उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेचा कचरा वाहून नेणाऱ्या एक ट्रकने चीरडल्याने एका सात वर्षीय मुलाला आपला पाय गमवावा लागला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात गायकवाडपाडा येथे उल्हासनगर पालिकेची कचराभूमी आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर ट्रकची वाहतूक सुरू असते. ही कचराभूमी बंद करावी अशी स्थानिकांची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उल्हासनगर शहराचा कचरा प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे. काही वर्षांपूर्वी उल्हासनगर पालिकेने आपली खेमानी परिसरातील कचरा भूमीची क्षमता संपल्याने कॅम्प पाच भागात खदान परिसरात कचरा टाकण्यास सुरुवात केली होती. या भागात आकाश कॉलनी, गायकवाड पाडा परिसरात लोकवस्ती आहे. सुरुवातीला कचऱ्याची क्षमता कमी असल्याने विशेष त्रास जाणवला नाही. मात्र कालांतराने इतर कचराभूमीप्रमाणे इथेही कचऱ्याला आग लागणे, पावसाळ्यात दुर्गंधी सुटणे आणि यातून दुर्गंधी सांडपाणी वाहण्याचे प्रकार सुरू झाले. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास जाणवू लागला. त्यामुळे ही कचराभूमी बंद करावी अशी मागणी वाढू लागली. या कचरा भूमीचा प्रश्न थेट राष्ट्रीय हरित लवादाकडे पोहोचला. लवादाने त्यावर कारवाईचे आदेशही पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र ही कचारभुमी बंद होऊ शकली नाही. शनिवारी नियमितपणे या कचरा भूमीवर आलेल्या एका ट्रकने शेजारी खेळत असलेल्या गणेश चव्हाण या सात वर्षीय मुलाला धडक दिली. यावेळी ट्रक या मुलाच्या पायावरून गेला. त्यामुळे या मुलाला पाय गमवावा लागला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. चालक शुद्धीवर नव्हता असा आरोप यावेळी नागरिकांनी केला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रक रोखला. तर ही कचरा भूमी बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा – कपिल पाटील पुन्हा मंत्री, वामन म्हात्रे महापौर होतील, वन मंत्री गणेश नाईक यांचे भाकीत, नाईकांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

हेही वाचा – राज्याबाहेर एक जरी उद्योग गेला तर मी तुमची काळजी घेईन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्योग मंत्र्यांना इशारा

आरोग्याचा प्रश्नही गंभीर

गेल्या काही वर्षात या कचरा भूमीमुळे आसपासच्या परिसरात रोगराई पसरण्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. इथून निघणारी दुर्गंधी, दूर यामुळे श्वसनाचे आजार बळावले आहेत. या कचराभूमीला सातत्याने आग लागते. पालिका प्रशासन ती आग तात्काळ विझवते. मात्र त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. पालिकेने ही कचरा भूमी अनधिकृतरित्या तयार केली आहे. नागरी लोकवस्तीच्या शेजारी कचराभूमी तयार करणे चुकीचे असून हा अमानवीय प्रकार असल्याची तक्रार आता नागरिक करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child hit by a garbage truck incidents in ulhasnagar ssb