बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातला दिलेल्या दणक्यातून सावरत असतानाच, या वादळामुळे सर्वात कमी मनुष्यहानी झाल्याचे श्रेय प्रशासनाच्या सुरक्षा व बचाव यंत्रणेच्या नियोजनाला द्यायला हवे. सुमारे तीस हजार रहिवाशांना वेळेत सुरक्षित स्थळी नेण्यात आल्याने हे घडू शकले. या चक्रीवादळाची तीव्रता सर्वात जास्त असली तरी ते प्रत्यक्ष धडकण्यास अधिक वेळ लागल्याने प्रशासनाला तयारीला वेळ मिळाला. या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी यंत्रणा कार्यक्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी जी वेगवान हालचाल करावी लागते, ती वेळेत झाल्यामुळेच हे घडू शकले. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात सर्वाधिक काळ टिकलेल्या चक्रीवादळांमध्ये आता बिपरजॉय वादळाचा समावेश झाला आहे. अरबी समुद्रामधील आग्नेय भागात ६ जून रोजी पहाटे साडेपाच वाजता बिपरजॉय चक्रीवादळ निर्माण झाले आणि त्यानंतर सुमारे दहा दिवसांनी ते गुजरातच्या जखाऊ बंदराच्या परिसरात धडकले. हा काळ प्रशासनासाठी अतिशय महत्त्वाचा होता. अचानक आणि कमी वेळेत येणाऱ्या चक्रीवादळांमध्ये मनुष्यहानी होण्याची शक्यता नेहमीच अधिक असते. ती टाळण्यासाठी यापुढील काळात सातत्याने काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेषत: गेल्या चार दशकांत अरबी समुद्रातील चक्रीवादळांचे प्रमाण ५२ टक्क्यांनी, तर तीव्र चक्रीवादळांचे प्रमाण १५० टक्क्यांनी वाढले आहे. या पार्श्वभूमीवर यंत्रणा सातत्याने सक्रिय ठेवण्याची व्यवस्था आता करावी लागेल. अरबी समुद्रातील चक्रीवादळांचा कालावधी ८० टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच, समुद्रातील वादळे आता तुलनेने संथ गतीने समुद्रावरून वाटचाल करतात. अतितीव्र वादळांसाठीचा कालावधी २६० टक्क्यांनी वाढला आहे. अरबी समुद्रात मान्सूनपूर्व कालावधीत तयार होणाऱ्या चक्रीवादळांची तीव्रता ४० टक्क्यांनी; तर मान्सूननंतरच्या हंगामात तयार होणाऱ्या वादळांची तीव्रता २० टक्क्यांनी वाढलेली आहे. तसेच चक्रीवादळांची तीव्रताही झपाटय़ाने वाढत असल्याचे या अभ्यासातून दिसून आले होते. अरबी समुद्रावरील वाढलेली आद्र्रता आणि वाढत असलेले तापमान हे चक्रीवादळे वाढण्याचे कारण आहे आणि त्यामध्ये मानवी हस्तक्षेप अधिक असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाबरोबरच दूरदृष्टीचे निर्णय महत्त्वाचे असतात. बिपरजॉय या चक्रीवादळाने गुजरातच्या किनारपट्टीवर येण्यास दहा दिवसांचा अवधी घेतला, त्यामुळे नैसर्गिक हानी रोखता येणे अशक्य असले, तरीही मनुष्यहानी टाळणे शक्य झाले. मोठय़ा प्रमाणात क्षतिग्रस्त करण्याची क्षमता असणाऱ्या चक्रीवादळांना यापुढे सतत सामोरे जावे लागणार असल्याने सर्वच पातळय़ांवर त्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारणे आवश्यक ठरणार आहे.

गुजरातमधील मांडवी – कच्छ परिसरातील नागरिकांनी वादळानंतरच्या पुनर्निर्माणासाठी सरकारी मदतीची वाट न पाहता आपापल्या पद्धतीने सुरुवातही केली आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर अश्रू गाळत बसून सरकारी मदतीची याचना करीत बसण्यापेक्षा तेथील नागरिकांनी निवडलेला हा मार्ग अनुकरणीय आहे. एरवी सरकारी यंत्रणांच्या ढिसाळ कारभाराचा पूर्वानुभव असल्याने अशा प्रसंगात नागरिकांनी पुढे येऊन धीरोदात्तपणे उभे राहणे, ही अतिशय कौतुकाची गोष्ट आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीनंतर सरकारी पथके येणे, पाहणी करून हानीचा अंदाज करणे आणि त्यानंतर सरकारी मदत मिळणे या पद्धतीत नेहमीच कालापव्यय होतो, असा आजवरचा अनुभव. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर काही वर्षांपूर्वी आदळलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने झालेल्या हानीनंतर अनेकांना सरकारी मदतीसाठी आजही सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. निसर्गकोपाने हतबल झालेल्यांना तातडीने मदत मिळणे ही अत्यावश्यक बाब असते, मात्र सुस्त सरकारी यंत्रणा त्याबाबत जो ढिम्मपणा दाखवतात, तो अमानवी स्वरूपाचा असतो. बिपरजॉय चक्रीवादळाने यापुढील काळासाठी जो धडा घालून दिला आहे, तो कौतुकास्पद म्हटला पाहिजे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anvyarth overcome the stormy crisis amy