वसई: नालासोपारा पश्चिमेच्या डांगे वाडी येथे सहा दिवसांपूर्वी महावितरणच्या रोहित्राचा स्फोट होऊन भीषण लागली होती. या आगीत होरपळून जखमी झालेल्या ३० वर्षीय तरुणाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यापूर्वी सहा वर्षीय नसरीन परवीन या मुलीचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन जणांचा बळी गेला आहे.

नालासोपारा पश्चिमेच्या सोपारा गावात डांगे वाडी परिसर आहे. याच भागात वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने रोहित्र बसविले आहे. सोमवार २२ सप्टेंबर रोजी रात्री अचानकपणे या रोहित्राला भीषण आग लागली. या घटनेमुळे आजूबाजूच्या परीसरात खळबळ उडाली होती. या आगीत जावेद अन्सारी( ३०) व नसरीन परवीन शेख (६) असे दोघे जण होरपळून जखमी झाले होते.  या दोघांना स्थानिकांनी पालिकेच्या बोळींज येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र आगीत ७० ते ८० टक्के होरपळून गेल्याने त्यांना मुंबईच्या रुग्णालयात पुढील  उपचारासाठी पाठविण्यात आले होते. यात दुसऱ्यादिवशी सहावर्षीय नसरीन हीचा मृत्यु झाला होता.

तर जावेद अन्सारी यांच्यावर मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या अंगावर आगीत होरपळल्याच्या मोठं मोठ्या जखमा असल्याने शनिवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती नालासोपारा पोलिसांनी दिली आहे. या दुर्घटने आगीत होरपळून गेलेल्या दोघांचा ही मृत्यू झाल्याने आजूबाजूच्या परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मदतची मागणी

रोहित्राचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीमुळे दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. महावितरणने मृतांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे आवश्यक होते. मात्र अजूनही कोणत्याही प्रकारची मदत त्यांनी केली नाही. कुटुंबाची परिस्थिती हालाकीची असून त्यांना महावितरणने तातडीने मदत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अतिक बोटके यांनी केली आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.