बदलापूर : गेली काही वर्षे विविध कारणांमुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या बदलापूरांना जलदिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत २६० कोटी रूपयांच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली. यात दोन नवे जल शुद्धीकरण केंद्र, १४ जलकुंभ, नव्या जलवाहिन्या असणार आहेत. २०५६ वर्षाच्या अंदाजे साडे सात लाख लोकसंख्येला पुरेल इतक्या पाण्याची क्षमता या योजनेच्या माध्यमातून निर्माण केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वितरण व्यवस्था, त्याची क्षमता आणि जलाकुंभांचा अभाव यामुळे गेल्या काही वर्षांपासून बदलापूर शहराला पाणी समस्येने ग्रासले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरात पाणी पुरवठा केला जातो. मात्र जलकुंभ पासून शेवटच्या टोकावर असलेल्या घरांना पाणी कमी दाबाने मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यात बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे बदलापूर शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी मुरबाड विधानसभा मतदारसंघांचे आमदार किसन कथोरे यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत २६० कोटी रूपयांच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली आहे. येत्या २०५६ वर्षापर्यंत वाढणाऱ्या सुमारे ७ लाख ६२ हजार लोकसंख्येला पाणी पुरवण्याची क्षमता यामुळे निर्माण होणार आहे. त्यामुळे येत्या ३२ वर्षांची पाणी व्यवस्था होणार आहे. वाढीव पाणी पुरवठा योजनांमुळे बदलापुर आणि मुरबाडमधील नागरिकांना निश्चितच दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे.

हे ही वाचा… ठाण्यात रिक्षाचालकांच्या मनमानीचा प्रवाशांना फटका; नियमांनाही हरताळ

योजना

या योजनेत उल्हास नदीकिनारी वालिवली येथे विहीर तयार केली जाईल. खरवई आणि बेलवली येथे अनुक्रमे पूर्व आणि पश्चिम विभागासाठी जल शुद्धीकरण केंद्र उभारले जाईल. त्यात खरवई येथे ५४ दशलक्ष लिटर क्षमतेचे आणि बेलवली येथे ६० दशलक्ष लिटर क्षमतेचे केंद्र असेल. बदलापूर शहराच्या पूर्व आणि पश्चिम विभागात सुरळीत पाणी वितरणासाठी १४ जलकुंभ उभारले जातील. तसेच अद्यायावत उपसा पंप आणि जलवितरण यंत्रणा उभारली जाईल.

हे ही वाचा… ठाणे काँग्रेस अध्यक्ष बदलाची पुन्हा चर्चा, ठाणे पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक

मुरबाडसाठीही नवी योजना

नगरोत्थान अभियानातून मुरबाड शहरासाठीही ३१ कोटी १८ लाख रूपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. २०५६ ची संभाव्य लोकसंख्येला पुरेल असे योजनेचे नियोजन आहे. मुरबाड तालुक्यातील शिरवली ठाकुरवाडी धरण पाण्याचा स्त्रोत असणार आहे. यात सहा नवे जलकुंभ उभारले जाणार आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State government approves water supply scheme worth of rs 260 crore to badlapur city asj