तो मामलेदार कचेरीत आला की सगळे त्याची आपुलकीने चौकशी करत…शिक्षण घेतोस का रे, असा प्रश्न आवर्जून विचारत…मग कोणी स्पेशल चहाची तर कोणी कमी साखरेच्या चहाची मागणी करत. तोही सगळ्यांना हवा तसा चहा देत त्यांची चहाची तल्लफ पूर्ण करत. याच चहा विक्रेत्याने दहावीच्या परीक्षेत स्पेश यश मिळविले आहे.
राज्यात आज दहावीचा निकाल लागला असून यामध्ये पुण्यातील सरस्वती मंदिर रात्र शाळेत शिकणारा तानाजी मालू कचरे पास झाला आहे. तानाजी मूळचा वेल्हा तालुक्यातील असून आपल्या कुटुंबाबरोबर तो पुण्यात राहतो. काम करत असतानाच शिक्षण घेत असलेल्या तानाजीने या परीक्षेत ३९ टक्के मिळविले आहेत. दिवसभर काम करुन रात्रशाळा करणाऱ्या तानाजीने त्याच्या वयोगटातील मुलांसमोर जिद्दीचा आदर्श ठेवला आहे.
पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील गिसर या गावात शेतकरी कुटुंबात तानाजीचा जन्म झाला. त्याला १ बहीण आणि २ भाऊ असून वयाच्या तिसऱ्य़ा वर्षी वडीलांचे निधन झाले. तर पाचवीमध्ये असताना आईचे देखील निधन झाले. अशाप्रकारे आईवडिलांच्या छत्रापासून पोरकी झालेली ही भावंडे एकमेकांच्या साथीने लहानमोठे उद्योग करुन जीवन जगत आहेत. आई वडील नसल्याने मोठा भाऊ विशाल वर घरची सर्व जबाबदारी आली.
तानाजी सांगतो, मी आणि धनाजीने २०१४ मध्ये पुणे गाठले. पुण्यात तर आलोय पण आता नेमके काय करायचे ते कळेना. अनेक विचार डोक्यात येत असताना अगदी थोड्या भांडवलात आपण चहा विक्रीचा व्यवसाय करू शकतो असे वाटल्याने कामाला सुरुवात केली. मामलेदार कचेरीत चहा विकण्यास सुरुवात केली. चहा विकण्याचे काम करत असताना कचेरीतील पुणे शहराच्या आसपासच्या भागातील अनेक नागरिक आणि आधिकारी भेटत होते. यातील अनेक जण माझ्या शिक्षणाविषयी आवर्जून चौकशी करायचे.
त्यावेळी घरची परिस्थिती समजल्यावर त्यांना वाईट वाटायचं आणि म्हणयाचे शिक्षण घेऊन मोठा हो. मलाही लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. मात्र परिस्थिती नसल्याने शिक्षण घेणे अशक्य होते. याच दरम्यान सरस्वती मंदिर या रात्रशाळेत ८ वीला प्रवेश घेतला आणि तेथून खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली. ९वीतून १०वीत जाताना आपण पास होऊ का असे दडपण होते. मात्र या काळात भावाने आणि शाळेतील सर्वांनी खूप सहकार्य केल्याने मी पास झालो. मला ३९ टक्के पडले असले तरीही मला मी पुढे ११ वीला कॉमर्सला प्रवेश घ्यायचा आहे. पुढे आधिकारी होण्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लहानपणी चहा विकायचे काम केले असल्याचे आपण ऐकले आहे. त्यांनी चहा विकून पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर विराजमान होण्याचा बहुमान मिळवला. त्याचप्रमाणे पुण्यातील मामलेदार कचेरी येथे चहा विकणाऱ्या मुलाने दहावीच्या परीक्षेत यश मिळविले आहे.