कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा तलावाच्या किनारी शनिवारी असंख्य कासव मृतावस्थेत आढळून आले. कासवांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. याआधीही काही कासवांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र शनिवारी मोठ्या संख्येने कासवांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमेला असलेल्या भव्य गौरीपाडा तलावाचे काही वर्षापूर्वी सुशोभिकरण करण्यात आले होते. या तलावात स्थानिक लोक मासेमारीही करतात. दोन दिवसापूर्वी काही कासव मेलेल्या स्थितीत आढळून आले होते. मात्र शनिवारी मात्र तलावाच्या किनारी असंख्य कासव मृतावस्थेत पडलेले दिसून आले. हा प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी याठिकाणी धाव घेतली. त्यानंतर गायकवाड यांनी या घटनेची माहीती गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनासह प्रदूषण नियंत्रण मंडळास दिली आहे. कासवांचा इतक्या मोठय़ा प्रमाणात मृत्यू झाल्याची बाब धक्कादायक आणि गंभीर आहे. काही कासवांनी मात्र तलावाच्या बाजूला असलेल्या गवाताचा आसरा घेतला होता. तलावात मासेमारी करताना माशांना काही खायला टाकण्यात आले असावे. तेच खाद्य कासवांनीही खाल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच तलावाच्या पाण्यात काही टाकल्याने प्रदूषित पाण्यामुळे कासवांचा मृत्यू झाला असावा अशीही शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान कासव हा उभयचर आणि दीर्घायुष्यी आहे. त्याचा अशा प्रकारे मृत्यू होणो ही गंभीर बाब आहे. काही ग्रामस्थांनी मृतावस्थेत पडलेले नेमकी किती कासव आहे याची मोजणी केली किमान ८५ कासव मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले होते.