ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राज्य आरोग्य विभागाच्या कर्करोग जनजागृती आणि निदान मोहिमेअंतर्गत फेब्रुवारी ते मे या कालावधीत एकूण ४ हजार ४९० नागरिकांची फिरते निदान केंद्रच्या (मोबाईल बस ) माध्यमातून कर्करोग तपासणी करण्यात आली. यामध्ये २३७ जणांमध्ये कर्करोगाची संशयास्पद लक्षणे आढळून आल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार व सहजसुलभ करण्याच्या दृष्टीने शासनातर्फे कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबवली जात आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात फिरते निदान केंद्र (मोबाईल बस)कार्यरत असून, नागरिकांना कर्करोग तपासणीसाठी सुविधा उपलब्ध होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या फिरते निदान केंद्रात (मोबाईल बस) च्या माध्यमातून मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय कर्करोग यांसारख्या प्रमुख कर्करोगांची तपासणी केली जाते. ही बस आधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना प्राथमिक तपासणीसाठी रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही.
या फिरते निदान केंद्रात (मोबाईल बस) कॉल्पोस्कोप, डेंटल चेअर आणि इतर अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे असून, दोन डॉक्टर आणि सहा कर्मचारी कार्यरत आहेत. दररोज सरासरी १०० ते १२० नागरिकांची तपासणी केली जाते. फेब्रुवारी ते मे या चार महिन्याच्या कालावधीत मोबाईल बसच्या माध्यमातून ४ हजार ४९० नागरिकांची कर्करोग तपासणी करण्यात आली. यामध्ये २३७ जणांमध्ये कर्करोगाची संशयास्पद लक्षणे आढळली आहेत. या रुग्णांना पुढील निदान आणि उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थांकडे पाठविण्यात आले आहे.
कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांची वेळेवर ओळख होत नाही. त्यामुळे अनेक जण निर्धास्तपणे वावरत असतात. मात्र, अचानक कर्करोगाचे निदान झाल्यावर मनात नको ती शंका निर्माण होते. त्यामुळे वेळीच कर्करोगाचे निदान झाल्यावर यापासून बचाव करता येणे शक्य आहे. या मोबाईल बसमुळे लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार मिळणे शक्य होत आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या समन्वयातून ही मोहीम राबवण्यात येत आहे.