एका आयटी कंपनीत नोकरी असल्याची जाहिरात येते. ही जाहिरात असते ‘वॉक-इन’ म्हणजेच थेट मुलाखतीची. मुलाखतीच्या दिवशी हजारो उच्चशिक्षित तरुण नोकरीच्या आशेने कंपनीसमोर जमतात. उन्हातान्हात रस्त्याच्या कडेला रांग लावून उभ्या राहिलेल्या या आयटीतील भावी उमेदवारांकडे जाणारे-येणारे एकतर तुच्छतेने पाहतात, नाहीतर त्यांची कीव करतात. उच्च शिक्षित असूनही नोकरीसाठी अशा प्रकारे दिवसभर रस्त्यावर उभे राहण्याची शिक्षा या तरुणांना भोगावी लागते. अनेक बघे त्यांचे व्हिडीओ काढून समाजमाध्यमावर टाकतात. त्यातून या प्रकाराची सर्वत्र चर्चा होते. कालांतराने ही चर्चा थंड होते. पुन्हा काही काळाने दुसऱ्या एखाद्या कंपनीतील मुलाखतीसाठी लागलेल्या रांगेचे व्हिडीओ समाजमाध्यमावर पसरतात. हे चक्र असेच सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयटी क्षेत्रातील अनेकांनी अशा प्रकारच्या मुलाखती नेहमीचाच प्रकार असल्याचा मुद्दा मांडला आहे. हा प्रकार नेहमीचाच असला तरी बेरोजगार उमेदवारांना किमान मूलभूत सुविधा पुरविण्याची काळजीही कंपन्या घेत नाहीत. कंपनीच्या बाहेर दिवसभर उभे राहणाऱ्या मुलांना बसण्याची आणि सावलीची सुविधाही कोणी उपलब्ध करून देत नाही. एवढेच काय तर त्यांना स्वच्छतागृहाची सुविधाही मिळत नाही. अशा प्रकारची अमानवी वागणूक रोजंदारी मजुरांनाही मिळत नाही. शहरात काही ठिकाणी मजूर अड्डे आहेत. तिथे सकाळच्या वेळी ठेकेदार येऊन त्या मजुरांना कामासाठी घेऊन जातात. या मजूर अड्ड्यांच्या ठिकाणी किमान बसण्याची व्यवस्था असते आणि त्यांना तिथे थोडाच वेळ ठेकेदाराची प्रतीक्षा करावी लागते. आयटीतील नोकरीसाठी अपेक्षेने आलेल्या उमेदवारांना एवढ्या साध्या सुविधाही कंपन्या देऊ शकत नाहीत.

एखादा व्यक्ती कंपनीत प्रत्यक्ष सेवेत रुजू झाल्यानंतर तो कामगार ठरतो, अशी कामगार विभागाची व्याख्या आहे. त्यामुळे उमेदवारांच्या मुलाखती या आपल्या कार्यकक्षेत येत नसल्याचा कामगार विभागाचा मुद्दा आहे. यामुळे या मुलाखतीला आलेल्या तरुणांना किमान सुविधा देण्याबाबत काहीच ठोस उत्तर मिळत नाही. काही मोठ्या कंपन्यांची कार्यालये मोठी असल्याने त्या सर्व उमेदवारांना त्यांच्या आवारात प्रवेश देऊन त्यांची व्यवस्था करतात. छोट्या कंपन्यांची कार्यालये छोटी असल्याने त्यांना हे शक्य होत नाही. अशावेळी एकाच दिवशी मुलाखतीला बोलाविण्याऐवजी ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब करून टप्प्याटप्प्याने उमेदवारांना बोलाविता येऊ शकते. परंतु, आयटी क्षेत्रातील कंपन्याच या ऑनलाइन प्रक्रियेला टाळत असल्याचे चित्र आहे.

रोजगाराच्या संधी कमी

आयटी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी कमी झाल्याकडे ‘फोरम ऑफ आयटी एम्प्लॉईज’चे अध्यक्ष पवनजीत माने यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, सध्या आयटी क्षेत्रातील रोजगार भरती कमी झाली आहे. एका बाजूला महाविद्यालयांतून कुशल मनुष्यबळ बाहेर पडत असताना दुसऱ्या बाजूला नोकऱ्या नाहीत, अशी स्थिती आहे. यामुळे मुलाखतींसाठी हजारो तरुणांची गर्दी होते. यावेळी कंपन्यांनी योग्य पद्धतीने नियोजन करून उमेदवारांना किमान सुविधा द्यायला हव्यात.

sanjay.jadhav@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It company jobs educated youth video employment pune print news stj 05 ssb