वसई : वसई विरार शहरात मृत प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या. आता पालिकेच्या क्षेपणभूमी जवळच्या भागातच जागा तयार करून व्यवस्था केली जाणार आहे. लवकरच तेथील काम पूर्ण करून ती कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.शहरात पाळीव प्राण्यांबरोबरच अनेक बेवारस प्राणी विविध आजारांमुळे किंवा अपघातामुळे मृत्युमुखी पडतात. त्यांच्या अंत्यसंस्काराची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना अडचणी निर्माण होत असतात. शहरात विविध सद्यस्थितीत भागात मृत होऊन पडणाऱ्या जनावरांची विल्हेवाट लावण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे.
पाळीव प्राणी मृत झाले की त्यांच्या शरीराची विल्हेवाट कशी लावायची याचा प्रश्न प्रत्येक प्राणीप्रेमींना पडतो. आयुष्यभर एखाद्या लेकरासारखे जपलेल्या प्राण्याची त्यांचा मृत्यू झाला अशी हेळसांड होणे कुणालाही आवडत नाही. त्यामुळे या मृत प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी व्यवस्था उपलब्ध होणे गरजेचे होते. तर काही वेळा बेवारस असलेले मृत प्राणी झालेले प्राणी ही उकिरड्यावरकिंवा नाल्या शेजारी टाकून दिले जातात. त्यामुळे त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो.
मृत प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीची अथवा दफनभूमीची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती. याबाबत केंद्रीय पशुसंवर्धन विभागाकडे पत्रव्यवहार करून वसई विरार शहरातील मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीची समस्या मांडली होती. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेला पशुसंवर्धन विभागाकडून दिल्या होत्या. त्यानंतर पालिकेने व्यवस्था करण्यास सुरुवात केली होती. मात्र जागेचा प्रश्न असल्याने अडचणी येत होत्या. आता पालिकेकडून गोखीवरे येथील क्षेपणभूमी जवळच्या भागातच अंत्यसंस्कार करण्यासाठी व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. जवळपास ९० टक्के प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच उर्वरित काम पूर्ण करून ती कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत असेही पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
