पश्चिम बंगालमधील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवरील सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या आणि महाराष्ट्रातील बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे देश हादरला असतानाही दररोज स्त्रियांवरील अत्याचारांच्या नवनव्या घटना उघडकीस येत आहेत. असा एकही दिवस उजाडत नाही की, ज्या दिवशी बलात्काराची घटना घडल्याचे वृत्त येत नाही. यावरून समाजात विकृत मनोवृत्ती किती भयंकर प्रमाणात फैलावत आहे हे स्पष्ट होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची फक्त भाषा केली जाते. पण अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी कडक कारवाई केली जात नाही. कायदे आहेत पण त्यांची अंमबजावणी करणारी यंत्रणा सक्षम, प्रामाणिक आणि कर्तव्यतत्पर असल्याचे अभावानेच आढळते. अशा स्थितीत देशातील स्त्रियांवरील अत्याचारांचा आलेख चढाच राहणे स्वाभाविक आहे.

समाजाचा अमानवी चेहरा स्पष्ट करणारा उज्जैन येथे झालेला बलात्कार आणि लखनौमध्ये झालेला बलात्काराचा प्रयत्न हे यंत्रणांच्या नाकर्तेपणाचे, त्यांचा वचकच नाहीसा झाल्याचे लक्षण आहे. मध्यप्रदेशातील उज्जैन येथे वर्दळीच्या रस्त्यावरील पदपथावर एका भीक मागणाऱ्या महिलेवर एका भाजी विक्रेत्याने बलात्कार केला. असे काही घडले की लोक पाहत राहतात, मात्र कोणीही विरोध करण्यासाठी पुढे येत नाही. एवढेच नव्हे, तर काहीजण निर्लज्जपणे घटनेचे चित्रिकरण करतात आणि त्या चित्रफिती प्रसारितही करतात. याचा अर्थ माणुसकी पार थिजून गेली असून समाज भावनिकदृष्ट्या बधीर झाला आहे.

आणखी वाचा-कुलगुरू पदाची अवनती जुनीच… डॉ. रानडे हे त्यातील नवे पान!

दुसरी घटना उत्तरप्रदेशातील लखनौ येथील आहे. एक महिला आपल्या आजारी पतीला रुग्णवाहिकेतून सिद्धार्थ नगरला घेऊन जात असताना रुग्णवाहिका चालकाच्या सहकाऱ्याने त्या महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. त्या महिलेने याला सर्वशक्तीनिशी विरोध केला म्हणून तिच्या पतीचा ऑक्सिजन मास्क काढून खाली ढकलून दिले. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटना कशाचे लक्षण आहे? कुठे चालला आहे आपला भारत? हीच का भारतीय सभ्यता आणि संस्कृती?

एकीकडे आज कायदा व पोलीस यंत्रणेचा समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर अजिबात वचक राहिलेला नाही. तर दुसरीकडे समाजात ज्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा अशी माणसे बोटावर मोजण्याइतकीच शिल्लक आहेत. अलीकडे मोठ्यांचा सन्मान, आदरयुक्त भीती आणि समाजाचा वचक शिल्लकच राहिला नाही. तसेच कुटुंबातील वाढते कलह, मुलामुलींचे स्वैरपणे जगण्याचे वेड आणि आई-वडिलांचा कुठलाही धाक नसण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. म्हणजे कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय कोणत्याच स्तरावर नीतिमत्ता शिल्लक राहिलेली नाही. पोलीस, वकील, शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभही पोखरले गेले आहेत. काही अपवाद वगळता घटनात्मक नीतिमत्ता लयालाच गेल्याचे दिसते.

याला काहीप्रमाणात मोबाइलमुळे हातात आलेले जगही कारणीभूत आहे. समाजाच्या सर्वच घटकांमध्ये मोबाइलचा अतिवापर होत आहे. आबालवृद्ध मोबाइलवेडे झाले आहेत. हाती आलेल्या तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या रितीने झाला तर ठीक. तशी उदाहरणेही आहेत, पण ती मोजकीच. त्याऐवजी अश्लील छायाचित्रे, नग्नता, पोर्नोग्राफी पाहणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. स्त्रियांकडे मालकीची, उपभोगाची वस्तू म्हणून पाहण्याच्या मनोवृत्तीला अशा आशयामुळे खतपाणी मिळते. लैंगिक विकृती बळावतात. परिणामी अशा अत्याचारांच्या घटनांत वाढ होते.

आणखी वाचा-आता मराठवाड्यासह महाराष्ट्रात शेतीसाठी ‘जैविक संग्राम’ हवा!

बेरोजगारीची समस्या या विकृतींत अधिकच भर घालत आहे. रिकामे हात आणि रिते डोके यामुळे शिक्षित, उच्च शिक्षित तरुण निराश झाले आहेत. अशी मुले कोणत्याही आमिषाला सहज बळी पडतात. गुन्हेगारी जगतातील मोठे मासे, राजकीय नेते त्यांना अशी क्षुल्लक आमिषे दाखवून हक्काचे गुंड, कार्यकर्ते, प्रचारक घडवतात. असे तरुण योग्य काय आणि अयोग्य काय हे समजून घेण्याची क्षमता गमावून बसतात. मौज, मजा आणि बाई बाटलीच्या आहारी जातात. राजकीय व गुन्हेगारी प्रवृत्तींचे हस्तक होतात. म्हणून संपूर्ण समाजाचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे.

अशा या भयावह परिस्थितीत समाजाने जागृत राहून अशा घटनांना आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्न केला पाहिजे. तसेच पोलीस यंत्रणेने अत्यंत दक्षतेने व संवेदनशील राहून अशा घटनांची तातडीने दखल घेतली पाहिजे. गुन्हेगारांवर कडक कारवाई केली पाहिजे. गुन्हेगार कितीही मोठा असो त्याला संरक्षण न देता कायद्याने कठोर शिक्षा व्हावी म्हणून विनाविलंब तपास केला पाहिजे, न्यायालयात तग धरू शकतील, असे सबळ पुरावे गोळा केले पाहिजेत. न्यायालयानेदेखील अशा घटनांमध्ये विनाविलंब निर्णय देऊन गुन्हेगारांना कठोर शिक्षा ठोठावली पाहिजे. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांनी अशा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न टाळले पाहिजेत. गुन्हेगाराची जात, त्याचा धर्म, पंथ, प्रांत, पक्ष याचा विचार न करता त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी कायदेशीर यंत्रणांना सर्वतोपरी सहकार्य केले पाहिजे.

आणखी वाचा-शिक्षणावर जनरेटिव्ह एआयचा प्रभाव

या साऱ्यात सर्वांत महत्त्वाची भूमिका आहे ती कुटुंबीयांची. मुलामुलींना योग्य संस्कार मिळावेत, स्त्री-पुरुष समतेची बिजे त्यांच्या मनात बालपणीच पेरली जावीत, यासाठी कुटुंबच योग्य भूमिका बजावू शकते. त्यांना नैतिक अनैतिक काय याची शिकवण दिली पाहिजे. प्रेम म्हणजे काय, हे समजून सांगितले पाहिजे आणि प्रेमातून होणारे लैंगिक शोषण म्हणजे खरे प्रेम नाही, हे देखील त्यांना पटवून दिले पाहिजे. पाल्यांना त्यांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी पूर्ण स्वातंत्र्य देतानाच त्यांना स्वातंत्र्य आणि स्वैराचारातील तफावत लक्षात आणून देणे, हे देखील पालकांचेच कर्तव्य आहे. ही तारेवरची कसरत यशस्वी करणे भाग आहे. पाल्यांच्या मित्र-मैत्रीण कोण आहेत, ते मोबाइल किंवा संगणकावर नेमक्या कोणत्या स्वरूपाचा आशय पाहतात, त्यांचे छंद, आवडीनिवडी कोणत्या आहेत, हे पालकांनी जाणून घेतले पाहिजे. मुलांशी संवाद साधत राहणे अपरिहार्य आहे. मुलामुलींसोबत मैत्रीपूर्ण संबंध जोपासले जातील यासाठी आवर्जून प्रयत्न केले पाहिजेत. थोडक्यात समाजाने आणि कुटुंबाने सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. तरच अशा घटनांना पायबंद बसेल. अन्यथा समाज अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन पोहचेल. सर्वत्र गुन्हेगारी थैमान घालेल आणि अराजक वाढेल.

लेखक सेवानिवृत्त प्राध्यापक आणि संविधान प्रचारक आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is very important for society and family to be vigilant to stop incidents like rape mrj