उत्तम लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते विवेक लागू यांना शालेय वयापासूनच संगीत आणि नाटकाची ओढ होती. महाराष्ट्र कलोपासकच्या एकांकिका स्पर्धेत यशस्वी झाल्यावर त्यांचे नाट्यसृष्टीत नाव झाले. पुढे राज्य नाट्यस्पर्धेतील नाटकात यशस्वी झाल्यावर मुंबईतील विजया मेहतांच्या नाट्यशिबिरात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली. तिथे ते सर्वोत्कृष्ट नट ठरले. आणि मग अभिनेता म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. बँकेची नोकरी करताना आंतरबँक स्पर्धांमधून आपला हुन्नर ते दाखवू लागले.
दुसरीकडे व्यावसायिक नाटकांतूनही त्यांचा प्रवास सुरू झाला होता. ‘जंगली कबूतर’ या कमलाकर सारंगांच्या नाटकातून त्यांनी रंगभूमीवरील कारकीर्द सुरू केली. त्यात निळू फुलेही काम करत. पुढे काही कारणास्तव त्यांना हे नाटक सोडावे लागले. त्यांच्या जागी दुसरा कलावंत आला. पण सारंगांनी विवेक लागूंना सांगितले की, तुम्ही निदान मुंबई-पुण्यातले तरी प्रयोग करा, नाही तर निळू फुले नाटक सोडतील. आपल्या कामाबद्दलचा असा विश्वास त्यांनी निर्माण केला होता. त्यांना दिग्दर्शन करायचे होते. पण नव्या दिग्दर्शकाला कोण आपले नाटक देणार, म्हणून परिस्थितीवश ते लेखनाकडे वळले. मधु राय यांच्या हिंदी नाटकातून ते काम करत होते. ते नाटक आपण मराठीत दिग्दर्शित करावे असे त्यांना वाटत होते. पण मधु राय यांनी विजय तेंडुलकर ते नाटक मराठीत करताहेत असे सांगितले.
तेंडुलकरांना तीन वर्षे तरी नाटक रूपांतरित करणे शक्य नव्हतेे. तेव्हा विवेक लागू यांनी स्वत:च ते अनुवादित केले आणि तेंडुलकरांना वाचायला दिले. पण त्यांच्याकडून ते गहाळ झाले. हे नाटक विवेक लागूंनी तीनदा लिहिले, पण ते रंगभूमीवर आणण्याची संधी मात्र त्यांना कधी मिळाली नाही. ‘प्रकरण दुसरे’ हे त्यांचे नाटक बाबरी मशीदपतनाच्या दरम्यान रंगभूमीवर आले. पण त्यानंतर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ते नाइलाजाने बंद करावे लागले. मात्र त्याला नाट्यदर्पणचा सर्वोत्कृष्ट नाटकाचा त्यावर्षीचा पुरस्कार मिळाला.
शफी इनामदार यांना ‘सेम टाइम नेक्स्ट ईयर’ या नाटकाची हिंदी आवृत्ती मंचित करायची होती. त्यांनी विवेक लागूंना त्याचे दिग्दर्शन कराल का, म्हणून विचारले. पण पहिल्या तीन मिनिटांत हशा पिकला तर ते नाटक प्रेक्षक उचलून धरतील असे त्यांचे म्हणणे होते. ते त्यांनी कुठलीही शाब्दिक आतषबाजी न करता करून दाखवले. या नाटकात दोनच पात्रे होती आणि सहा प्रवेशांत त्यांचे वय पाच पाच वर्षांनी वाढलेले दाखवायचे होते. पात्रांच्या शारीर वा शाब्दिक भाषेत फारसे बदल न करता विवेक लागूंनी ते बदल दाखवले.
‘घाशीराम कोतवाल’चे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत म्हणून ते दुसऱ्या संचात करायला तेंडुलकरांनी परवानगी दिली होती. त्याचे अमेरिकेत प्रयोग करण्यासाठी निमंत्रण मिळाले होते. तेव्हा विवेक लागू यांनी तिथे ते मराठी, हिंदी आणि गुजरातीतही करण्याचे नियोजन केले. त्यात त्यांनी नानाची भूमिका साकारली होती. तिन्ही रंगभूमीवर त्यांचा लीलया वावर होता. आपल्या नाटकांचे संगीत तेच करत. पुढे बँकेतील नोकरी सोडून ते पूर्णवेळ कलाक्षेत्रात आले. अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांतून त्यांनी कामे केली.
सतत नवे काही तरी करण्याचा ध्यास त्यांना होता. डॉ. श्रीराम लागूंशी असलेल्या आपल्या नात्याचा त्यांनी कलाक्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यासाठी कधीही वापर केला नाही. जे करायचे ते आपल्या हिमतीवर, हा त्यांचा खाक्या होता. असा हा हरहुन्नरी, तत्त्वनिष्ठ रंगकर्मी आज आपल्यातून निघून गेला आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली.