अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस गुलाम अहमद मीर हे जम्मू-काश्मीरमधील काँग्रेस विधिमंडळाचे नेतेदेखील आहेत. या खोऱ्यातील डोरू या मतदारसंघाचे ते नेतृत्व करतात. तीन वेळा आमदार असलेल्या मीर यांनी जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. दि इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत, मीर यांनी पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी विविध मुद्द्यांवरही भाष्य केले आहे.

प्रश्न- पहलगाम हल्ल्याला ४८ तास उलटून गेलेत. काश्मीरमधील एक वरिष्ठ नेता म्हणून यावर तुमचं मत काय आहे?
सर्वात आधी हा हल्ला एका अनपेक्षित ठिकाणी आणि अनपेक्षित पद्धतीने झाला आहे. हा पर्यटन हंगामाचा शिखर होता आणि स्थानिक लोक याबाबत खूप तयारी करतात आणि आनंदीही असतात. इथे सरकारी नोकऱ्या नसल्याने हा पर्यटनाचा व्यवसाय महत्त्वाचा असतो आणि इथल्या जनतेच्या कमाईचा तो मुख्य स्त्रोत आहे. जोपर्यंत या दहशतवादी घटकांना स्थानिकांचा पाठिंबा मिळत नाही, तोपर्यंत अशा घटना घडत नाहीत. जनता अशा घटकांना किंवा कृत्यांना पाठिंबा देत नाही. पहलगाममध्ये अशी घटना घडेल याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. अनेक पर्यटन स्थळं आहेत आणि काही अत्यंत संवेदनशील भागातही आहेत. मात्र, पहलगाम हे सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित आहे. कारण ते अमरनाथ यात्रेच्या मार्गावर आहे. यात्रेदरम्यान तीन महिने इथे त्रिस्तरीय सुरक्षा तैनात असते. लोकांना कायम वाटायचं की इथे कडक सुरक्षा तपासणी आहे.

प्रश्न- हल्ल्याच्या वेळी पहलगाममध्ये सुरक्षेची कमतरता होती का?
पर्यटकांनी सांगितले की यावेळी पहलगाममध्ये सुरक्षा तपासणी नव्हती. बैसरन इथे कोणतीही सुरक्षा नव्हती. जम्मू-काश्मीर पोलीस किंवा इतर सुरक्षा रक्षक गणवेशात तिथे असते तर दहशतवाद्यांना काही आव्हानांना तोंड द्यावं लागलं असतं. पूर्वी तिथे सीआरपीएफऐवजी सैन्याची गस्त असायची आणि जम्मू-काश्मीर पोलीसही असायचे.

प्रश्न- भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार याला जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं का?
मी हेच म्हणतोय की हा जनतेला पडलेला प्रश्न आहे, मला नाही. बहुतेक लोक हाच प्रश्न उपस्थित करत आहेत आणि एक पक्ष म्हणून आम्हीही तेच करत आहोत. हे का घडले? हे ठिकाण जिथपर्यंत वाहनं जातात त्या शेवटच्या ठिकाणापासून सात किलोमीटर उंचावर आहे. दररोज हजारो लोक तिथे जातात. काही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लक्ष ठेवले पाहिजे अशी एक सामान्य भावना आहे.

प्रश्न- तुम्ही गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षेतील अपयश असा आरोप का करत आहात?
सामान्य लोकांच्या मनात हेच आहे. हे कुठेतरी गुप्तचर यंत्रणा आणि इतक्या महत्त्वाच्या क्षेत्राच्या सुरक्षेबाबतचे अपयशच आहे.

प्रश्न- तुम्ही नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीर सरकारमधील सहयोगी आणि माजी पर्यटन मंत्री आहात. पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटकांचा विश्वास गमावल्याचं संकट कसं दूर होईल?
जगात अनेक जण काश्मीरप्रेमी आहेत. असे हल्ले याआधीही संघटित पद्धतीने केले गेले आहेत. मात्र, काश्मीरप्रेमींना काश्मीरमध्ये जे दिसते ते इतर कुठेही दिसत नाही. पर्यटकांना काश्मीर आवडते आणि काश्मिरी लोक त्यांच्यावर प्रेम करतात. तेव्हा काश्मीरमधील पर्यटन हे कोणाच्या प्रसिद्धीमुळे नाही. मी खात्रीने सांगू शकतो की अशा कृत्यांना काश्मीरमधील कोणीही समर्थन देत नाही. मग ते कोणत्याही वयोगटातील असोत.

प्रश्न- पाकिस्तानविरूद्धच्या राजनैतिक प्रत्युत्तराचा एक भाग म्हणून सरकारने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. याबाबत तुमचे काय विचार आहेत?
सरकारकडून काहीतरी पाऊल अपेक्षित होतेच. पण या पावलांमुळे शांतता आणि सौहार्द प्रस्थापित होईल का? प्रत्येकाला दहशतवादापासून मुक्ती हवी आहे. सर्वांना शांती आणि आनंद हवा आहे. हे पाऊल त्या दिशेने आहे का आणि ते मदत करेल का? पुढच्या टप्प्यावर काय होईल?

प्रश्न- गुरूवारी झालेल्या सीडब्ल्यूसीच्या ठरावात भाजपावर हल्ला करण्यात आला आहे. ज्यावेळी एकता सर्वात जास्त आवश्यक आहे, अशावेळी मतभेद, अविश्वास, ध्रुवीकरण आणि फूट पाडण्यासाठी अधिकृत आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अशा गंभीर घटनांचा फायदा घेतला गेला. त्याबद्दल तुम्ही काय म्हणता?
तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की हाती बंदूक असलेल्याचे एक लक्ष्य आणि अजेंडा असतो. जर एक राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून तुम्ही त्यांचा अजेंडा पुढे नेत असाल तर तुम्ही त्यांच्या कार्याला मदत करत आहात.

दरम्यान, पहलगाममध्ये झालेला हल्ला हा सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेचं सर्वात मोठं अपयश असल्याचं विरोधकांनी नमूद केलं आहे. विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण आणि गुप्तचर यंत्रणेतील त्रुटींवरून सरकारसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. शिवाय २० एप्रिलपासून हे ठिकाण कुठल्याही सुरक्षेशिवाय पर्यटकांसाठी खुलं झालं होतं. तेव्हा पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न इथे उद्भवला आहेच. एकंदर, या हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरचे पर्यटन आणि इथले स्थानिक यांना सर्वात मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.