कल्याण- एक शिंपी सहा वर्षापूर्वी अंबरनाथ ते उल्हासनगर दरम्यान दुचाकीवरुन जात असताना समोवरुन विरुध्द मार्गिकेतून आलेल्या दुचाकी स्वाराने शिंपीच्या (टेलर) दुचाकीला जोराची धडक दिली. गंभीर जखमी शिंपीचा जागीच मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी शिंपीच्या कुटुंबीयांनी येथील मोटार अपघात न्याय प्राधिकरणाकडे नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता. कल्याण मधील न्याय प्राधिकरणाचे सदस्य शौकत गोरवडे यांनी शिंपी कुटुंबीयांना १७ लाख ८५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार वाहन मालक आणि या वाहनाच्या विमा कंपनीला दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अंबरनाथमध्ये दोन चारचाकीने घेतला पेट; मध्यरात्रीची घटना, सुदैवाने जिवीतहानी नाही

हेही वाचा : डोंबिवलीत राजाजी रस्त्यावरील घरात भरदिवसा चोरी

शिंपी कुटुंबीयांनी न्याय प्राधिकरणाकडे दावा दाखल केल्याच्या तारखेपासून सहा टक्के वार्षिक व्याजाने दुचाकी मालक, विमा कंपनीने एकत्रितपणे ही रक्कम द्यायची आहे, असे आदेशात म्हटले आहे. अलम अली सिद्दिकी अली खलिफा हे वृध्द आई, ११ आणि सहा वर्षाची मुले आणि पत्नीसह राहत होते. ते उल्हासनगर मधील राईट चाॅईस ब्युटिक कंपनीत शर्टाची गळपट्टी तयार करण्याचे काम करत होते. त्यांना दरमहा कंपनीकडून १५ हजार रुपये वेतन मिळत होते. या वेतनावर ते आपल्या कुटुंबीयांचा सांभाळ करत होते, अशी माहिती मयत अलम खलिफाच्या कुटुंबीयांचे वकील ॲड. सचिन माने यांनी दिली.

डिसेंबर २०१७ मध्ये ते आपल्या मित्राच्या दुचाकी वरुन उल्हासनगर येथून अंबरनाथकडे चालले होते. दुचाकी स्वाराच्या पाठीमागे ते बसले होते. कल्याण-अंबरनाथ रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोलच्या पुढे उल्हासनगर मधील एक दुचाकी स्वार भरधाव वेगाने उलट मार्गिकेतून येऊन तो अलम खलिफा यांच्या दुचाकीला जोराने धडकला. दुचाकीसह अलम आणि स्वार खाली पडले. अलम यांना दुचाकीची जोराची धडक बसल्याने ते जागीच मरण पावले.

याप्रकरणी अलमची विधवा पत्नी असगरी (३९), असफाक (१६), अर्षद (११) आणि आई नरूजहाँ (६५) यांनी अलमच्या मृत्यू प्रकरणात नुकसान भरपाई मिळण्यासाठी ॲड. सचिन माने यांच्या मार्फत मोटार अपघात हक्क न्याय प्राधिकरणा समोर दावा दाखल केला होता. अलम यांच्या निधनाने कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले. घरगाडा, मुलांचे शिक्षण असे प्रश्न उभे राहिले. ऐन उमेदीत मोटार अपघातात अलम यांचे निधन झाल्याने या अपघाताला जबाबदार मोटार वाहन मालक उल्हासनगर ओटी सेक्शन येथील रहिवासी हरदीप सिंग बोल्ले आणि या वाहनाची डोंबिवलीतील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी विरुध्द खलिफा कुटुंबीयांनी ३१ लाख लाख रुपये भरपाई देण्याची मागणी न्याय प्राधिकरणासमोर केली होती.

मागील पाच वर्षापासून हा दावा प्राधिकरणा समोर सुरू होता. सुनावणीच्या कोणत्याही तारखेला दुचाकी मालक बोल्ले हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फी निर्णय घेण्यात आला. विमा कंपनीचे वकील ॲड. डी. एस. व्दिवेदी यांनी भरपाई देण्याला विविध मुद्द्यांवर विरोध केला. प्राधिकरणाने वाहन मालक, विमा कंपनी आणि दावेदार यांच्या बाजू ऐकून दावेदार खलिफा कुटुंबीयांना १७ लाख ८५ हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले. तीन लाख रुपये मुलांच्या शिक्षणासाठी बँकेत ठेव रुपात ठेवण्यात यावेत. उर्वरित रक्कम इतर दावेदारांनी वाटप करुन घ्यावी असे आदेशात म्हटले आहे. आदेशानंतर भरपाईची रक्कम विनाविलंब देण्याची सूचना प्राधिकरणाने केली. अलमचे कुटुंबीय आता उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे राहते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Compensation family died accident motor vehicle accident adjudication authority ysh