राजस्थानमधील रणथम्बोर व्याघ्रप्रकल्पात इतरांप्रमाणेच एक पर्यटक म्हणून त्यांनी भेट दिली. तिथल्या निसर्गसौंदर्याच्या प्रेमात ते पडले, पण त्याहीपेक्षा तिथल्या वाघांनी त्यांचे आयुष्य कायमचे बदलले. एक-दोन नाही तर तब्बल पाच दशके वाघांच्या संवर्धनासाठी त्यांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे वाल्मीक थापर. अवघे आयुष्य वाघांसाठी समर्पित करणाऱ्या या ‘टायगर मॅन’ला ३१ मे २०२५ रोजी, कर्करोगाशी लढाईत हार पत्करावी लागली.
वाल्मीक थापर यांचा जन्म १९५२ मध्ये झाला. वडील रोमेश थापर हे प्रसिद्ध पत्रकार, विचारवंत होते. तर इतिहासकार रोमिला थापर या वाल्मीक यांच्या आत्या. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. थापर त्यांच्या कुटुंबासह दिल्लीत राहत होते. वाल्मीक थापर यांना वाघांबद्दलची आवड १९७६ मध्ये सुरू झाली, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा रणथम्बोर राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य आणि वाघाशी झालेल्या पहिल्या भेटीने त्याच्या आयुष्याची दिशा बदलली. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाघांचे संरक्षण, संशोधन आणि संवर्धनासाठी समर्पित केले. या ठिकाणी त्यांची भेट फतेहसिंग राठोड यांच्याशी झाली. व्याघ्रसंवर्धन कार्याला त्यांनी खरी दिशा दिली. रणथम्बोर राष्ट्रीय उद्यानातील वाघांच्या हालचालीचे निरीक्षण ते सुमारे पाच दशके करत राहिले. ‘मछली’ ही जगातील सर्वाधिक छायाचित्रण झालेली वाघीण; तिच्या आयुष्याचे दस्तऐवजीकरण थापर यांनीच केले. अन्य देेशांतही त्यांनी व्याघ्रसंवर्धनाची चळवळ रुजवली. वाघांच्या संवर्धनासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. प्रसंगी धोरणकर्ते, राज्यकर्ते यांच्यावर कडाडून टीका करताना किंचितही तमा बाळगली नाही. भारतातील वाघांच्या घटत्या संख्येकडे सरकार आणि सर्वसामान्यांचे लक्ष वारंवार वेधले आणि त्यांच्या संवर्धनासाठी मनापासून काम केले.
राजस्थानमधील सारिस्का अभयारण्यातून वाघ पूर्णपणे नामशेष झाल्यानंतर या अभयारण्यात सुधारणा सुचवण्यासाठी स्थापन केलेल्या ‘टायगर टास्क फोर्स’ समितीचे ते सदस्य होते. राष्ट्रीय वन्यजीव मंडळासह सरकारच्या अनेक उच्चपदस्थ संस्थांमध्ये त्यांनी काम केले. १९८७ मध्ये त्यांनी रणथम्बोर फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेमार्फत त्यांनी स्थानिक समुदायांना व्याघ्रसंवर्धनासाठी एकत्र आणले. विस्थापित ग्रामस्थांसाठी उपजीविकेची साधने त्यांनी निर्माण केली. व्याघ्रसंवर्धनावर त्यांनी सुमारे ४० पुस्तके लिहिली. त्यापैकी ‘लँड ऑफ द टायगर’, ‘टायगर फायर’ आणि ‘द सीक्रेट लाइफ ऑफ टायगर्स’ ही पुस्तके सर्वात प्रसिद्ध आहेत. अनेक वन्यजीव माहितीपटांची निर्मिती त्यांनी केली. यात १६ आंतरराष्ट्रीय माहितीपटांचा समावेश आहे. वाघांच्या जीवनातील प्रत्येक पैलूचे, त्यांच्या जगण्याच्या संघर्षाचे चित्रण त्यांनी संवेदनशीलतेने केले. वाघांच्या अधिवासाचे रक्षण करणे, शिकारीविरुद्ध कठोर कारवाई आणि इको-टूरिझममध्ये संतुलन राखणे यांसाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. जगभर अनेक विद्यापीठांमध्ये वन्यजीवांवर व्याख्याने दिली. वाल्मीक थापर हे केवळ वाघप्रेमी नव्हते तर भारताच्या राष्ट्रीय प्राण्याला वाचवण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे योद्धादेखील होते. त्यांच्या आवडी, समर्पण आणि ज्ञानामुळे त्यांना ‘भारताचा टायगर मॅन’ ही ओळख मिळाली. ते आज आपल्यात नसतील, पण वाघ आणि वन्यजीव यांच्या संरक्षणासाठी त्यांनी केलेले काम नेहमीच सर्वांसाठी प्रेरणादायी राहील.