पुणे : शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील चार दिवसापासून शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे.यामुळे राज्यामधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचं दावा केला असून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील येरवडा येथील श्रीराम मंदिरात शिवसेना उपशहर प्रमुख आनंद गोयल यांनी आमच्या मातोश्रीवरच्या विठ्ठलावर जे षडयंत्र केले आहे. त्या षडयंत्रावर मात करण्याची ताकद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना मिळो ताकद, यासाठी येरवडा येथील श्री राम मंदिर येथील महाआरतीचे आयोजन केले होते.यावेळी येरवडा परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आनंद गोयल म्हणाले की, करोना सारख्या महामारीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले. त्यामुळे पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांच नाव घेतले गेले आहे. या कुटुंब प्रमुखांनी राज्याची चांगल्या प्रकारे धुरा सांभाळली आणि आज आमच्या दैवताला आमदार सोडून गेले आहेत.त्याबद्दल वाईट वाटत असून या षडयंत्रावर मात करण्याची ताकद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना मिळो, अशी प्रार्थना प्रभू श्रीराम यांच्या चरणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.