ठाणे : हिरानंदानी इस्टेट येथील कावेसर तलावालगत ठाणे महापालिकेने घेतलेल्या सुशोभिकरणाच्या निर्णयाला त्या भागातील रहिवाशांचा आणि ठाण्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांचा विरोध आहे. पर्यावरण दिनाच्या पाश्वर्भूमीवर या सर्व नागरिकांनी कावेसर तलावाजवळ एकत्रित येत ठाणे महापालिकेने घेतलेल्या सुशोभिकरणाच्या निर्णयाविरोधात निदर्शने केले. कावेसर तलावाच्या आजूबाजूला नैसर्गिक संपत्ती आहे. या सुशोभिकरणामुळे ही नैसर्गिक संपत्ती नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमचा ठाणे महापालिकेच्या या निर्णयाला कायम विरोध असेल, असा सुचक इशारा या नागरिकांनी यावेळी दिला.

घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागातील कावेसर तलावाच्या येथे सुशोभिकरण करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला. या कामाचे भूमिपूजन देखली पार पडले. परंतू, ठाणे महापालिकेने घेतलेल्या या सुशोभिकरणाच्या निर्णयाला येथील स्थानिक रहिवाशांचा तसेच ठाण्यातील पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. त्यामुळे गेले अनेक दिवसांपासून कावेसर तलाव हा चर्चेचा विषय बनला आहे. या भागातील रहिवाशांनी व्हाॅट्सॲप तसेच इतर समाजमाध्यमांद्वारे तलाव वाचविण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासंदर्भात, काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन याचिका तयार करण्यात आली. यामध्ये चार हजारहून अधिक जणांनी स्वाक्षरी करून सुशोभिकरणास विरोध दर्शविला. तसेच जनजागृतीसाठी परिसरात फलक उभारण्यात आले आहेत.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या सर्व मंडळींनी एकत्रित येत कावेसर तलावाजवळ निदर्शने केली. यामध्ये तरुणांचा मोठ्यासंख्येने सहभाग होता. ‘कावेसर तलाव वाचवा’, ‘निसर्गाचा आदर करा, कॉंक्रिटीकरण थांबवा’ अशा विविध आशयाचे फलक हातात घेऊन या नागरिकांनी निदर्शने केली. या निदर्शना दरम्यान कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलिस देखील याठिकाणी उपस्थित होते.

कावेसर तलावाचे महत्त्व

कावेसर तलाव हा सुमारे १५० वर्ष जुना आहे. या तलावाच्याभोवती जैवविविधता आहे. तसेच या तलावात दुर्मिळ मानले जाणारे पांढरे कमळ आढळून येते. त्यामुळे पर्यावरणप्रेमी तसेच हिरानंदानी भागातील नागरिक या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी नेहमी जातात. हिरानंदानी इस्टेट भागात बगीचे आहेत. परंतु नैसर्गिक तलाव येथील रहिवाशांसाठी आकर्षणाचा भाग ठरतो. त्यामुळे या तलावाच्याभोवती सुशोभिकरण झाले तर, येथील जैवविविधतेवर त्याचा परिणाम होण्याची भिती नागरिक व्यक्त करत आहेत.

स्थानिक नागरिक प्रतिक्रिया…

ठाणे हे तळ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते आणि आज त्याच शहरात तळ्याचा विनाश होत आहे. हे बघताना त्रास होतोय. त्यामुळे आमचा ठाणे महापालिकेच्या या निर्णयाला कायम विरोध राहणार आहे. आम्हाला कोणतेही आंदोलन रस्त्यावरती येऊन करायचे नाहीये केवळ आमचे म्हणणे पटवून समाजात जागरूकता निर्माण करायची आहे.स्वाती दिवेकर

कावेसर तलाव ही जागा आधिपासून सुंदर आहे. त्याठिकाणी सुशोभिकरणाची गरज नाही. ठाणे महापालिकेला याठिकाणी काही करायचं असेलच तर, त्यांनी आवश्यक सुविधा येथे द्याव्या. जशा की, या तलावाच्या आजूबाजूला कचरा पेट्या ठेवाव्या कारण, याठिकाणी फिरायला येणाऱ्या नागरिकांना काही खाद्यपर्थांचा कचरा टाकण्यास पर्याय नाही. महापालिकेने जे सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याकामामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय मागे घ्यावा अशी आमची मागणी आहे . राधिका जगताप