-
छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती ही मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहेच. पण आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे आणि जागतिक दर्जाचे योद्धे म्हणूनही शिवरायांची ओळख आहे. यातील आणखी एक विशेष म्हणजे शिवाजी महाराज ज्यांच्याशी लढले त्यांनीही महाराजांचे श्रेष्ठत्व मान्य केले होते. त्यांच्यातील नेता, धुरंधर सेनानी, जाणता राजा ही आणि अशा असंख्य गुणांची ओळख समाजाला पदोपदी होत होती. महाराजांचा काळ लोटून इतकी वर्षं झाली तरीही त्यांचे इतिहासातील स्थान आणि मान याला जराही धक्का लागू शकत नाही. त्यांच्याबाबत जागतिक स्तरावर बोलल्या जाणाऱ्या गोष्टी भारतीयांसाठी खऱ्या अर्थाने अभिमानास्पद आहेत. आज शिवजयंतीनिमित्त महाराजांविषयी मान्यवरांनी काढलेले उद्गार काय होते पाहूया…
-
रॉबर्ट ओर्मी (Orme) हा ब्रिटिश इतिहास अभ्यासक म्हणतो- शिवाजी महाराजांकडे एका यशस्वी सेनापतीचे सर्व गुण होते. सैन्याचा प्रमुख म्हणून त्यांनी जितके जमिनीवर जितके अंतर पार केले तितके दुसर्या कुठल्याही सेनापतीने केले नसेल. आणीबाणीचा प्रसंग कितीही आकस्मिक अथवा मोठा असला तरीही शिवाजी राजांनी त्याचा विवेकाने व धैर्याने यशस्वीपणे सामना केला.
-
जॉन सर्विलन हा अमेरिकन लढवय्या म्हणतो- ज्या काळात शिवाजी महाराज रहात होते त्या काळात सफल होण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक गुण त्यांच्यामधे होता. ते सतर्क होते आणि त्यांची कृती प्रखर व धाडसी असे. त्यांच्यातील सहनशीलता, उर्जा आणि निर्णयक्षमतेमुळे कुठल्याही काळात त्यांच्याकडून गौरवास्पद कार्य झाले असते. तो एक हिंदु राजा होता ज्याने आपल्या देशी घोड्यांच्या सहाय्याने प्रचंड मुघल घोडदळाला पाणी पाजले. त्यांचे मावळे गनिमी काव्यामुळे त्याकाळातले जगातील सर्वात चांगले पायदळ होते.
-
जे स्वॉट म्हणतात- शिवाजी राजे एक योध्दा म्हणून असामान्य होते,राज्यकर्ता म्हणून निपुण होते तर सद्गुणी लोकांचे मित्र होते. त्यांनी हुशारीने आपली धोरणे आखली तर दृढतेने ती अमलात आणली. कोणीही कधीही त्यांच्या ध्येयाबद्दल अवगत नसे तर प्रत्येक जण त्या ध्येयाच्या पुर्तीबद्दल अवगत असे.
-
जेम्स डग्लस हा ब्रिटिश प्रवाशी म्हणतो- कुठल्याही आणीबाणीच्या समयाच्या वेळी सजग राहून शिवरायांनी त्याला तोंड दिले. महाराजांनी आपल्या जादुई स्पर्षाने आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने त्यांच्या गरीब,आज्ञाधारक,दैववादी महाराष्ट्रातील जनतेला अलौकीक कृत्ये करण्यास प्रेरीत केले. ही जनता सर्वोत्तम सैनिक,पक्के सरदार, कुशल राजनितीने विशारद झाली जिने शेकडो युध्दे जिंकलेल्या मुघलांचा सामना केला.
-
डॉ. जॉन एफ. जी. कार्अरी ( सन १६९५ ) म्हणतात- हे शिवाजी राजे इतके बलाढ्य आहेत की ते एकाच वेळी प्रचंड मुघलांबरोबरही लढतात आणि पोर्तुगिजांबरोबरही लढतात. ते रणांगणावर ५०००० घोडे आणतात आणि त्याहुनही जास्त पायदळ आणतात. त्यांचे सैनिक मुघलांपेक्षा कितीतरी चांगले आहेत. हे सैनिक अतिशय थोड्या अन्नावर दिवस काढतात तर मुघल बायका, विविध साधनसामग्री, तंबू घेऊन जातात जणू काही ते एक चालत फिरत शहरच असते.
-
अॅबी कॅरी हा १६७२ ते १६७४ दरम्यान भारत भ्रमंतीवर आलेला प्रवाशी आपल्या नोंदीमध्ये म्हणतो- शिवाजी राजे पुर्वेने पाहिलेल्या सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक आहेत. त्यांच्या धाडसीपणामुळे ,त्यांच्या युध्दातील चपळाईमुळे व इतर गुणांमुळे त्यांची तुलना स्विडनच्या महान राजा ऍडॉल्फसशी होउ शकते. त्यांच्या जलद गतीने आणि दयाशीलतेने ज्युलियस सीझरप्रमाणे त्यांनी त्यांच्या शत्रूंचीही मने जिंकली.
-
जेम्स डग्लस या ब्रिटीश इतिहासतज्ज्ञाने रायगडाला भेट दिल्यानंतर तो म्हणतो- हा किल्ल्यांमधला माणुस होता ज्याचा जन्मही किल्ल्यामधे झाला होता.किल्ल्यांनी त्याला बनवल आणि त्यांनी किल्ल्यांना बनवल. हे किल्ले म्हणजे भारताची दहशत होती,शिवरायांच्या राज्याचे उगमस्थळ होते, त्यांच्या युध्दांचा आधार होते, त्यांच्या ध्येयांच्या पायर्या होते, त्यांचे घर आणि आनंद होते. त्यांनी अनेक किल्ले बांधले आणि सर्व किल्ले त्यांनी बळकट केले. ही फारच कृपेची गोष्ट होती की शिवाजी राजे दर्यावर्दी नव्हते. नाहीतर जमिनीप्रमाणे समुद्रावरही त्यांनी वर्चस्व गाजवले असते.
-
एल्फिस्टन हे शिवाजी महाराजांबद्दल बोलताना म्हणतात- शिवाजी राजांसारखा प्रतिभासंपन्नच औरंगजेबाच्या चुकांचा फायदा उठवू शकतो. त्यानंतर धर्मासाठी प्रेरीत करु शकतो व यातून मराठ्यांमधे राष्ट्राभिमान जागृत करु शकतो.या भावनांमुळे त्यांचे साम्राज्य अशक्त हातांमधे गेल्यानंतरही तग धरुन होते आणि अनेक अंतर्गत समस्या असूनही भारताच्या एका मोठ्या भागावर त्याने नंतर प्रभुत्व निर्माण केले.
-
सिडनी जे. ओवेन हा लेखक म्हणतो- वीरता, देशाभिमान, धर्माभिमानाची प्रभावळ त्यांच्या(जनतेच्या) कार्यवाहीत होती, ज्यातून ते प्रेरीत झाले. त्यामुळे शहाजी राजांच्या पुत्रास ते पुर्वनिश्चित, दैविक कृपापात्र मुक्तिदाता मानत होते.
-
१७ व्या शतकात युरोप खंडात “लंडन गॅझेट” नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला होता.
-
शिवजयंतीनिमित्त महाराजांना विनम्र अभिवादन…
शिवजयंती विशेष: जय शिवराय! जगभरातील संशोधक आणि तज्ज्ञ शिवरायांच्या कार्याने प्रभावित, म्हणतात…
महाराज ज्यांच्याशी लढले त्यांनीही महाराजांचे श्रेष्ठत्व मान्य केले
Web Title: Shivjayanti 2020 what foreigners think about chhatrapati shivaji maharaj scsg