मैत्री असावी तर श्रीकृष्ण व सुदामा सारखी असे महाभारतील मैत्रीचे महात्म्य आपण ऐकतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनासुद्धा अशीच एक नि:स्पृह व्यक्ती त्यांच्या जीवनात मिळाली, ती म्हणजे दामोदर सावरकर. तुकडोजी महाराजांचे ‘जीवनयोगी’ चरित्र सुदामजींनी ११ भागांच्या समग्र खंडात निरक्षिरवृत्तीने लिहिले. ग्रामगीता, महाराजांची ग्रंथसंपदा आणि ‘गुरुदेव’मासिकाचे संपादन त्यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९३४ मध्ये दामोदर सावरकरांची प्रकृती बरी नसल्याने विचारपुस करायला गेलेल्या महाराजांना सावरकर अस्थिपंजर अवस्थेत दिसले. महाराजांनी त्यांना कवटाळून ‘सुदामा’ संबोधले येथूनच दामोदर सावरकर, सुदाम सावरकर म्हणून ओळखले जाऊ लागले. वयाच्या चौदाव्या वर्षी सावरकरांचे महाराजांसोबतचे ऋणांनुबंध ३५ वर्षे वृिद्धगत होत राहिले. महाराजाच्या मृत्यूनंतरही हे बंध कायम राहिले. १९१६ रोजी शिरजगाव मोझरी येथे जन्मलेल्या सुदामजींचे १९९० साली निधन झाले. गुरुदेव सेवा मंडळात तुकडोजी महाराज व सुदाम सावरकर यांच्या जोडीकडे आजही कृष्ण-सुदामा म्हणूनच पाहिले जाते. सुदाम्याच्या मूठभर पोह्यांना जागून कृष्णाने सुदाम्याला सोन्याची नगरी बहाल केल्याची कथा आहे. तुकडोजी महाराजांच्या परिसस्पर्शाने सावरकरांची साहित्यनगरीही आज शंभर नंबरी सोन्याचीच झाली आहे.

ग्रामगीता प्रकाशनाच्या वेळी तुकडोजी महाराज सुदामजींबद्दल गौरवोद्गार काढताना म्हणतात ‘‘ग्रामगीतेचे संपादक सुदाम सावरकरांना एकेका ओवीचा अनेकदा अभ्यास करावा लागल्याने माझ्यापेक्षाही ते ग्रामगीतेला अधिक जाणतात. माझी स्थिती शुद्ध काचेसारखी आहे. एकदा समोर आलेले विचार टिपले की पुन्हा आपला पूर्ववत स्वच्छ! ग्रामगीताच नव्हे तर इतरही साहित्य धावत्या प्रवासात लिहून मी सुदामजींकडे पाठवायचे व त्यांनी ते नीट सुसंगत, विषयवार लावून सजवायचे. आमची अशी ही अजब जोडी चालत आली आहे’’

अर्जुनाने श्रीकृष्णाला विनंती केली होती, की पुन्हा गीता ऐकवा! उत्तर मिळाले ‘नच शक्यं पुनर्वक्तं अशेषण धनंजय!’ अर्थात ‘अर्जुना, गीता पूर्णपणे आता मलाही सांगता यायची नाही!’ जिथे व्यासांना ग्रंथित करता आली तिथे श्रीकृष्णाला ते अशक्य नव्हते. अर्थात त्यांना त्या उत्तरानं असमर्थता नव्हे तर गीतेची अपूर्वता दर्शवायची होती. महाराजांनी, सुदाम सावरकरांच्या केलेल्या गौरवाचा अर्थसुद्धा याच दृष्टीने लावला जातो. म्हणूनच सुदाम सावरकरांना जनसारस्वतकार या उपाधीने संबोधले जाते. महाराज आपल्या वचनात म्हणतात-

तोडा नहीं अक्षर कभी,

फिरके न देखा बाच के।

रंग में लिखा, जन में सिखा,

आनंद पाया नाच के।

साथी मेरी है खंजरी,

और मित्र हैं पागल गडी।।

राजेश बोबडे

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chintandhara tukdoji maharaj damodar savarkar amy