ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत याच वर्षी सप्टेंबर महिन्यात नव्या पक्षाची स्थापना केली. त्यांनी आपल्या पक्षाला ‘डेमोक्रॅटिक आझाद पार्टी (DAP)’ असे नाव दिले आहे. नव्या पक्षाची स्थापना केल्यानंतर सध्या ते जम्मू-काश्मीरमधील आपला जनाधार वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे असतानाच अवघ्या काही महिन्यांच्या त्यांच्या पक्षाला मोठे धक्के बसले आहे. पक्षातील काही बड्या नेत्यांची हकालपट्टी केल्यानंतर गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाला गळती लागली आहे. पक्ष नावारुपाला येण्यापूर्वीच अनेक नेते आझाद यांची साथ सोडत आहेत. याच कारणामुळे आझाद यांचा पक्ष जम्मू-काश्मीरमधील काही प्रांतापुरताच सिमीत राहतो की काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> बिहारमध्ये होणार जातीनिहाय जनगणना! आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नितीशकुमारांचा निर्णय

आझाद यांच्या डीएपी या पक्षाला निवडणूक आयोगाकडून अद्याप पक्ष म्हणून मान्यता मिळालेली नाही. असे असतानाच त्यांच्या पक्षात गळती सुरू झाली आहे. एकीकडे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होणार आहे. त्याआधी आझाद यांना आपली राजकीय ताकद दाखवावी लागणार आहे. असे असतानाच पक्षाला लागलेली गळती त्यांच्यासाठी धोकादायक बाब असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा >>> ओबीसींच्या मुद्द्यावर योगी आदित्यनाथ यांना धक्का; नितीशकुमार यांची आघाडी

डिसेंबर महिन्यातील २२ तारखेला आझाद यांनी आपल्या पक्षातून काही नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतरच त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी राजीनामा दिला आहे. आझाद यांनी २२ डिसेंबर रोजी माजी उपमुख्यमंत्री ताराचंद, माजी मंत्री मनोहरलाल शर्मा तसेच माजी आमदार बलवान सिंग यांची हकालपट्टी केली होती. आझाद यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर हेच नेते त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. मात्र आता त्यांना आझाद यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या महत्त्वाच्या तीन नेत्यांच्या हकालपट्टीमुळे आझाद यांचा पक्ष फक्त चिनाब खोऱ्यापर्यंतच सिमित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या चिनाब खोऱ्यातील जीएम असुरी आणि अब्दुल माजीद हे नेते आझाद यांच्या पक्षात आहेत.

हेही वाचा >>> फक्त शिंदे गटाचेच मंत्री वादग्रस्त कसे ?

आझाद यांनी महत्त्वाच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आतापर्यंत १२६ महत्त्वाच्या लोकांनी त्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामध्ये जम्मू आणि काश्मीर कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष एम के भारद्वाज, डीएपी जिल्हाअध्यक्ष विनोद शर्मा यांनीदेखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या नेत्यांनी हकालपट्टी केलेल्या तीन नेत्यांना पाठिंबा दर्शवला आहे. भारद्वाज आणि विनोद शर्मा हे आझाद यांचे विश्वासू मानले जायचे.

हेही वाचा >>> “वाजपेयींच्या काळात भारताने प्रचंड प्रगती केली”, नितीश कुमारांकडून स्तुतीसुमने

दरम्यान, ताराचंद, मनोहरलाला शर्मा आणि बलवान सिंग यांची हकालपट्टी केल्यामुळे आझाद पक्षात हुकुमशाही चावलत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. या नेत्यांना कोणताही पूर्वसूचना किंवा नोटीस न देताच पक्षातून बाहेर काढण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. याच कारणामुळे आगामी काळातही आझाद यांच्या डीएपी पक्षाला गळती लाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leaders leaving ghulam nabi azad dap party what is reason know detail information prd