पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील प्रमुख रस्ते अधिक सुरक्षित व सर्वसमावेशक बनवण्यासाठी हाती घेतलेल्या ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्पाचा आराखडा तयार करताना केलेल्या सर्वेक्षणात सुमारे ८७ टक्के नागरिकांनी रस्ता ओलांडताना असुरक्षित वाटत असल्याचे सांगितले.
‘आयटीडीपी इंडिया’ संस्थेमार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले. ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्पांतर्गत दापोडी, निगडी प्राधिकरणासह शहरातील विविध भागांतील रस्ते नागरिकांसाठी सुरक्षित, वाहतुकीच्या सुरळीत संचलनासाठी बनवण्यात येत आहेत. या प्रकल्पाचा आराखडा तयार करताना नागरिक, निवासी संस्था, विक्रेते, दुकानदार, वाहतूक पोलीस आदी सर्व घटकांशी सविस्तर सल्लामसलत करण्यात आली. नागरिकांचे अभिप्राय घेऊन ते रस्त्याच्या नियोजन व रचना प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले आहेत.
‘आयटीडीपी इंडिया’ संस्थेने पादचारी आणि सायकलस्वारांचे सर्वेक्षण केले. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर केलेल्या सर्वेक्षणात ७९ टक्के नागरिकांनी सांगितले, की रस्त्यांची रचना सुधारली गेल्यास सायकल चालवणे, पदपथावरून पायी चालण्याचे प्रमाण वाढेल. रस्त्याची सुरक्षित रचना करण्यास ८७ टक्के नागरिकांनी पाठिंबा दिला, तर ८७ टक्के नागरिकांनी, रस्ता ओलांडताना असुरक्षित वाटत असल्याचे सांगितले. सध्याचा रस्ता मुलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी असुरक्षित असल्याचे ८२ टक्के नागरिकांनी सांगितले. रात्री प्रवास करताना ७६ टक्के नागरिकांना समस्या जाणवत होत्या, तर ५९ टक्के नागरिकांनी अति वेगाने जाणारी वाहने ही मोठी समस्या असल्याचे मत मांडले.
शहरात दर शंभर नागरिकांंमागे ९० खासगी वाहने आहेत. त्यामुळे वाहतूक तज्ज्ञांच्या मते रस्ते रुंद करणे ही शाश्वत उपाययोजना नाही. असा उपाय करणे तात्पुरता मार्ग आहे. या समस्येवर दीर्घकालीन उपाय करण्याच्या दृष्टीने ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्प प्राधान्याने राबवला जात आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीबरोबरच पादचारी, सायकलस्वार यांचाही विचार करण्यात आला आहे. – सुनील पवार, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका