वसई: शिधालाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करण्यात येत आहे. ई केवायसी करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत वाढ दिली होती. मात्र मुदत वाढ दिल्यानंतर ही लाभार्थ्यांनी ई केवायसी करवून घेण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे तालुक्यात अजूनही १ लाख ७७ हजार २१७ इतके शिधालाभार्थ्यांचे ई केवायसी प्रलंबित आहेत. अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्याचं वितरण केलं जाते. या धान्याचे वितरण पारदर्शक रित्या होण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने त्याचे वितरण १८० शिधावाटप केंद्रावर सुरू आहे.  वसईत  सुमारे १ लाख ४५ हजार ९०६ इतके प्राधान्य कुटुंब लाभार्थी व ३ हजार ८०६ अंत्योदय शिधापत्रिका धारक असून त्यांचे एकूण ५ लाख ९२ हजार २९८ इतके शिधा लाभार्थी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीओएस यंत्रात आधार प्रमाणीकरण न करण्यात आल्याने अनेक शिधा लाभार्थ्यांना धान्य मिळण्यास अडचणी येत होत्या. आता सर्वच शिधालाभार्थ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले असून त्याचे काम ही शिधा वाटप केंद्रावर सुरू होते.  मात्र काही शिधा लाभार्थी ई केवायसी करण्यास पुढे येत नसल्याने त्यात ३१ मार्च पर्यंत मुदत वाढ दिली आहे. मात्र तरी सुद्धा ई केवायसी करण्यासाठी शिधा लाभार्थी प्रतिसाद देत नसल्याने मोठ्या संख्येने लाभार्थ्यांचे ई केवायसी प्रलंबित राहू लागले आहे.

वसईत ५ लाख ९२ हजार २९८ शिधालाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ४ लाख १५ हजार ८१ लाभार्थ्यांचे ई केवायसी झाले आहे. जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले आहे. असे जरी असले तरीही अद्याप १ लाख ७७ हजार २१७ इतके लाभार्थ्यांनी ई केवायसी केली नसल्याची माहिती पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

अन्यथा धान्य मिळणार नाही ….

वसईतील शिधावाटप केंद्रावर ई केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र लाभार्थी त्या ठिकाणी जाण्यास टाळाटाळ करतात. याशिवाय काही वेळा धान्य मिळत नसल्याच्या, योग्य रित्या पीओएस मध्ये माहिती दाखवत नसल्याच्या तक्रारी करीत असतात. परंतु त्यासाठी आधार प्रमाणीकरण करून घेतले तर त्या लाभार्थ्यांची ऑनलाइन स्वरूपात नोंद होते.आता मोबाईल द्वारे ही ई केवायसी केली जाऊ शकते. जर ई केवायसी झाली नाही तर त्या लाभार्थ्यांना धान्य मिळणार नाही असे पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी सांगितले आहे.

शिधा लाभार्थ्यांचे ई केवायसी करण्याचे काम सुरू आहे. जे लाभार्थ्यांनी अजूनही ई केवायसी केले नसेल त्यांनी मोबाईलद्वारे ई केवायसी करून घ्यावे किंवा शिधावाटप केंद्रावर सुविधा उपलब्ध केली आहे.

भागवत सोनार, पुरवठा अधिकारी वसई तालुका 

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai virar ration beneficiaries neglect e kyc process css