वोच्च न्यायालय, यांचे बनावट लेटर हेड वर नोटीस वजा मजकूर पाठवण्यात आला होता. ज्यात मालमत्ता चौकशी केली जाणार असून तो पर्यंत डिजिटल अटक करण्यात आले आहे. असे सांगण्यात आले होते.

तसेच फिर्यादी यांना सर्व खात्यातील रक्कम सट्टा बाजारात केलेल्या गुंतवणुकीचा तपशील पाठवण्यास सांगण्यात आले. बँकेतील पैसे पाठवण्यासाठी त्यांनी दिलेल्या विविध खात्यात फिर्यादी यांनी १कोटी ८१ लाख ७२ हजार ६६७ रुपये पाठवले होते. चौकशी झाल्यावर हि रक्कम पुन्हा तुमच्या खात्यात जमा होईल असे सांगण्यात आले. मात्र अनेक महिने होऊनही पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. 

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे देत सहाय्यक आयुक्त अजयकुमार लांडगे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, सचिन कोकरे,  सतिश भोसले, हवालदार  मंगेश वाट, नितीन जगताप, अनिल यादव, शशिकांत शेंडगे,महेश पाटील,  संजय राणे, पोलीस नाईक आदींचे पथक नेमले. तांत्रिक तपास केल्यावर फिर्यादी यांनी ज्या तीन बँक खात्यात पैसे टाकले ते तीन खाती मुंबईतील बँकेत असल्याने बँक खातेदार असलेल्या संशयितांना अटक केली.  अशी माहिती पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी दिली. 

‘संघटीत गुन्हेगारी टोळी

सायबर गुन्ह्यात पहिल्यांदाच संशयित आरोपींच्या विरोधात संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कलम लावण्यात आले आहे. संशयितांनी गळा भाड्याने घेत भूमी क्रिएशन नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या नावाने विविध बँकेत आंतरराष्ट्रीय सेवा असणारे चालू खाते मुंबई, जम्मू काश्मीर हैदराबाद, मणिपूर, अशा विविध ठिकाणी उघडले होते. त्यात क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड हे दुबई येथील हस्तकाकडे पाठवण्यात आले होते. ज्यांची फसवणूक करण्यात आली त्यांचे पैसे विविध देशातून काढले जात होते. संशयित यांची मोठी टोळी असून देश विदेशात कॉल सेक्टर स्थापन करून त्यातून फोन द्वारे सावज हेरले जात होते. या संशयितांची सखोल चौकशी केली असता राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टल वर त्यांच्या विरोधात ७३ तक्रारी आढळून आल्या आहेत. भूमी क्रिएशन प्रमाणेच अनेक बनावट कंपनी त्यांनी स्थापन केल्याचा संशय पोलिसांना आहे. 

संशयित आरोपींच्या कडून ११ लाख ३५ हजार रुपये जप्त केले असून ते फिर्यादी यांना देण्यात आले आहेत. आरोपींच्या कडून एक  लॅपटॉप,  १८- मोबाईल ,  १८विविध  बँकांचे चेकबुक, ३२-विविध बँकांचे डेबिट कार्डस,  ३३-विविध बँकांचे धनादेश ,  २७-  सिमकार्ड्स, २-विविध बँकांचे पासबुक,   १०- बोगस कंपन्याचे ०८ रबरी शिक्के, १० बनावट  कंपन्यांची ३६ बैंक खाते उघडल्याची कागदपत्रे जप्त करण्यात आले आहे