दिल्लीच्या तीन मूर्ती भवनात ‘नेहरू संग्रहालया’च्या ऐवजी सुरू झालेल्या ‘पंतप्रधान संग्रहालया’च्या संचालकपदाची सूत्रे आता अश्वनी लोहाणी यांच्याकडे जाणार आहेत. ‘पंतप्रधान संग्रहालया’ला स्थापनेपासून कौतुकापेक्षा वादांचीच सवय अधिक, ही स्थिती लोहाणी यांच्या नियुक्तीमुळे तरी बदलेल, अशी अपेक्षा आहे- तशी ती कोणत्याही नव्या संचालकांच्या नियुक्तीनंतर असणारच होती, पण लोहाणी यांच्याच नियुक्तीने त्या अपेक्षेला अधिक अर्थ आला आहे. याचे कारण लोहाणी यांची आजवरची कारकीर्द!
जातील तिथे काहीतरी यशस्वी कामगिरी करून दाखवतील, असा लौकिक अश्वनी लोहाणी यांनी गेल्या सुमारे ३२ वर्षांच्या कारकीर्दीत कमावला आहे. नेमके सांगायचे तर, १८ जुलै १९९७ पासून त्यांचा बोलबाला होऊ लागला. या दिवशी ‘फेअरी क्वीन’ ही १८५५ मध्ये तयार झालेल्या वाफेच्या इंजिनाची रेल्वेगाडी दिल्ली ते राजस्थानातील अल्वार या मार्गावर धावू लागली. एकेकाळी हेच मीटरगेज इंजिन ईस्ट इंडिया कंपनीने, सोजिरांची नेआण करण्यासाठी वापरले होते (अर्थात, ‘मुंबई-ठाणे : सन १८६३’ हीच भारतातली पहिली प्रवासी रेल्वेगाडी) – ‘प्रदर्शनीय वस्तू’ म्हणून उरलेले हे इंजिन पूर्ण क्षमतेने सुरू करून पुन्हा सेवेत आणायचे आणि ‘परवडेल त्यांनाच, ऐतिहासिक झुकझुकगाडीतून आलिशान प्रवासा’चा आनंद द्यायचा, या कल्पनेसाठी मूळचे इंजिनीअर असलेले, पण १९९३ पासून दिल्लीच्या ‘राष्ट्रीय रेल संग्रहालया’चे संचालक झालेले लोहाणी कामाला लागले होते. बहुधा त्यांचा हा पुढाकार पाहूनच ऑगस्ट १९९८ पासून पुढल्या साडेचार वर्षांसाठी त्यांची नेमणूक ‘भारतीय पर्यटन विकास महामंडळा’चे (आयटीडीसी) संचालक म्हणून झाली.
दोन्ही वर्षांच्या खंडानंतर, २००४ ते २००९ पर्यंत त्यांनी ‘मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळा’चे संचालकपद सांभाळले. त्यांच्या कारकीर्दीत, ‘इंडिया का दिल देखो’ ही जाहिरात २००६ सालच्या बालदिनी (१४ नोव्हेंबर) पहिल्यांदा चित्रवाणी वाहिन्यांवर आली, तेव्हापासून मध्य प्रशत खजुराहो आणि सांचीखेरीजही पाहायला भरपूर आहे याची जाणीव देशाला झाली! मूळचे ते भारतीय रेल्वे सेवेतले, त्यामुळे या प्रतिनियुक्त्यांनंतर पुन्हा रेल्वेत- आधी उत्तर रेल्वेच्या दिल्ली उपविभागाचे संचालक म्हणून; तर २०१२ पासून दीड वर्षभर उत्तर रेल्वेचे प्रमुख यांत्रिकी अभियंता म्हणून काम केल्यावर त्यांनी २०१७ पासून ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष हे रेल्वेतले सर्वोच्च पदही भूषवले. मात्र मधली दोन-अडीच वर्षे अगदी निराळ्या पदावर त्यांनी काम केले- हे होते ‘एअर इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्षपद! हा हवाई हत्ती तोवर ‘पांढरा’ ठरत होता, त्यास ‘रुळांवर’ आणण्याचे प्रयत्न त्यांनी केले… उदाहरणार्थ मुंबई ते सान फ्रान्सिस्को सेवा सुरू केली, विमाने वेळ पाळू लागली… पण संचित तोटाच इतका की एअर इंडिया अखेर खासगीकरणाकडे वाटचाल करू लागली.
निवृत्तीनंतर, २०२० पासूनच दिल्ली व अन्य विमानतळांचा ‘खासगीकरणातून पुनर्विकास’ करणाऱ्या ‘जीएमआर समूहा’च्या सेवा विभागाचे प्रमुख कार्यकारी अधिकारीपद त्यांनी स्वीकारले होते. मात्र गेल्या फेब्रुवारीत त्यांनी हे पद सोडले. कानपूरमध्ये शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झालेल्या लोहाणी यांनी, जमालपूर येथील ‘रेल्वे इन्स्टिट्यूट’मधून अभियांत्रिकीच्या चार शाखांमधली पदव्या १९७६ ते ८० या काळात मिळवल्या, याची नोंद ‘लिम्का बुक’ने घेतली होती!