जेजुरी : जेजुरी गाव, एमआयडीसीतील कारखाने आणि पुरंदर तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा करणाऱ्या नाझरे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून, या धरणात ५४ टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच प्रमुख जलाशयही काठोकाठ भरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.कऱ्हा नदीच्या काठावर असलेल्या नाझरे धरणात मोठ्या वेगाने पाणी येत असल्याने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या धरणाची पाणीसाठा क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट आहे. सध्या धरणात ५१८ दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा झाला आहे. धरण भरल्याने जेजुरी आणि एमआयडीसीतील उद्योगांची पाण्याची अडचण दूर झाली आहे.

श्रीक्षेत्र जेजुरी येथे दररोज हजारो भाविक खंडोबाच्या देवदर्शनासाठी येत असतात, त्यामुळे पाण्याची जास्त गरज भासते. आता धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे. पुरंदर किल्ला परिसर, नारायणपूर, गराडे, सासवड या ठिकाणी मागील आठवड्यात संततधार पडल्याने नाझरे धरण यंदा लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असल्याचे नाझरे पाटबंधारे शाखेचे अभियंता अनिल घोडके आणि शाखाधिकारी विश्वास पवार यांनी दिली.

पुरंदर तालुक्यातील गराडे धरण १०० टक्के भरल्याने सांडव्यातून ४५० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हे पाणी कऱ्हा नदीतून थेट नाझरे धरणात पोहोचते. त्यामुळे नाझरे धरणाची पाणीपातळी वाढली आहे, अशी माहिती गराडे पाटबंधारे शाखेचे अभियंता अविनाश जगताप यांनी दिली.दरम्यान, पुरंदर तालुक्यातील प्रमुख तलावही भरले आहेत. घोरवडी तलाव ७० टक्के, पिलानवाडी, माहूर जलाशय, वीरनाला जलाशय, पिसवे हे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.