पुणे : नवले पूल परिसरात होत असलेल्या अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल या दरम्यान वाहनांचा वेग मर्यादित रहावा, यासाठी ‘रम्बल स्टिप’ बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

या रस्त्यावर प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर चांगल्या दर्जाच्या रम्बल स्टिप बसविण्यात येणार आहेत. यामुळे या भागात होणाऱ्या अपघातांना आळा बसेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला.

नवले पुलावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातामध्ये आठ जणांना मृत्यू झाला होता. साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून आणि ब्रेक नादुरुस्त झाल्याने नवले पुलाजवळ गुरुवारी भीषण अपघात झाला. या कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिल्यामुळे लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ९ ते १० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर या भागातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या रस्त्यावर तीव्र स्वरूपाचा उतार असल्याने प्रत्येक महिना-दोन महिन्यांनी या रस्त्यावर अपघात होतात. काही महिन्यांपूर्वी नवले पूलाजवळ झालेल्या अपघातामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला होता.

नवले पूलाजवळ झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, वाहतूक पोलिस अधिकारी यांची शुक्रवारी महापालिकेत बैठक झाली. या बैठकीला महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नवले पूलाजवळ असलेल्या तीव्र उतारामुळे अवजड वाहनांचे वेगावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे बहुतांश अपघात होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर पाचशे मिटर अंतरावर वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी रम्बल स्ट्रिप बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आयुक्त राम म्हणाले, या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तीन टप्प्यात उपाययोजना केल्या जाणार आहेत. यामध्ये एलईडी फलक बसविणे, वेगाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करणे, वाहनांचा वेग ६० किलोमीटर वरुन ४० किलोमीटरवर आणणे. वेग मोजण्याची यंत्रणा, कँमेरे या रस्त्यांवर बसविण्याचे नियोजन करणे. तसेच बेकायदा पद्धतीने वाहने रस्त्यांवर उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्याबाबत आवश्यक त्या सूचना वाहतूक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांना देणार आहेत.

चार सेवा रस्त्यांची कामे सहा महिन्यात पूर्ण करणार

नवीन कात्रजचा बोगदा ते हिंजवडी दरम्यान असलेल्या पुणे बंगलूर रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका करण्यासाठी चार सेवा रस्त्यांची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. हे सेवा रस्ते सुरु झाल्यानंतर महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. दुचाकीचालक तसेच जवळच्या भागात राहणारे वाहनचालक सेवा रस्त्यांचा वापर करण्यावर भर देतील, परिणामी वाहतूक कोंडी सुटणार आहे. बालेवाडी ते कात्रज दरम्यान असलेले सेवा रस्ते तयार होणे आवश्यक आहे. यासाठी काही जागा ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी संबधित जागा मालकांना टीडीआर, एफएसआय तसेच रोख मोबदला देण्याबाबत देखील अभ्यास सुरु आहे. चार सेवा रस्त्यांची कामे सहा महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे आयुक्त राम यांनी सांगितले.