उज्ज्वला देशपांडे
गोपाळ गणेश आगरकर हे १८८८ ते १८९५ अशी सात वर्षे ‘सुधारक’ या साप्ताहिकाचे संपादक होते. त्याआधी १८८१ ते १८८७ अशी सात वर्षे ते ‘केसरी’चे संपादक होते. पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल ते फर्ग्युसन कॉलेजच्या काळात त्यांनी १२ वर्षे अध्यापनाचे काम केले.‘सुधारक’ मध्ये लिखाण करताना आगरकरांनी हे नेहमी भान ठेवले की भविष्यकाळात समाजाला उपकारक ठरणारा विचार स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने मांडणे महत्त्वाचे आहे. बुद्धीच्या माध्यमातूनच सत्य समजून घेता येईल, असे आगरकर मानत. त्यांचा जन्म १४ जुलै १८५६ चा आणि त्यांचे निधन १७ जून १८९५ रोजी झाले. आज आगरकरांची १३० वी पुण्यतिथी.
आगरकरांच्या काळात शिक्षण ही काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती. त्या परिस्थितीत त्यांनी ‘शिक्षण सर्वांसाठी’ या तत्त्वासाठी झगडत, रूढी, परंपरा, धर्मांधता यांच्याशी टक्कर घेतली. त्यांनी शिक्षणात ‘विवेक, विज्ञाननिष्ठा, सामाजिक समता आणि स्वतंत्र विचार’ या मूलभूत मूल्यांचा आग्रह धरला.
आजची शिक्षणपद्धती वरवर पाहता सर्वसमावेशक वाटते. डिजिटल वर्ग, ऑनलाईन शिक्षण, स्मार्ट शाळा, आणि जगभरातील माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे, परंतु
१. विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवलं जातं का?
२. शिक्षण माणूस घडवतं की केवळ पदवीधारक (बऱ्याचदा नोकरी मिळण्याची शाश्वती नसलेली पदवी)?
३. नैतिकता, विवेक आणि सामाजिक जबाबदारी यांचं शिक्षण कोण देतं?
‘सर्वसमावेशकता’ हा तर भास, भ्रम वाटावा अशी परिस्थिती आहे. अभ्यासक्रमात तंत्रज्ञान, उद्योजकता, पर्यावरण जागरूकता अशा आधुनिक संकल्पनांचा समावेश केला जातो, पण हे सर्व वरवरचं आहे. प्रत्यक्षात शिक्षणव्यवस्था अजूनही जुन्याच चौकटीत अडकलेली आहे. जिथे गुण, परीक्षा आणि पाठांतर हेच यशाचे निकष मानले जातात. समावेशक शिक्षण म्हणजे केवळ सर्वांना एकाच वर्गात बसवणे नव्हे, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा, पार्श्वभूमी, भाषा, शिकण्याची शैली आणि भावनिक गरज लक्षात घेऊन शिक्षण देणे होय. पण आजही अनेक शिक्षण संस्थांमध्ये दिव्यांग, आदिवासी, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी योग्य सुविधा नाहीत. शैक्षणिक संस्था म्हणजे परीक्षा केंद्रे झाली आहेत. शिक्षण म्हणून आगरकरांना हे नक्कीच अपेक्षित नव्हते.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

आगरकरांना दिसले असते की आजचा विद्यार्थी चांगले गुण मिळवतो, परीक्षा उत्तीर्ण होतो, पण समाजातील अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, पर्यावरणीय संकटे या बाबतीत त्याला वैचारिक जागरूकता आहे का? त्यावर आधारित प्रत्यक्ष कृती तो करतो का? शिक्षणाचं ‘वस्तु’करण झालं आहे – माहिती आहे, ज्ञान नाही; गती आहे, पण दिशा नाही.

समाजात प्रश्न उपस्थित करणाऱ्या शिक्षकांना तुरूंगात टाकले जाते, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतात… हे सर्व आगरकरांनी सोसले. परंतु तेव्हा शिक्षकांना गप्प करणारे परकीय सत्ताधारी होते. त्यांना सर्वसामान्य माणूस जागरूक व्हायलाच नको होता. आता स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनीदेखील शिक्षकांशी असेच वागणारे सत्ताधारी आहेत. मुख्य म्हणजे ते आता परकीय नाहीत, तर आपलेच आहेत आणि त्यांनाही ‘सर्वसामान्य माणूस जागरूक होऊ नये असेच वाटते ते का?

स्त्री सुधारणेचा विचार मांडताना आगरकर म्हणतात, “धर्माचा, रूढीचा, घराण्याचा आधार घेऊन वैवाहिक जीवनाची सर्व बंधने स्त्रियांनी पाळली पाहिजेत असा दंडक निर्माण झाला. सामाजिक व्यवहारातून, शिक्षण-ज्ञानाच्या क्षेत्रातून तिची हकलपट्टी करण्यात आली. या सर्वांचा परिणाम कुटुंब व्यवस्थेतील स्त्रीच्या जीवनावर झाला. समाजात मोठी प्रगती साधायची असेल तर स्त्री शिक्षणाचा महत्त्वपूर्ण विचार व व्यवस्था करावी लागणार आहे,” असा आग्रह आगरकरांनी आपल्या निबंधातून व्यक्त केला होता. १८८८ मधील पुण्यातल्या परिस्थितीनुसार मांडलेले हे विचार आणि आत्ताच्या २०२५ मधल्या हुंडाबळीच्या घटना बघता स्त्री-सुधारणेचा आलेख आपण कुठे नेऊन ठेवला आहे?

दुसऱ्या कोणीतरी आपली किंमत ठरविण्याआधी आपण आपले मोल ओळखायला कधी शिकणार? भरजरी कपडे, दागिने, गाड्या, ‘देखाव्याचा मोठेपणा’ यासारख्या वरवरच्या गोष्टींवर स्वतःची किंमत मातीमोल करण्यापेक्षा वैचारिक प्रगल्भता, भावनिक समतोल, शारीरिक आरोग्य यावरच आयुष्य मौल्यवान होते हे आपण कधी समजून घेणार? आगरकरांच्या काळात बायकांना ‘स्वातंत्र्याचा’ पर्याय मिळवण्यासाठी खूप खूप खस्ता खाव्या लागल्या. आपल्याला आता अनेक पर्याय उपलब्ध असतानाही आपण स्वतःला ‘दिखाव्याच्या बुरख्यात’ का बरे बंदिस्त करत आहोत?
आगरकरांना हे ही जाणवले असते की विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे – अपयशाची, स्पर्धेची, आणि मुख्यतः विचार मांडण्याची. हे त्यांच्यासाठी चिंतेचे कारण ठरले असते; कारण आगरकरांच्या दृष्टीने शिक्षण हे ‘सुधारणेचे साधन’ असावे, सामाजिक मागासलेपण असलेल्या समाजाला जागृत करण्याचे साधन असावे. आज मात्र शिक्षण घेतलेली माणसेही (शिक्षण घेतलेली माणसेच) अनेकदा अंधश्रद्धा, निरर्थक परंपरा आणि कालबाह्य चालीरीतींना धरून बसलेली दिसतात. या विरोधाभासावर विचार करणे काळाची गरज आहे.

आजच्या शिक्षणप्रणालीत वैचारिक स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचार यांचा अभाव दिसून येतो. गुण मिळवणे, नोकरी मिळवणे आणि आर्थिक स्थैर्य मिळवणे हे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट मानले जात आहे. त्यामुळे मूल्यशिक्षण, विवेकबुद्धी आणि सामाजिक जाणीवा या गोष्टी दुय्यम ठरतात. परिणामी, अनेकदा ‘शिक्षित’ लोकही अंधश्रद्धा पाळताना दिसतात.

शिक्षणामुळे माणसाची विचारपद्धती समंजस, विवेकी आणि आधुनिक व्हायला हवी. पण केवळ परीक्षाभिमुख शिक्षण घेतल्यामुळे अशी परिवर्तनशीलता साध्य होत नाही. शिक्षण हे केवळ पदवीधारक तयार करणारे नसून विवेकानुसार कृती करण्याची प्रेरणा देणारे असावे. यासाठी शिक्षणपद्धतीत काही मूलभूत बदल आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल असे शिक्षण द्यायला हवे. केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे नाही; त्याचबरोबर त्यातून व्यवहारात योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि सजग नागरिकत्व विकसित व्हायला हवे. शिक्षण म्हणजे फक्त अक्षरओळख नव्हे, तर ‘समाजपरिवर्तनाचे साधन’ हे भान ठेवणे गरजेचे आहे. आगरकरांचा हा विचार आजही तितकाच लागू आहे.

आगरकर हे माणसाच्या विचारस्वातंत्र्याचे आणि विवेकाचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे त्यांना आताच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात पुढील प्रश्न पडले असते:

  1. एआयवर अवलंबून राहणारा विद्यार्थी स्वतंत्रपणे विचार करणार कसा?
  2. मूळ स्रोत समजून न घेता उत्तरे मिळवणे म्हणजे ‘बौद्धिक आळशीपणा’ नव्हे का?
  3. नैतिकतेचा अभाव, चुकीची माहिती, पूर्वग्रहदूषित डेटा — याबाबत जबाबदारी कोणाची?
  4. शहरांतील विद्यार्थ्यांना हाय-टेक शिक्षणाची उपलब्धता असताना, ग्रामीण भागात इंटरनेटसुद्धा मिळत नाही, असंख्य अडचणी येतात. ही तफावत त्यांना मान्य झाली नसती.

“लोकशिक्षणाच्या जुन्या पद्धतीत आम्ही नव्या काळाला साजेशी अशी काही सुधारणा करीत नाही”, अशी तक्रार करून आगरकर म्हणायचे, “आम्ही मोठे झालो तरी आमचे जुने अंगडे टोपडे आम्हास अद्याप सुटत नाही.” आजच्या तंत्रज्ञानाधारित युगात, आपण जर पुन्हा विचार न करता, तयार स्वरूपात उत्तरे स्वीकारू लागलो, तर तोच बुरसटलेल्या गुलामीपणाचाच नवीन अवतार ठरेल. आजच्या तंत्रज्ञानाधारित युगात चॅटजीपीटी, यूट्यूब यांसारखी साधने अत्यंत उपयुक्त ठरली आहेत. परंतु जर आपण विचार न करता त्यावर दिलेली उत्तरे जशीच्या तशी स्वीकारू लागलो, तर ती बौद्धिक आळसाची सुरुवात ठरते. उदाहरणार्थ, विद्यार्थी प्रकल्प तयार करताना सरळ इंटरनेटवरचे उत्तर कॉपी करतात, त्यामागचा विचार किंवा सृजनशीलता वापरत नाहीत. समाज माध्यमांवर येणाऱ्या अफवा, अंधश्रद्धा, खोट्या बातम्या विचार न करता पुढे पाठवणे हीसुद्धा त्याच गुलामीची लक्षणे आहेत. विचार न करता गोष्टी स्वीकारणे म्हणजे मेंदूचे स्वातंत्र्य गमावणे — हीच नव्या युगातील बुरसटलेली गुलामी होय. स्वतंत्र भारतात वैचारिक गुलामगिरीविरोधात लढताना आगरकरांनीचे विचार मार्गदर्शक ठरतात. त्यानुसार कृती हीच आगरकरांना आदरांजली ठरेल.
ujjwala.de@gmail.com
Ujjwala Deshpande ujjwala.de@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopal ganesh agarkar social reforms ahead of time today s reality css