आपण अनेक पारंपरिक विवाह सोहळे पाहतो. प्रत्येक ठिकाणी पारंपरिक विवाह सोहळ्याच्या पद्धतीही वेगळ्या असतात. पण परंपरा म्हणून कोणी प्राण्यासोबत लग्न केलंय, हे तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? पण हो, मॅक्सिकोत एका महापौराने चक्क मगरीशी लग्न केलंय. परंपरा म्हणून येथे महापौर मगरीशी लग्न करतात. हे नेमकं काय प्रकरण आहे, ते जाणून घेऊयात.
दक्षिण मेक्सिकोच्या एका लहान शहराच्या महापौरांनी मगरीशी लग्न केल्याची चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगली आहे. दरवर्षी या लग्नाची चर्चा होत असते. व्हिक्टर ह्युगो सोसा हे दक्षिण मेक्सिकोच्या सॅन पेड्रो ह्युअमेलुला शहराचे महापौर आहेत. पारंपरिक विधी म्हणून या महापौरांनी अॅलिसिया अॅड्रियाना या मगरीशी लग्न केलं आहे. या मगरीचं वय सात वर्षे असून ही प्रथा पूर्वापार चालत असल्याचे संदर्भ सापडतात.
का लावलं जातं महापौरांचं मगरीशी लग्न?
शहरातील लोकांचं नशीब उजळण्यासाठी हा विधी केला जातो. ओक्साका राज्यातील चोंटल आणि हुआव या समुदायांमध्ये पूर्वापार ही प्रथा असल्याचं सांगितलं जातं. या दोन्ही समाजातील मतभेद दूर करण्याकरता हा लग्नविधी केला जात असे. तसंच निसर्गाची कृपा या समाजावर राहावी याकरता राजाचं लग्न मगरीशी केलं जायचं. आताच्या घडीला शहराचा राजा म्हणजेच महापौर असल्याने महापौरांचं लग्न मगरीशी लावलं जातं.
मगर ही मातृभूमिचं प्रतिनिधित्व करणारी देवता मानली जाते. त्यामुळे शहराच्या राजाशी तिचा विवाह करणे म्हणजे देव आणि मानवाच्या मिलाफाचं ते प्रतिक मानलं जातं. महापौर सोसा म्हणाले की, “एक पुरुष आणि एक मगर यांच्यातील विवाह ही २३० वर्षांपासूनची परंपरा आहे. या विवाहामुळे दोन स्थानिक गट एकत्र आले होते.”
“मी या लग्नाची जबाबदारी स्वीकारतो, कारण आमचं एकमेकांवर प्रेम आहे. तेच महत्त्वाचं आहे. प्रेमाशिवाय लग्न होऊ शकत नाही. मी या राजकुमारीशी (मगर) लग्न करण्यास तयार आहे”, असं सोसा लग्नाच्या विधीदरम्यान म्हणाले होते.
लग्नाचा विधी कसा असतो?
या लग्नाच्या विधीआधी मगरीला प्रत्येकाच्या घरात नेलं जातं. तिला प्रत्येकजण आपल्या मांडीवर घेतो. तिच्यासोबत नृत्य करतो. मग मगरीला हिरवा स्कर्ट घातला जातो. हाताने भरतकाम केलेला रंगीबेरंगी अंगरखाही चढवला जातो. विवाहपूर्व कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी मगरीचं तोंड बंद केलं जातं. यानंतर तिला सफेद रंगांचा नवऱ्या मुलीसारखा पांढरा पोशाख दिला जातो. हा कार्यक्रम शहाराच्या सभागृहात होतो.
मानवाचं निसर्ग आणि प्राण्यांशी असलेलं नातं मजबूत करण्याकरता ही प्रथा पाळली जाते. या प्रकारची लग्नं येथे सामान्य गोष्ट आहे. अशापद्धतीचं लग्न केल्यास देव पावतो, अशी समजूत या शहरात आहे.