वसई: वसई येथील महापारेषणच्या १००/२२ केव्ही अतिउच्चदाब केंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्रात मंगळवारी तांत्रिक बिघाड झाला आहे. नवीन रोहित्र लावण्यास तीन ते चार दिवसांचा अवधी लागणार असल्याने त्याचा परिणाम वसई विरारमधील वीज पुरवठ्यावर होणार आहे. त्यामुळे एकप्रकारे वसईवर वीज संकट निर्माण झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई पूर्वेच्या भागात महापारेषणचे १००/ २२ केव्हीचे अतिउच्चदाब केंद्र आहे. त्यातून वसईच्या भागातील वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. सद्यस्थितीत साधारणपणे दोन लाख वीज ग्राहकांना या अतिउच्चदाब केंद्रातून वीज पुरवठा केला जातो. मंगळवारी अचानकपणे ५० एमव्हीएच्या रोहित्रात तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा परिणाम हा वीज पुरवठ्यावर झाला आहे. नादुरुस्त रोहित्राच्या ठिकाणी नवीन रोहित्र उपलब्ध होईपर्यंत
वसई आणि विरारच्या अतिभारीत भागात आवश्यकतेनुसार वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे नवीन रोहित्र उपलब्ध होऊन वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. नवीन रोहित्र उपलब्ध व्हावे यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी केले आहे.

हेही वाचा – शहराला बेकायदा फेरीवाल्यांचा विळखा, वसई- विरार महापालिकेच्या दप्तरी केवळ १५ हजार फेरीवाले

हेही वाचा – विसर्जना दरम्यान गणेशभक्ताचा तलावात बुडून मृत्यू ; विरार येथील घटना

तात्पुरता नालासोपारा केंद्रातून पुरवठा

वसईच्या रोहित्रात बिघाड झाल्याने यामुळे मोठ्या प्रमाणात वीज ग्राहक बाधित होण्याची शक्यता होती. महावितरणने नुकताच नालासोपारा येथील केंद्रात १००/२२ केव्हीचे नवीन रोहित्र कार्यान्वित केले आहे. त्यातूनच सध्या बिघाड झालेल्या रोहित्रावरील वीज ग्राहकांना तात्पुरता स्वरूपात वीज पुरवठा सुरू केला आहे. याशिवाय ग्राहकांचा जास्त वेळ वीज पुरवठा खंडित राहू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Failure of 50 mva transformer of mahapareshan impact on power supply in vasai virar ssb