पुणे : जूनपर्यंत चालणारा स्ट्रॉबेरीचा हंगाम यंदा पाण्याच्या तुटवड्यामुळे दोन महिने अगोदरच एप्रिलअखेर संपला आहे. अपेक्षित थंडी न पडल्यामुळे उत्पादनात २५ टक्क्यांपर्यंत घट झाली. शिवाय दरातही २० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम स्ट्रॉबेरी उत्पादकांसाठी फारसा फायदेशीर ठरला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाबळेश्वरसह वाई, कोरेगाव आणि जावली तालुक्यांत स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. अंबट – गोड चवीसाठी महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे. यंदा या पिकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दरवर्षी पावसाळ्यात स्ट्रॉबेरीची रोपे तयार केली जातात. मागील पावसाळ्यात कमी पावसामुळे आणि बुरशीजन्य रोगामुळे लागवड केलेल्या रोपांपैकी २५ टक्के रोपे जळून गेली होती. त्यामुळे लागवडीसाठी कमी रोपे मिळाली. यंदा महाबळेश्वरमध्ये तीन हजार आणि वाई, कोरेगाव आणि जावली तालुक्यात एकूण एक हजार एकर क्षेत्रावर लागवड झाली होती.

हेही वाचा >>> गुजरातमधून पांढरा कांदानिर्यातीला परवानगी हा महाष्ट्रावर अन्याय; शेतकरी संघटनेचा आरोप

लागवडीनंतर प्रामुख्याने हिवाळ्यात अपेक्षित थंडी पडली नाही. दरवर्षी सरासरी २८ ते ३० अंश सेल्सिअस तापमान असते. यंदा ३० ते ३३ अंशांवर गेले होते. त्यामुळे अपेक्षित फुले आली नाहीत, तसेच फुलांपासून फळ निर्मितीचे प्रमाणही कमी झाले. फळांचा आकारही वाढला नाही, फळे मध्यम आकाराचीच राहिली. त्यामुळे उत्पादनात सुमारे २५ टक्क्यांपर्यंत घट झाली.

हेही वाचा >>> समूह विद्यापीठ योजनेला राज्यभरातून अल्प प्रतिसाद

उत्पादनात घट झाल्यामुळे चांगल्या दराची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण, स्थानिक प्रक्रिया उद्योगांनी स्थानिक पातळीवरील स्ट्रॉबेरी खरेदी न करता नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. त्यामुळे स्थानिक स्ट्रॉबेरीला दर मिळाला नाही. दरवर्षी प्रक्रिया उद्योगाकडून स्थानिक पातळीवर ५० रुपये किलो दराने स्ट्रॉबेरी खरेदी होत होती. यंदा फक्त २५ रुपये दराने खरेदी झाली. मागील काही वर्षे अन्य बाजारांतही सरासरी ६८ रुपये प्रति किलो दर शेतकऱ्यांना मिळत होता. तो यंदा सरासरी ५४ रुपये प्रति किलो मिळाला. महाबळेश्वर परिसरात एकरी दहा ते बारा टन उत्पादन निघते. कमी उत्पादन आणि दरातील पडझडीमुळे शेतकऱ्यांचे एकरी १.४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरवर्षी महाबळेश्वर परिसरात जूनपर्यंत स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. यंदा तापमान वाढ, उन्हाच्या झळांमुळे रोपे जळून गेली. फळांची वाढ होत नाही, फूल आणि फळधारणा होण्यात अडचणी येत आहेत. सिंचनासाठी पुरेसे पाणी नसल्यामुळे यंदा दोन महिने अगोदरच म्हणजे एप्रिलअखेरच स्ट्रॉबेरीचा हंगाम संपला आहे. सध्या केवळ पाच टक्केच लागवडी शिल्लक आहेत. त्यापासून फारतर दहा दिवस फळे मिळतील, अशी माहिती महाबळेश्वर सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष किसन भिलारे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strawberry season end two months earlier this year due to water shortage pune print news dbj 20 zws