अजित कवटकर
सोने हा पाहायला गेले तर अन्य धातूंप्रमाणेच एक धातू, पण त्याची मोहिनी सर्व काळांत आणि जवळपास सर्व संस्कृतींत दिसते. झळाळी, टिकाऊपण, कमालीची लवचिकता, गंज चढण्याची शक्यता शून्य, निसर्गात अतिशय शुद्ध रूपात प्राप्त होते. दोष मात्र दोनच : दुर्मीळता आणि त्यामुळेच फार मौल्यवान. पौराणिक कथांमधून, प्राचीन साहित्यात नमूद सोन्याच्या आकर्षणाचे उल्लेख लक्षात घेता या धातूशी मानवाचे संबंध हजारो वर्षं पूर्वीपासूनचे आहेत, हे अधोरेखित होते. असे म्हणतात, सोन्यास प्राचीन ईजिप्तमधील संस्कृतीने सर्वप्रथम जगासमोर सादर केले. त्याकाळी ईजिप्तमधील काही प्रसिद्ध पिरॅमिड्सची शिखरे ही शुद्ध सोन्याची होती असा उल्लेख त्यांच्या पौराणिक कथांमध्ये करण्यात आला आहे. तसेच, तुर्कस्तानातील एका प्राचीन संस्कृतीमध्ये ‘कनक’चा वापर चलन म्हणुन सर्वप्रथम केला गेला, असा कयास आहे. सोन्याकडे सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून बघण्याची सवय ही ग्रीकांनी घालून दिली आणि आता तर संपूर्ण जग त्या मापदंडाचे अनुकरण करत आहे.

आपल्या प्राचीन भारतीय साहित्यातील सोन्याचे उल्लेख त्याचे महत्त्व दर्शवतात. यासगळ्याची प्रचिती आज त्याच्या मागणी व किंमतीने गाठलेल्या विक्रमी उच्चांकांवरून येते. सोन्याची सर्वाधिक मागणी असलेल्या व सर्वाधिक आयात करणाऱ्या देशांत भारत दुसऱ्या स्थानी आहे. यावरून या धातूविषयी आपली आसक्ती व आकर्षण दिसून येते. परंतु आपली आजची अर्थव्यवस्था आणि देशाच्या व्यापार संतुलनाच्या दृष्टीने हे कितपत मारक वा सहाय्यक ठरू शकते? तसेच या धातूचा वापर केवळ दागिने बनवून ते तिजोरीत ठेवून, एका पिढी कडून दुसऱ्या पिढीला ते हस्तांतरीत करण्यासाठीच होणे योग्य वा व्यवहार्य आहे का?

भारतीय संस्कृतीसाठी सोने म्हणजे मान, सन्मान, प्रतिष्ठा होय. त्याचा संचय करणे व शुभ प्रसंगी त्याचे आभूषणांच्या रूपात प्रदर्शन करून त्याद्वारे स्वत:ची कीर्ती वाढवणे, श्रीमंतीची ताकद दाखवणे, उच्च सामाजिक स्तराचा पुरावा देणे आणि यासगळ्यासाठी सुवर्णाहून श्रेष्ठ इतर काही क्वचितच मानले जात असे. त्यामुळे त्याकाळी गुंतवणूक म्हणून त्याचा वापर वा व्यापार हा काही विशिष्ट सामाजिक, व्यापारी वर्ग करत असे. या धातूच्या संचयनाला ‘डेड इन्व्हेस्टमेंट’ म्हणून बोल लावले गेले. परंतु परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. भारतातील त्याच्या, प्रती – तोळा किंमतीचा चढता आलेख बघितला तर आजच्या अर्थव्यवस्थेत याहून अधिक फायदेशीर गुंतवणूक अभावानेच सापडेल.

२००० साली सोन्याची सरासरी किंमत होती प्रती तोळा रू.४४००/-, सन २०१० ला रू.१८५००/-, सन २०२० ला रू. ४८०००/- च्या आसपास, सन २०२५ च्या ऑक्टोबर महिन्यात दराने रू.१२७०००/- चा उच्चांक गाठला. आजच्या अस्थिर जागतिक वातावरणात सोनं हे गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह म्हणून स्थिरावत आहे. कमजोर होणारा डाॅलर, वाढता भौगोलिक राजकीय ताणतणाव, सेंट्रल बँकांकडून वाढणारी सोन्याची मागणी, यूएस फेडरल रिझर्व्ह कडून करण्यात आलेली दरकपात, वर्षाला जवळपास ३००० टन एवढीच जागतिक निर्मिती तसेच आर्थिक व राजकीय अस्थिरतेत – अस्वस्थतेत सोन्यातील गुंतवणूक सर्वांना सुरक्षित, भरवशाची, विसंबण्याजोगी वाटणे. या आणि अशा इतर अनेक कारणांमुळे सोन्याच्या किमतीत कमालीची घोडदौड बघायला मिळत आहे.

भारतामध्ये सोने हे देवी लक्ष्मी, उन्नती, आशीर्वादाचे प्रतीक आहे. येथील लग्न कार्य तर याशिवाय अशक्यच. भेट म्हणुन दिले गेलेले सोन्याचे दागिने व वस्तु यांच्याशी एक भावनिक नाते निर्माण होते आणि एक सांस्कृतिक वारसा म्हणुन ते पिढ्यानपिढ्या राखून ठेवण्यात येते आणि ‘स्टेट्स सिम्बॉल’ म्हणुन अजून अधिक नवीन विकत घेतले जाते. त्यामुळेच याचा देशातील घरगुती साठा हा फार प्रचंड आहे. अक्षय तृतीये सारख्या अनेक सणांनी तर याच्या खरेदीची प्रथा – परंपरा प्रस्थापित केली आहे. ग्रामीण भागांमध्ये तर बँकिंग व्यवस्थेपेक्षा लोक यावरच अधिक विश्वास ठेवून ते मालमत्तेच्या रूपात स्वताच्या हाताशीच ठेवणे पसंत करतात. या ना त्या कारणांसाठी त्यामुळे येथील प्रत्येक स्तरावरील माणसाकडून आपल्या कुवतीनुसार थोडे – बहुत सोने खरेदी केले जातेच, मग किंमत किती का असेना! यामुळे जागतिक स्तरावर सर्वाधिक सोने आयात व उपभोग करणाऱ्यांमध्ये भारत हा वरच्या क्रमांकावर आहे. परंतु याचा प्रतिकूल परिणाम हा भारताच्या व्यापार संतुलनावर होत असल्याचे दिसते आणि त्यात सुधारणा घडवून आणण्याकरिता मग आयात निर्बंध वा इतर फायदेशीर गुंतवणुकीसाठीच्या सरकारी योजना आणल्या जातात. त्यामुळे, वर्षानुवर्षं तिजोरीत पडून राहिलेल्या जुन्या सोन्याच्याच नव्या घडवणीतून पुनर्वापर करण्याची सवय रुजल्यास, हे अर्थव्यवस्था व व्यापार संतुलनाच्या दृष्टीने अधिक हितकारक ठरेल, असे मत अनेक जाणकारांनी अनेकदा मांडले आहे.

सोन्याने गाठलेला उच्चांकी दर याच्या परिणामांची दुसरी बाजू पहाता, आज आपल्या सांस्कृतिक – पारंपरिक सवयींमुळे का होईना पण सर्वसामान्यांनी साठवून ठेवलेले सोने हे त्यांना अनेक प्रकारे आधार देणारे व उत्पादनक्षम – निर्मितीक्षम ठरणार आहे. यातील अनेक पर्यायांपैकी एक म्हणजे ‘सोने तारण कर्ज’. सोन्याच्या आजच्या किमतींमुळे सोने तारण कर्जदाराला ‘कर्ज ते मूल्य गुणोत्तर’ प्रमाणात आधीपेक्षा अधिकची प्राप्ती होऊ शकते. जिथे इतर तारण कर्जासाठी हे गुणोत्तर ५०% ते ६०% असते, तिथे सोने तारण कर्जाला ८०% ते ८५% प्राप्त होते. त्याशिवाय या कर्जावर आकारला जाणारा कमी व्याजदर; याचा ‘क्रेडीट स्कोअर’वर कसलाही परिणाम होत नाही. या कर्जाला पटकन मंजुरी मिळून – कर्ज ताबडतोब अर्जदाराला वितरीत केले जाते आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे गहाण ठेवलेले सोने ही बँकेची जबाबदारी असते जे त्यांच्या सेफ डिपॉझिट वाॅल्टमध्ये सीलबंद व सुरक्षित राहते. एकीकडे कर्जदार त्या सोन्यावर मिळालेल्या कर्जाचा कार्यक्षम वापर करून परिस्थिती अधिक अनुकूल करत असतो, तर दुसरीकडे गहाण ठेवलेल्या सोन्याची किंमत अधिक वाढत राहिली तर त्याच्या मालमत्तेचे मूल्यदेखील त्या कालावधीत वृद्धींगत होत असते. हा व्यवहार म्हणजे सोन्याहून पिवळे आणि त्यामुळेच अलिकडच्या काळात या कर्ज प्रकाराने जबरदस्त उचल घेतलेली दिसते. मौल्यवान सोने नुसते कुठेतरी वर्षानुवर्ष बंदिस्त करून ठेवण्यापेक्षा, ते व त्यावरील आपला संपूर्ण हक्क कायम राखात जर त्यास अडीअडचणी वेळी उपयोगात आणून परिस्थिती सुधारता येणे शक्य असेल तर मग तसे करण्यात संकोच कसला?

खोल अवकाशातून पृथ्वीच्या खोल भूगर्भात असा प्रवास करणारा सुवर्ण म्हणूनच अनन्यसाधारण आणि फार दुर्मीळ, तेजस्वी. सोन्याला भाव : सोने तारण कर्जाला वाव, ही त्यातूनच सर्वसामान्यांसाठी निर्माण झालेली एक अधिक फायदेशीर संधी होय.
ajit.kavatkar@gmail.com