पालघर : सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुती झाल्यानंतर बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे पालघर ग्रामीण रुग्णालयात आणल्यावर त्याला त्वरित विरार येथील रुग्णालयात हलविण्यात सांगितले. या प्रसंगात विरार जलसार रोरो सेवेचा उपयोग झाला असून यामुळे पालघर ते विरार करिता लागणारा दीड ते दोन तासाचा प्रवास 30 मिनिटात पूर्ण झाल्याने बाळाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून मागील महिन्यात विरार ते जलसार दरम्यान रो-रो सेवा सुरू करण्यात आली. त्याचा प्रवाशांना चांगला फायदा होत असून मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होत आहे. 13 मे रोजी सफाळे गावातील विराथनखुर्द येथे राहणारी अस्मिता जाधव ही महिला रात्री सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल झाली. तिने एका बाळाला जन्म दिला. मात्र थोड्याच वेळात त्या बाळाला श्वास घेण्यास त्रास सुरू झाला.

सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आधुनिक उपचार यंत्रणा नसल्याने त्याला पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तेथे देखील उपचार यंत्रणा उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी विरार येथे नेण्याचा सल्ला दिला. लवकरात लवकर मोठ्या रुग्णालयात नेणे आवश्यक असल्याने त्याच्या पालकांनी जलसार येथील उपसरपंच विकोश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधून विरार येथे जाण्यासाठी जलसार ते विरार रोरोसेवा उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

रात्री साडेदहाच्या सुमारास जेट्टी व्यवस्थापनाला संपर्क साधून संबंधित परिस्थिती सांगितली. त्यावेळी शेवटची फेरी करून जेटी ही विरार बाजूला गेली होती. मात्र बाळाच्या तब्येतीच्या गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन जेटी व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांनी जेटी जलसार येथे आणण्याची व्यवस्था केली. यादरम्यान रुग्णवाहिकेमध्ये बालकाला घेऊन पालघर ते जलसार असा वीस मिनिटांचा प्रवास करण्यात आला. याच दरम्यान जेटी जलसार किनाऱ्याला पोहोचल्यामुळे त्वरित रुग्णवाहिकेला रोरो मध्ये टाकून आठ ते दहा मिनिटात विरारकडे पोहोचविण्यात आले.

त्यानंतर रुग्णवाहिका विरारच्या रुग्णालयात दाखल झाली. तेथे बालकावर उपचार केल्यानंतर त्याला मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले. बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून बाळाची प्रकृती आता सुधारली आहे. रोरो सेवा फायद्याची ठरली असून यामुळे एका बाळाचा प्राण वाचल्याने या भागातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.