डोंबिवली – विज्ञानाच्या नवनवीन कितीही शाखा उदयास आल्या. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपल्या मूळ बुद्धिमत्तेचे काय, आपल्या रोजगाराचे काय होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु, कितीही वैज्ञानिक प्रगती, नवे शोध लागले तरी माणसाची बुद्धिमत्ता हेच या सर्व प्रगतीचे सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन पुणे येथील महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे अध्यक्ष आणि संगणकतज्ज्ञ डाॅ. विवेक सावंत यांनी मंगळवारी येथे केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवलीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात माजी रेल्वेमंत्री आणि ज्येष्ठ समाजवादी नेते दिवंगत मधू दंडवते यांच्या नावाने रसायनशास्त्राची प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. दंडवते यांच्या जन्मशताब्दी निमित्त ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांच्या संकल्पनेतून या प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली. या प्रयोगशाळेचे उद्घाटन करताना डॉ. सावंत बोलत होते.

हेही वाचा – कल्याण पूर्वेतील खडेगोळवलीतील नागरिकांचा चिखलातून प्रवास

पेंढरकर महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमाला रसायन शास्त्राचे तज्ज्ञ डाॅ. सुरेश गोरे, डाॅ. विवेक सावंत, संस्था अध्यक्ष प्रभाकर देसाई, अभिजित देसाई, संस्था संचालक सनदी लेखापाल उमेश पटवारी, डाॅ. प्रशांत राव, उद्योजक आनंद आचार्य, प्राचार्य डाॅ. किशोर फालक उपस्थित होते.

वैज्ञानिक दृष्टीकोन असलेल्या आणि क्वाॅटम रसायनशास्त्रातील तज्ज्ञ ॲंजेला मर्केल यांनी जवळील वैज्ञानिक दृ्ष्टीकोनाचा उपयोग करुन जर्मनीची अफाट प्रगती केली. यामध्ये त्यांनी मानवतेला प्राधान्य दिले. केवळ जर्मनीतच नव्हे तर युरोपात सर्वाधिक विविधांगी प्रगतीची झेप घेणारा देश म्हणून जर्मनीची ओळख राहिली. आपल्या दृष्टीकोनातून जगाच्या प्रगतीसाठी ॲन्जेला यांनी खूप योगदान दिले. अशीच भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या मधू दंडवते यांना संधी चालून आली होती. नक्कीच त्यांच्या दूरदृष्टीचा भारत देशाला लाभ झाला असता, असे डाॅ. सावंत म्हणाले.

हम्फ्रे डेव्ही यांच्या प्रयोगशाळेतील पुस्तक बांधणी चौथी शिकलेला कामगार मायकेल फॅरेड याने हम्फ्रे डेव्ही यांची व्याख्याने लिहून काढली. आपल्या बुद्धी कौशल्याने प्रयोगशाळेत काहीतरी करायचे म्हणून रसायनांची हाताळणी करताना अव्दितीय असा शोध लावला. प्रयोगशाळेतील हाताळणीतून आपणास खूप काही शिकण्यास मिळते. चौकटबद्ध विज्ञानात न अडकता विशाल दृष्टीकोन ठेऊन विज्ञानाच्या विविध अंगांचा अभ्यास करा. हार्डवेअर आणि ब्रेनवेअर यांच्या संयोगातून शोधाचा जन्म होतो. शोधासाठी वस्तू ही निमित्त असली तरी बुद्धी सामर्थ्य हे शोधाचे बळ आहे, हे विसरू नका, असा सल्ला डाॅ. सावंत यांनी विद्यार्थ्यांना दिला.

मानवी बुद्धीकौशल्य, कृत्रिम बुद्धिमता एकाच गाडीची दोन चाके आहेत. या दोन्ही कौशल्यांचा अधिकाधिक वापर करुन प्रगती, नवे शोध लावण्यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षमता वाढवून समर्पित भावाने प्रयत्न केले तर मानवी जीवन समृद्ध होण्यास नक्कीच हातभार लागेल. त्यादृष्टीने आपल्या प्रयोगशाळेचा वापर करा, असे आवाहन डाॅ. सावंत यांनी केले.

हेही वाचा – डोंबिवली पश्चिमेत खेळाच्या मैदानाला खेटून बेकायदा इमारतीचे बांधकाम

पूर्वी साधने कमी होती तरी शोध लागत होते. आता नवीन साधने आली आहेत. वैज्ञानिक संशोधन थांबलेले नाही, त्यामुळे शोधासाठी वस्तू हे निमित्त आहे. आपल्या बुद्धी कौशल्याचा सामर्थ्याने वापर करा. विज्ञानाला ठराविक शिक्के लावून त्याला बंदिस्त करू नका. नवीन संशोधन करुन प्रगतीची नवीन शिखरे चढा. पेंढरकर काॅलेजमधील प्रयोगशाळा ही अंतीम चढाईचा तळ आहे असे समजून त्याचा वापर करा, असे डाॅ. गोरे यांनी सांगितले.

अभिजित देसाई यांनी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर गोवा भागात राजकीय पत्रकारिता करत असताना त्यांचा मधू दंडवते यांच्याशी पत्रकार म्हणून आलेला संबंध, व्ही. पी. सिंग यांच्या काळात दंडवते यांना पंतप्रधान पदासाठी झालेली विचारणा याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Intelligence is the power in scientific progress says maharashtra gyan mandal president dr vivek sawant ssb