औद्योगिक क्षेत्रातील रसायनमिश्रित पाणी थेट खाडीत; सागरी जैवविविधता धोक्यात

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसईच्या औद्योगिक क्षेत्रातील रसायनमिश्रित पाणी सोपारा खाडीमध्ये सोडल्यामुळे खाडीतील पाणी दूषित झाले असून त्याचा परिणाम येथील जीवसृष्टीवर होत आहे. नायगाव पूर्व येथील सोपारा खाडीतील पाण्यामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून प्रदूषणामुळे पांढऱ्या रंगाचा फेस जमा होत असून पाण्याचा रंगही काळा झाला आहे. यामुळे खाडीतील काही मासेही मृत झाले असून मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे.

वसई पूर्व परिसरातील नवघर, वालीव, गोखीवरे, सातिवली, चिंचपाडा या भागांत मोठय़ा प्रमाणावर औद्योगिक वसाहती आहेत. येथील कंपन्यांमध्ये तयार होणारी घातक रसायने या खाडीमध्ये सोडली जात असून यामुळे हे पाणी दूषित होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. औद्योगिक वसाहतीतील सोडण्यात येणारे सांडपाणी जाण्यासाठी सोपारा खाडी हा एकमेव मार्ग असून गेल्या काही दिवसांपासून या प्रदूषित पाण्याचे प्रमाण वाढले असून त्याचा परिणाम माशांवर होत असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये तयार झालेल्या रासायनांवर योग्य प्रक्रिया करूनच ते समुद्राच्या पाण्यात किंवा खाडीत सोडले आवश्यक असते, परंतु येथील कंपन्या ती रसायने कोणतीही प्रक्रिया न करता सोपारा खाडीत सोडण्यात येत असल्याने हा फेस निर्माण झाला असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. या ठिकाणी काही मासेही मृतावस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे यावर कारवाई करावी, असे वसईतील स्थानिक सनील मोसेकर यांनी सांगितले.

१० ते १२ वर्षांपूर्वी सोपारा खाडीत जीळे, मोरी, कोळंबी या छोटय़ा मासळींसह मोठी मासळीही मिळायची, तसेच पावसाळ्यात होडय़ादेखील येथे आणल्या जायच्या, परंतु रसायनमिश्रित पाण्यामुळे खाडीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. वसई पूर्वेच्या औद्योगिक वसाहतीतील रसायनांचा प्रवाह हा सोपारा खाडीतूनच जातो. त्यामुळे येथे मिळणारे मोठे मासे आधीच बंद झाले होते, परंतु लहान मासे आता मिळणे पूर्णत: बंद झाले आहेत. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या पोटावर पाय आला आहे, असे स्थानिक मच्छीमार विजय वैती यांनी सांगितले. रसायनांमुळे खाडीमध्ये दरुगधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रसायनमिश्रित पाण्यामुळे खारफुटीही नष्ट होऊ शकते, असे वैती यांनी सांगितले.

वसईमध्ये असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये वेळोवेळी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाद्वारे  तपासणी करण्यात येते. नियमाप्रमाणे त्यांनी प्रक्रिया करूनच पाणी बाहेर सोडावे.  मुळात वसई-विरार पालिकेकडे स्वत:ची प्रक्रिया यंत्रणा नाही. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर खाडय़ांमधील पाण्याचे प्रदूषण होते. घनकचरा आणि घरगुती सांडपाणीसंदर्भात महापालिकेवर याआधी महाराष्ट्र प्रदूषण मंडळातर्फे गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

व्ही. व्ही. किल्लेदार, प्रदुषण नियंत्रण मंडळ

मीठ व्यावसायही धोक्यात

पूर्वी या खाडीकिनारी असलेल्या मिठागरांमध्ये मिठाचे उत्पादन केले जाई. मात्र दूषित पाण्यामुळे मिठाचे उत्पादनही खराब होत असल्याने येथील पाणी वापरणे बंद केले आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.

वसई-विरार परिसरात ठाणे, डोंबिवली भागात जशी मोठी औद्य्ोगिक वसाहत आहे, तशी वसईत नाही. त्यामुळे रसायनांचे पाणी खाडीमध्ये येण्याचे प्रमाण कमी आहे. या व्यतिरिक्त शहरीकरणामुळे नागरिकांच्या वस्तीमधील सांडपाणीही खाडीमध्ये सोडल्याने खाडीचे प्रदूषण होत आहे. पाणी, हवा या प्रदूषण हे महाराष्ट्र प्रदूषण मंडळामध्ये येत असल्याने त्यावर मंडळातर्फे कारवाई करणे योग्य आहे.

सुखदेव दरवेशी, प्रभारी सहाय्यक आयुक्त, वसई-विरार महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nala sopara creek pollution issue