पर्यटकांची जास्त गर्दी असणारा डॅम म्हणजे भुशी डॅम. लोणावळ्यातल्या भुशी डॅमवर पर्यटकांची पावसाळ्यात कायमच गर्दी होत असते. मात्र दुपारी ३ वाजल्यापासून या धरणाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. दर शनिवार रविवार हा रस्ता बंद राहणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी दिली.सेल्फी,फोटो,भाजलेले मक्याचे कणीस आणि वाफाळलेला चहा हे भुशी डॅमचे मुख्य आकर्षण मात्र आजपासून दर शनिवार आणि रविवार

भुशी डॅम कडे जाणारा मार्ग,राईवूड चौक हा बंद असणार असून ३ वाजता,चालत जाऊ शकता.भुशी डॅम ५ वाजता बंद राहणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी दिली आहे. शनिवार आणि रविवार असला की लोणावळ्यातून भुशी धरणाकडे जाणाऱ्या मुख्य चौकात वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे आज पासून दुपारी तीन च्या सुमारास भुशी धरणाकडे जाणारा मार्ग हा राईवूड चौक येथे बंद करण्यात आला आहे.हा नियम केवळ शनिवार आणि रविवारसाठी असणार आहे.

आज शनिवार असल्याने सकाळ पासूनच लोणावळ्यातील भुशी धरणाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.त्यामुळे लोणावळा शहरातील काही भागात वाहतूक कोंडी झाली होती.शनिवार आणि रविवार सलग सुट्ट्यांचे दिवस असल्याने पर्यटक हे लोणावळ्याच्या दिशेने वळतात.अबाल वृद्धासह तरुण हे भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेत होते.

लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, घुबड तलाव या ठिकाणी येतात,मात्र तरुण तरुणी असल्याने छेडछाडीच्या घटना घटतात तसेच मद्यपान करण्याचे प्रकार सर्रास चालतात.काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भुशी धरण येथे १५ पोलीस कर्मचारी ठिय्या मांडून असतात.शनिवार असल्याने दुपारी तीनच्या नंतर भुशी धरणाकडे जाणार मार्ग लोणावळा पोलिसांनी बंद केला,या निर्णय केवळ शनिवार आणि रविवारसाठी लागू असणार आहे.चालत जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा मार्ग खुला असेल.अशी माहिती लोणावळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली आहे.

लोणावळ्यामधून भुशी धरण हे अडीच किलोमीटर आहे,रस्त्या अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होते.तरुण तरुणी या मौज मजा करण्यासाठी आले असल्याने डोंगरावर फिरण्यासाठी जातात.फोटो,सेल्फी यामधून अपघात होण्याची शक्यता असते यासाठी पर्यटकांनी अश्या ठिकाणी जाण्याचे शक्यतो टाळावे.

भुशी धरण येथे भाजलेले मक्याचे कणीस,वडापाव,गरमागरम भजी,वाफाळलेला चहा याच्यावर पर्यटक ताव मारतात. भाजलेले मक्याच्या कणसाचा व्यवसाय जास्त चालतो. मुंबई आणि पुण्याहून आलेले पर्यटक हे भाजलेल्या कणसावर ताव मरतात. मात्र आता दर शनिवार रविवार या धरणाकडे जाणारा रस्ता बंद राहणार आहे.