वसई: वसई विरार भागातही महावितरणने विविध ठिकाणच्या टाइम ऑफ डे ( टीओडी) स्वरूपाचे स्मार्ट मीटर बसविण्यास सुरवात केली आहे. या मीटर द्वारे नेहमीप्रमाणेच मासिक वीज देयक येणार आहे. सुरवातीला शासकीय आस्थापना व लघुदाब वीज ग्राहक अशा ठिकाणी ही मीटर बसविले जात असून आतापर्यंत ६४ हजार ६३६ इतके स्मार्ट मीटर बसविले आहेत.
महावितरणच्या वसई मंडळाच्या अंतर्गत शहरात घरगुती, व्यावसायिक, शासकीय, औद्योगिक अशा विविध साडे दहा लाख वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. मात्र काही वीज ग्राहक मीटर मध्ये फेरफार करून वीज चोरी करतात. तर मीटर सदोष असल्याने वीज देयक रक्कम व रिडींग यात तफावत आढळून येते.तर तांत्रिक अडचणीमुळे मीटर गणन योग्य न होणे याचा फटका महावितरणसह वीज ग्राहकांना बसत आहे.यात पारदर्शकता यावी अचूक वीज देयक ग्राहकाच्या हाती जावे यासाठी लघुदाब वीज ग्राहकांकडे अत्याधुनिक असे टीओडी स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात केली आहे.
या सुरवातीला महावितरण, महापारेषणसह सर्व शासकीय कार्यालये व निवासस्थाने, मोबाईल टॉवर ग्राहकांकडे टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. हे मीटर बसवण्यासाठी ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
आतापर्यंत ४७ हजार १६४ जुने वीज मीटर काढून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविले आहेत. १७ हजार ४७२ नवीन वीज ग्राहकांना हे स्मार्ट मीटर देण्यात आल्याचे महावितरणने सांगितले आहे. आतापर्यंत एकूण वसई मंडळाच्या अंतर्गत ६४ हजार ६३६ इतके स्मार्ट वीज मीटर लावले आहेत. हे मीटर प्रीपेड नाहीत. ज्या ग्राहकांना हे मीटर बसवले जात आहेत, त्यांना पूर्वीप्रमाणेच विजेच्या वापरानंतर मासिक वीज देयक दिले जाणार आहे. या मीटरच्या माध्यमातून कोणत्या वेळेला किती वीज वापर होतोय, याची अचूक माहिती संबंधित ग्राहक व महावितरणला मिळणार आहे. त्यासोबतच या मीटरचा कोणताही आर्थिक भार ग्राहकांवर पडणार नाही असे महावितरणने स्पष्ट केले आहे. टप्प्या टप्प्याने अन्य मीटर ही बदलून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविले जातील असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
असे असेल ‘टीओडी’ स्मार्ट मीटर….
टीओडी मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून मीटर महावितरणच्या सर्व्हरला जोडलेले असते. त्यामुळे मीटरचा रिअल टाइम डाटा महावितरणकडे उपलब्ध होतो. त्यामुळे मीटर नादुरुस्त झाल्याची माहिती तत्काळ मिळू शकेल. मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होणार आहे. यात नागरिकांना हस्तक्षेप करता येणार नाही. ऑटोमॅटिक मीटर रीडिंगमुळे ग्राहकांना अचूक व वेळेवर देयके मिळतील. हे अत्याधुनिक मीटर असल्याने यात ग्राहकाला प्रत्येक तासाचा, दिवसाचा वीजवापर मोबाईल मध्ये पाहता येणार. मीटर बसवण्यासाठी ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नसून केंद्र सरकारच्या निधीतून सवलत देण्यात येत असल्याचे महावितरणने सांगितले .
वीज चोरीला आळा
वीज मीटरच्या वाहिन्यांमध्ये फेरफार करणे, आकडे टाकणे, मुख्य वीज जोडणीच्या सर्व्हिस वाहिनीला टॅपिंग करणे अशा विविध प्रकारच्या मार्गाने वीज चोरी होते. विशेषतः अशा घटना दाटीवाटीच्या भागात अधिक आढळून येत आहेत. तर काही जण रिमोट कंट्रोल द्वारे ही वीज चोऱ्या करतात.याचा मोठा फटका आर्थिक फटका महावितरणला बसतो. दरवर्षी महावितरणकडून वीज चोरीच्या मोहिमा घेतल्या जातात. यात वर्षाला सरासरी १० ते १२ कोटी रुपयांच्या अडीच हजार वीज चोऱ्या झाल्याचे प्रकार उघड झाले होते. हे रोखण्यासाठी स्मार्ट मीटर लावण्यावर भर दिला जात आहे.
नवीन वीज जोडणीला स्मार्ट मीटर
वसई विरार शहराचे नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे विजेची मागणी ही वाढू लागली आहे. महावितरण कार्यालयात दर महिन्याला पाच ते सहा हजाराहून अधिक अर्ज नवीन वीज जोडणी मिळण्यासाठी येत असतात. आता यापुढे नवीन वीज जोडण्या येतील त्यांना स्मार्ट मीटरच लावले जाईल असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.