सावरकरांच्या कथित प्रमादांवर सातत्याने भाष्य करून त्यांच्या टीकाकारांची उंची वाढणार नाही, तसेच उदोउदो केल्याने त्यांच्या अनुयायांच्या राजकारणाची व्याप्तीही वाढणारी नाही..
Already have an account? Sign in
स्वत: जानवे घालून, ते सर्वास दिसेल याची व्यवस्था करून एकविसाव्या शतकात मंदिरांच्या परिक्रमा करायच्या आणि त्या वेळी विज्ञानवादाची कास धरणाऱ्या सावरकरांवर टीका करायची हा दुटप्पीपणा झाला..
‘मी सावरकर नाही, गांधी आहे’ हे राहुल गांधी
राहुल गांधी आणि तत्समांस सावरकर खुपतात ते केवळ त्यांच्या कथित माफीपत्रांमुळे. पण हा मुद्दा बाजूला ठेवला तरी सावरकरांनी दाखवलेल्या त्यागाचे काय? वयाच्या केवळ २८ व्या वर्षी ५० वर्षांची सक्तमजुरीसदृश शिक्षा झाल्याचे कानावर आले तरी अनेक बलदंड कोलमडून पडतील. पण सावरकर या शिक्षेस सामोरे गेले. ही शिक्षा त्यांनी १४ वर्षे भोगली. त्यानंतरच्या सावरकरांबाबत राहुल गांधी यांस आक्षेप असेल तर त्यांनी तोपर्यंतच्या सावरकरांचा स्वीकार करावा. इतिहासात होऊन गेलेल्या आणि आता हयातही नसलेल्या व्यक्तींनी त्यांच्या काळात काय केले, काय नाही याचा ऊहापोह त्या इतिहासापासून काही शिकण्यासाठी असेल तर तो क्षम्य म्हणता येईल. येथे ते तसे नाही. सगळय़ाचा उद्देश केवळ उखाळय़ा-पाखाळय़ा काढणे हाच. व्यक्ती ही त्या त्या काळाचे अपत्य असते. तेव्हा जे काही होऊन गेले त्याची अभ्यासपूर्ण चिकित्सा ठीक. पण वर्तमानातील राजकारणासाठी इतिहासकालीन व्यक्तिरेखांस दावणीला बांधणे ही शुद्ध दिवाळखोरी म्हणायला हवी. हा प्रमाद त्या इतिहासातील व्यक्तीचे अनुयायी तसेच टीकाकार अशा दोन्ही बाजूंनी होतो. सध्या हेच सतत घडत असल्यामुळे कोणालाच काही त्याचे वाटेनासे झाले आहे. यातून केवळ आपल्या राजकारणाची बाल्यावस्था तेवढी दिसून येते. आपणास इतिहासाच्या वस्तुनिष्ठ, परखड विश्लेषणाची सवय नाही. तसा प्रयत्न आपणास झेपत नाही आणि त्यामुळे तशा बौद्धिक प्रगल्भतेपासून आपण काही योजने तरी दूर आहोत. अशा वेळी इतिहासातील व्यक्तिरेखांचा उपयोग भावना डिवचण्यासाठी न करण्याचा विवेक उभय बाजूंनी दाखवायला हवा. सावरकरांच्या फक्त कथित प्रमादांवर सातत्याने भाष्य करून त्यांच्या टीकाकारांची वर्तमानातील बाजू मोठी ठरणार नाही. तसेच सावरकरांचा उदोउदो केल्याने त्यांच्या अनुयायांच्या राजकारणाची व्याप्तीही वाढणारी नाही. तथापि नायक आणि खलनायक अशा दोनच वर्गात इतिहासातील व्यक्तिरेखांस कोंबण्याची सांस्कृतिक सवय आपल्या समाजाच्या अंगात मुरलेली असल्याने हे असले उद्योग केले जातात. पण त्यातून राजकारणाचे अधिकच मनोरंजनीकरण होते.
भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील अनेकांस दोन वेळा मरावे लागते. एकदा भौतिक. जेव्हा ते देह ठेवतात. या मान्यवरांचे दुसरे मरण हे मरणोत्तर असते. ते या मान्यवरांचे अनुयायी तसेच टीकाकार या दोघांच्या हातून येते. संकुचित भारतीय परिघात हे दुहेरी मरण फार कमी जणांस चुकले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे निश्चितच अशा भाग्यवंतांतील नव्हेत. आपल्याकडील राजकीय दुभंग इतका की अनेकांस त्यामुळे गांधींस ‘महात्मा’ म्हणणे खुपते. लाजेकाजेस्तव ते तसे कदाचित बोलणार नाहीत. पण हे गांधी-विद्वेषाचे सत्य तसे सर्वच जाणतात. त्याचप्रमाणे अन्य काहींस सावरकरांची ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी सलते तर अन्य काहींस त्यांचे हिंदूत्ववादी विचार टोचतात. बरे ज्यांना हे सर्व स्वीकारार्ह आहे त्यांना तरी सावरकर समग्र हवे असतात असेही नाही. सध्या पूजनीय झालेल्या गोमातेची संभावना ‘एक उपयुक्त पशू’ अशी करणारे सावरकर हिंदूत्ववाद्यांसही नकोच असतात. सावरकरांच्या गाय, गर्दभ, डुक्कर आदींबाबतच्या खणखणीत मतांस आज कोणी स्पर्शही करणार नाही. तेव्हा ते पूजनीय मानणे राहिले दूर. आणि दुसरे असे की सावरकरांचे टीकाकार तरी त्यांना यापेक्षा अधिक ‘मानाने’ कोठे वागवतात? राहुल गांधी यांस कथित माफी मागणारे सावरकर नको असतील तर त्यांनी विज्ञानवादी सावरकर आपलेसे करावेत. तेही नाही. स्वत: जानवे घालून, ते सर्वास दिसेल याची व्यवस्था करून एकविसाव्या शतकात मंदिरांच्या परिक्रमा करायच्या आणि त्या वेळी विज्ञानवादाची कास धरणाऱ्या सावरकरांवर टीका करायची हा दुटप्पीपणा झाला. सावरकरांबाबत हिंदूत्ववादीही तोच करतात आणि काँग्रेसीही त्याच मार्गाने पुढे जातात. या दुटप्पी राजकारणाच्या विश्लेषकांची पंचाईत ही हिंदूत्ववाद्यांनी सावरकर सोयीस्करपणे अंगीकारले असे म्हणून त्यांच्यावर टीका करावी तर दुसरीकडे काँग्रेसने तरी गांधी कुठे पूर्णपणे स्वीकारले, हा प्रश्न. याचा अर्थ इतकाच की प्रत्येकास आपापले नायक सोयीस्करपणे वापरून घेण्यातच रस. त्यात प्रत्येक जनसमुदायांनी आपापल्या नायकांची आपापसांत केलेली वाटणी. अशाने हा गुंता अधिकच वाढतो. सध्या तसे झाले आहे.
संपूर्ण विवेक हरवलेल्या आणि त्याची जाणीवही नसलेल्या समाजाचे हे लक्षण. बौद्धिकतेशी काडीमोड घेऊन सतत भावनेच्या पांगुळगाडय़ाच्या आधारे चालण्याची सोयीस्कर सवय लागली की त्या समाजात हे असे होते. ही सवय घालवायची कशी आणि ते करणार कोण, हा खरा प्रश्न. इतिहासात प्रखर बुद्धिवादासाठी ओळखल्या गेलेल्या व्यक्तिमत्त्वाचा उपयोग वर्तमानात उभय बाजूंनी अशा भावनाभरीच्या राजकारणासाठी केला जावा यापरते अधिक दुर्दैव ते कोणते?