पिंपरी : शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना धरणात आजमितीला २८.९३ टक्के साठा असून जूनअखेरपर्यंत पुरेल एवढाच हा साठा आहे. गेल्यावर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असल्याने पावसाने ओढ दिल्यास शहरवासीयांवार पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील गृहनिर्माण संस्थांची खासगी टँकरवर भिस्त दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवडला पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मागील साडेचार वर्षांपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहराचा लोकसंख्यावाढीचा वेग आणि भविष्यातील सन २०४५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन पालिका आंद्रा व भामा आसखेड धरणातून २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणणार आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी चिखलीत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आंद्रा धरणातून निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागातील नागरिकांना देण्यात येत आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडत असून, तक्रारींमध्ये वाढ होत आहे. पवना धरणात सध्या २८.९३ टक्के पाणीसाठा असून हा साठा जूनअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला ३०.९२ टक्के पाणीसाठा होता. मागीलवर्षीपेक्षा दोन टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे.

हेही वाचा – भोरमध्ये निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून ग्रामस्थांवर गोळीबार

शहरातील अनेक गृहनिर्माण संस्थांना टँकरद्वारे पाणी घ्यावे लागते. प्रतिमाणशी दरडोई १३५ लिटर या निर्धारीत मानकाप्रमाणे पाणी दिले जाते. ज्यांना जास्त पाणी लागते, ते खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी घेत असल्याचा पालिकेचा दावा आहे.

२०२५ पर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठा

भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठीच्या जलवाहिनीचे काम सन २०२५ पर्यंत पूर्ण होईल. तोपर्यंत पाणीपुरवठा एकदिवसाआडच सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – मावळमध्ये प्रचार खर्चात आघाडीवर बारणे की वाघेरे? कोणी किती केला खर्च?

दिवसाला ६१५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

पालिका दिवसाला पवना धरणातून ५२०, आंद्रातून ८० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) १५ असे ६१५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते.

धरणात २८.९३ टक्के पाणीसाठा आहे. पावसाला विलंब झाल्यास पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते. शहरी भागात पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी केले. तर, विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत काही तक्रारी नाहीत. जूनमध्ये तक्रारी वाढू शकतील. पाणीपुरवठा विस्कळीत झाला तरच टँकरद्वारे पाणी दिले जाते. जास्तीचे पाणी लागते म्हणून खासगी गृहनिर्माण संस्था टँकरद्वारे पाणी घेतात, असा दावा पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri water shortage crisis on pimpri chinchwad people how much water is stored in the dam pune print news ggy 03 ssb