मानवाच्या आदिम स्वभावाला जमिनीपेक्षा जलमार्ग आणि हवाई मार्गांची भीती अंमळ अधिक वाटते. ते नैसर्गिकच.
‘भीषणतम’ अशा एकाच शब्दात गुरुवारी घडलेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेचे वर्णन करता येईल. एकाच विमानाच्या अपघाताची ही भारतातील आजवरची सर्वांत भीषण दुर्घटना. ‘बोइंग’ या अमेरिकी कंपनीच्या सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ‘बोइंग – ७८७’ मालिकेतील विमानाला झालेला हा पहिलाच अपघात. मोठ्या शहरातील नागरी वस्तीत इतके प्रचंड विमान कोसळून जमिनीवर झालेली मनुष्यहानीही अशीच दुर्दैवी ऐतिहासिक. अशा अपघातांची फारशी सवय नसलेल्या सध्याच्या किमान दोन पिढ्यांसाठी ही घटना विलक्षण धक्कादायक ठरते. या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभर पसरलेली सुन्नता लवकरच निवळू लागेल. जखमा भरून यायला वेळ लागेल. अपघातासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे मिळण्यास कदाचित त्याहूनही अधिक वेळ लागेल. विमानातील प्रवाशांप्रमाणेच नजीकच्या वैद्याकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर, कर्मचाऱ्यांचाही हकनाक मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणीही अशा अनाहूत संकटाची कल्पना केली नसेल. अशा वेळी इतक्या भयानक अपघातानंतर एका मुद्द्यावर अनेकांकडून प्रतिक्रिया उमटताना दिसते. तो मुद्दा म्हणजे विमान प्रवासाची सुरक्षितता. या अपघाताच्या निमित्ताने हा मुद्दा तपासून पाहायला हवा.
एअर इंडियाचे ‘फ्लाइट एआय – १७१’ हे ‘बोइंग – ७८७’ बनावटीचे आंतरखंडीय विमान होते. अगदी अलीकडेपर्यंत अशी आंतरखंडीय प्रवासी विमाने मुंबई, दिल्ली, फार तर कोलकाता किंवा चेन्नई अशा मोजक्याच विमानतळांवरून झेपावायची. परंतु गेल्या ३० वर्षांत आलेली आर्थिक सधनता आणि व्यापारी संलग्नता अशा दोन घटकांमुळे भारतातील नवमहानगरेही आंतरखंडीय प्रवासी विमानांसाठी सिद्ध होऊ लागली आहेत. अहमदाबाद हे अशा नवमहानगरांपैकीच एक. या व अशा अनेक शहरांतून लंडन, सिंगापूर, दुबई अशा आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्रांशी थेट हवाई संपर्क प्रस्थापित झाला आहे, होत आहे. या थेट संपर्कासाठी विशेषत: लंडनसारख्या सुदूर शहरांपर्यंत विनाथांबा थेट हवाई सेवेचे महत्त्वही वाढू लागले आहे. ‘बोइंग – ७८७’सारखी विमाने यादृष्टीने महत्त्वाची. अधिक प्रवासी आणि दीर्घ पल्ला हे या विमानांचे वैशिष्ट्य. बोइंग कंपनीचे आधीचे ‘बोइंग – ७४७’ हे विमान निवृत्तीच्या मार्गावर आहे. प्रवासी हवाई वाहतूक क्षेत्रातील ते पहिले अजस्रा आणि सर्वाधिक सुपरिचित विमान. बोइंगच्या मुकुटातील मेरुमणी. पण कालौघात अशी अजस्रा विमाने वापरणे आणि त्यांची देखभाल-दुरुस्ती विलक्षण खर्चीक ठरू लागली. काही तरी पर्याय शोधावा लागणार होता. तेव्हा त्यांची जागा घेण्यासाठी बोइंगने या सहस्राकाच्या पहिल्या दशकात ‘ड्रीमलायनर’ असे आकर्षक नामकरण झालेले विमान बाजारात आणले. हेच ते ‘बोइंग – ७८७’. दरम्यानच्या काळात एअरबस कंपनीने त्यांचे अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘ए – ३८० सुपरजंबो’ हे महाकाय विमान दाखल केले होतेच. त्यांचा उद्देश ‘बोइंग – ७४७’ विमानाशी थेट स्पर्धा करणे हा होता. पण अधिकतम प्रवासी क्षमता नव्हे, तर अधिकतम अंतर विनाथांबा गाठणे हेच हवाई क्षेत्राचे भविष्य आहे, अशी भूमिका बोइंगने घेतली. यातूनच ‘बोइंग – ७८७’ चा जन्म झाला. तोपर्यंत एअरबस कंपनीलाही अजस्रा विमाने चालवण्यातील खर्चीक फोलपणा कळू लागला आणि विविध देशांकडून या विमानास असलेल्या मागणीतील उदासीनताही जाणवू लागली. त्यामुळे ‘ए – ३८०’ प्रकल्प त्यांना अल्पावधीतच गुंडाळावा लागला आणि ‘बोइंग – ७८७’ विमानाशी टक्कर घेण्यासाठी ‘ए- ३५०’ हे नवे कोरे विमान त्यांनी बाजारात आणले. खंडांतर्गत आणि शेजारी देशांमध्ये, तसेच देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात छोटी व मध्यम विमाने वापरली जातात. पण मोठ्या अंतरांसाठी, आंतरखंडीय प्रवासासाठी ‘बोइंग – ७८७’, तसेच आता ‘एअरबस ए – ३५०’ हेच सक्षम आणि किफायतशीर पर्याय ठरतात. त्यांच्यासाठीचे सुरक्षा उपायही तितकेच काटेकोरपणे पाळले जातात. यामुळेच मोठी विमाने दुर्घटनाग्रस्त होण्याचे प्रमाण अत्यल्प असते. यास्तव त्यांच्यातून प्रवास करणे हादेखील सर्वाधिक सुरक्षित पर्याय ठरतो.
ही जाणीव आवश्यक. कारण अशा घटनांमुळे विमान प्रवासाविषयी निष्कारण भीती उत्पन्न होते किंवा काही वेळा तशी ती निर्माण केली जाते. पण आकडेवारी वेगळेच सांगते. भारतासारख्या देशात जेथे रस्ते वाहतुकीमध्ये शिस्तीची बोंब आहे तेथे जितकी माणसे वर्षभरात रस्ते अपघातांमध्ये मरतात, तितकी गेल्या ५० वर्षांत जगभरातील एकूण विमान अपघातांमध्ये मिळूनही दगावलेली नाहीत. ‘आयआयटी’ दिल्लीच्या एका अभ्यासानुसार, २०२१ या एका वर्षात भारतात रस्ते अपघातांमध्ये २ लाख १४ हजार नागरिक मृत्युमुखी पडले. केंद्रीय पत्रसूचना कार्यालयाने हा आकडा १,५३,९७२ इतका नोंदवला. पत्रसूचना कार्यालयाची २०१८ ते २०२२ अशी पाच वर्षांच्या आकडेवारीची सरासरी वार्षिक दीड लाखाच्या थोडी वर दिसून येते. म्हणजे इतके जण रस्त्यांवर प्राण सोडतात. हे खरे की विमान उड्डाणांमध्ये इतर कोणत्याही वाहतूक माध्यमापेक्षा जोखीम सर्वाधिक असते आणि म्हणूनच खबरदारीदेखील सर्वाधिक घेतली जाते. प्रत्येक दुर्घटना ही विमान कंपन्या, तपास यंत्रणा, विमान सुरक्षा यंत्रणांसाठी नवीन धडा ठरतो. अपघाताच्या कारणांची चर्चा होते, तपासणी होते. शिवाय ही कार्यवाही राष्ट्रातीत असते. म्हणजे एका देशातील विमान अपघाताचा धडा सर्व देश घेतात आणि त्याप्रमाणे सुधारणा/बदल करतात. या क्षेत्रात अमेरिका आणि युरोप यांची अनभिषिक्त द्वि-मक्तेदारी. त्या प्रांतांतील औद्याोगिक आणि वैज्ञानिक प्रगतीमुळे विमान प्रवास अधिकाधिक सुरक्षित बनवला गेला. विमानाच्या बांधणीपासून ते वैमानिकांच्या, तसेच हवाई वाहतूक नियंत्रकांच्या प्रशिक्षणापर्यंत अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धती अंगीकारल्या गेल्या. एखादे विमान उड्डाणसिद्ध आहे की नाही याची तपासणी प्रत्येक वेळी सारखेच निकष वापरून केली जाते. विमानाच्या उड्डाणाआधी, उड्डाणाच्या वेळी, विमान हवेत असताना आणि जमिनीवर उतरताना कोणती पथ्ये पाळावयाची, कोणती काळजी घ्यायची, आणीबाणीमध्ये सर्वप्रथम काय करायचे याचे प्रशिक्षण संबंधितांना दिलेले असते, शिवाय दक्षतायादीही वेगवेगळी उपलब्ध असते. ही शिस्त जगभरातील सर्व विमान कंपन्या, वैमानिक, कर्मचारी, संबंधित यंत्रणा पाळतात. शिस्त पाळल्यानेच दुर्घटना कमी होतात. शिवाय त्यांची पुनरावृत्ती टाळली जाते.
पण तरीदेखील अपघात होतात. कारण यंत्र आणि मानव आजही अनिश्चिततेपासून मुक्त नाहीत. यांत्रिक चूक, मानवी चूक, नैसर्गिक आपत्ती किंवा घातपात असे विमान दुर्घटनांचे चारच प्रकार आहेत. दक्षतेचा दर्जा व्यक्तिसापेक्ष क्वचित बदलू शकतो. मानवी निर्णयक्षमता हेलकावे खाऊ शकते. निसर्ग तर अलीकडे विलक्षण लहरी झालेला आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये जगात विविध ठिकाणी संघर्ष उडू लागलेत. तरीही या उद्याोगाचे ध्येय शून्य विमान अपघात हे आहे. तूर्त ते कल्पित वाटेल. पण असे ध्येय हेच विमान प्रवासास अधिकाधिक सुरक्षित बनवते हे लक्षात घ्यायला हवे. मानव उत्क्रांत होत असताना त्यास जमिनीचा आधार होता. पुढे प्रगती होत गेली, तशी जलमार्ग, हवाई मार्ग ही संक्रमणाची नवी माध्यमे विकसित झाली. पण जमिनीशी नाळ काही तुटली नाही. त्यामुळेच मानवाच्या आदिम स्वभावाला जमिनीपेक्षा जलमार्ग आणि हवाई मार्गांची भीती अंमळ अधिक वाटते. ते नैसर्गिकच. पण ‘सुरक्षित’ रस्त्यांवर जीव जाणाऱ्यांची संख्या हवेतील प्रवासाची भीती कमी करण्यास मदत करेल. रस्त्यावरच्या असंख्य अपघातांतून आपण काहीच शिकत नाही, याची अनंत उदाहरणे असताना प्रत्येक विमान अपघात हा मानवी ज्ञानाच्या कक्षा किती रुंदावतो आणि ते ज्ञान कसे आत्मसात केले जाते हे पाहिल्यास विज्ञानाविषयीचा आदर दुणावेल. अहमदाबाद दुर्घटनेनंतर दोनच तासांनी सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ विमान वाहतुकीसाठी सिद्ध झाला. या अपघातात ज्यांचे प्राण गेले त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत. विमानातले काय किंवा जमिनीवरचे काय; सगळेच अंतिमत: एकाच दिशेने जाणार हे सत्य असले तरी उडण्याचे आकर्षण उत्तरोत्तर वाढतच जाईल. या उडण्यात पृथ्वीच्या आदिम गुरुत्वाकर्षणी ताकदीवर मात करण्याची प्रेरणा आहे. तीच मानवी आशेचे कारण. ही ज्ञानाधारित आशा सगळ्या संकटांवर मात करण्यासाठी मानवाला प्रवृत्त करत राहील. माणसाच्या आकांक्षापुढे हे गगन खरोखरच ठेंगणे आहे. म्हणूनच दुर्घटनांमधून शिकत, सुधारत हवाई क्षेत्र विस्तारतच जाणार आहे