शिरुर : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील कारेगावमधील फलके मळा येथे टेम्पोची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर त्यांची दोन मुले जखमी झाली. ही दुर्घटना बुधवारी घडली.

आरती गणेश सावंत (वय ३३, रा. गंगा फेज ३, शिरूर) असे घटनेत मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांची मुलगी स्वराली (वय १२) आणि मुलगा स्वराज्य (वय १५) हे जखमी झाले. याप्रकरणी सिद्धार्थ इंद्रभान गिरमकर (वय २८, रा. उरळगाव, शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोचालक वेगाने टेम्पो चालवत होता. फलके मळा येथील चौकात टेम्पोची दुचाकीला धडक बसली. त्यामध्ये आरती मृत्युमुखी पडल्या. टेम्पोचालक पसार झाला आहे. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.