पुणे :‘संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी या क्षेत्रात आणखी संशोधनाची गरज आहे. बदलत्या काळानुसार कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि संशोधकांनी देशासाठी मोठा वाटा उचलावा. आत्मनिर्भर भारतासाठी संरक्षण तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे,’ असे मत ‘डीआरडीओ’च्या अध्यक्षांचे तांत्रिक सल्लागार मनीष भारद्वाज यांनी व्यक्त केले.

सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत असलेल्या ‘बीटेक इन डिफेन्स टेक्नॉलॉजी’ या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनावेळी भारद्वाज बोलत होते. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. टाटा टेक्नॉलॉजीजचे जागतिक प्रमुख सुशील कुमार, गोदरेज एअरोस्पेसचे एस. एम. वैद्य, डिमा मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे संचालक शिरीष देशमुख, वरुण खंदारे, हर्ष गुणे, मेजर जनरल विनय हांडा या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात विद्यापीठ आणि वसुंधरा जीओ टेक्नॉलॉजी, डीएसए इलेक्ट्रो अँड डिझाइन या दोन कंपन्यांबरोबर सामजंस्य करार करण्यात आला.

भारद्वाज म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूरने सैन्य दल आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व सर्वांना दाखवून दिले आहे. डीआरडीओने निर्मिती केलेले आकाश, ब्राह्मोस क्षेपणास्त्र, रडार प्रणाली, ड्रोन किती महत्त्वपूर्ण आहे हे संपूर्ण राष्ट्राने पाहिले.’

‘‘बीटेक इन डिफेन्स टेक्नॉलॉजी’ हा नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम आहे. देशातील काही महत्त्वपूर्ण कंपन्या लष्करी तंत्रज्ञानात योगदान देत आहेत. देशातील हजारो युवकांसाठी रोजगार तयार करत आहेत. एआय, सायबर सुरक्षा, ऑटोनॉमस सिस्टीम्ससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या एकात्मिकतेसह हा अभ्यासक्रम मुले आणि मुलींसाठी योग्य आहे. त्यांना भारताच्या भविष्यातील संरक्षण क्षमतांना आकार देण्याची संधी यामुळे मिळेल,’ असे डॉ. मुजुमदार यांनी सांगितले.