पुणे : जलसंपदा विभागातील माझ्या कामातील चांगल्या कामाची चर्चा कमी झाली, तर काही कामांबाबत उगाचच आरोप करून बदनामी करण्यात आली. माझ्यावरचा एकही आरोप सिद्ध झाला नाही. तत्कालीन जलसंपदा सचिव सुरेश सोडळ यांचे ऐकले असते तर आरोप झालेच नसते, असे स्पष्ट मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 मी कधी बदनामीची पर्वा केली नाही, धडाडीने काम करणे हा माझा स्वभाव आहे. माझ्या मताशी ठाम राहतो, चूक झाली तर माफीही मागतो, असेही त्यांनी नमूद केले. राजहंस प्रकाशनतर्फे जलसंपदा विभागातील माजी निवृत्त सचिव सुरेश सोडळ यांच्या ‘माझी जीवनधारा’ पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते दी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात झाले.  जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव नंदकुमार वडनेरे, निवृत्त सचिव विद्यानंद रानडे, राजहंस प्रकाशनचे मुख्य संपादक डॉ. सदानंद बोरसे, अभियंता मित्रचे संपादक डॉ. कमलकांत वडेलकर या वेळी उपस्थित होते. महाविद्यालयीन जीवन, मंत्रालयात केलेले काम, शेतीमध्ये केलेले प्रयोग आदींचा आढावा पुस्तकात  घेण्यात आला आहे.

पवार म्हणाले, की जलसंपदा विभागाचा मंत्री म्हणून काम करताना राज्य पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, शेती आणि पिण्यासाठी मुबलक पाणी असावे यासाठी प्रयत्न केला. राज्य आणि राज्यातील शेतकरी महत्त्वाचा असतो. काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यातून बदनामीही झाली. सोलापूरच्या दुष्काळी भागातून आलेल्या सोडळ यांनी जलसंपदा विभागात तळमळीने काम केले. माझ्या राजकीय कारकिर्दीत वित्त विभाग, जल संपदा, ऊर्जा विभाग अशा विविध जबाबदाऱ्या निभावल्या असे पवार यांनी नमूद केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar comment regarding allegations on irrigation scam zws