पुणे : दहशतवाद्यांना प्रशिक्षण, वित्तपुरवठा, आश्रय अशा कोणत्याही स्वरूपात थारा दिल्यास सीमारेषेत घुसून दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा स्पष्ट इशारा भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या स्थितीमध्ये चीन हस्तक्षेप करणार नाही, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला.

‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’तर्फे (पीआयसी) आयोजित ‘पहलगामच्या पलीकडे : भारत-पाकिस्तान तणाव व सामरिक परिणाम’ या विषयावर तज्ज्ञांशी संवाद साधण्यात आला. माजी राजदूत गौतम बंबावाले, लेफ्टनंट जनरल (नि.) विनायक पाटणकर, एअर मार्शल (नि.) दीप्तेंदू चौधरी, कर्नल (नि.) विनायक भट, नौदलाचे कॅप्टन (नि.) डी. के. शर्मा यांच्याशी ‘पीआयसी’चे संचालक मेजर जनरल नितीन गडकरी यांनी संवाद साधला.

पाकव्याप्त काश्मीरमधील बहावलपूर, मुरीदके अशा ठिकाणची उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्रे दाखवून सर्व ठिकाणचे दहशतवादी तळ अचूक हल्ले करून उद्ध्वस्त केल्याचे कर्नल भट यांनी सांगितले. ‘पाकिस्तानने शस्त्रसंधी पूर्णपणे उल्लंघन केले आहे. भारतीय लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. भारताची भूमिका आता प्रतिक्रियावादी राहिलेली नाही. चीन पाकिस्तानचा प्यादे म्हणून वापर करून घेत राहील. भारत-पाकिस्तानच्या सद्य:स्थितीमध्ये चीन हस्तक्षेप करणार नाही, असे पाटणकर यांनी नमूद केले.

‘युद्धाचे स्वरूप आता संघर्षात बदलले आहे. रशिया-युक्रेन, इस्रायल-पॅलेस्टाइनप्रमाणेच हा संघर्ष चिघळला आहे. पाकिस्तानच्या कुरापतींना भारत संयत उत्तर देत आहे,’ असे चौधरी यांनी सांगितले. ‘पाकिस्तान भारताच्या नागरी भागात हल्ले करण्याची चूक करत आहे. त्यांच्या नौदलांच्या हालचालीवर भारतीय नौदलाचे बारकाईने लक्ष असून, बॉम्बे हाय, गुजरात रिफायनरीसारख्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे,’ असे डी. के. शर्मा यांनी सांगितले.

माहिती तपासून घेणे आवश्यक

सध्याची स्थिती युद्धजन्य असल्याचे बंबावले यांनी नमूद केले. सैन्यदले युद्धजन्य परिस्थिती योग्य प्रकारे हाताळत असून, माहितीच्या युद्धाच्या काळात समाजमाध्यमे आणि दूरचित्रवाणीवरील माहिती तपासून घेतली पाहिजे. केंद्र सरकार देत असलेली अधिकृत माहिती घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.