दुसऱ्याच्या आहारी जाऊन त्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे म्हणजे स्वत्व हरवून बसणे. शरणागती पत्करणे. दास्य स्वीकारणे. हा माणूसपणाचा अपमान आहे. परंतु अनेक (तथाकथित) ‘आध्यात्मिक गुरूं’च्या भक्तांना त्यात धन्यता वाटते. आपले गुरू ठकसेन, भ्रमसेन किंवा मूढसेन तर नाहीत ना, याची खात्री करून घेण्याची आवश्यकताही अशा भक्तांना वाटत नाही. व्यासपौर्णिमेला अशा गुरूंचेही पूजन होतच राहते. याविषयीचा एक डोळस इशारा..
बऱ्याच वर्षांपूर्वीचा काळ. तेव्हा आम्ही शालेय विद्यार्थी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमच्या वर्गावर पहिल्या तासाला येणाऱ्या गुरुजींना फुले देऊन नमस्कार करीत असू. सर्व गुरुजींचा पहिला तास कुठल्या ना कुठल्या वर्गावर असायचा. त्यामुळे त्या दिवशी सर्व गुरुजनांचे पुष्पपूजन होई. त्याच दिवशी गायन, वादन, नृत्य अशा कला क्षेत्रांतील गुरूंचे त्यांचे शिष्य पूजन करीत. त्या काळी गुरुपौर्णिमेचा संबंध शाळेतील शिक्षकांच्या, कलातपस्वींच्या, ज्ञानमहर्षीच्या सन्मानाशी होता.
आज गुरुपौर्णिमा म्हणजे ‘आध्यात्मिक गुरूं’च्या पूजनाचा (आणि त्या गुरूंनी भक्तांकडून दक्षिणा लाटण्याचा) दिवस असा अर्थ रूढ झाला आहे. पूर्वी दैवी शक्तीचे चमत्कार करून दाखविणाऱ्या बुवा, महाराज, स्वामी, बाबा यांची संख्या मोठी होती. पुढे अनेक बुवा-बाबांच्या ‘लीला’ उघड झाल्या. त्यांचे दैवी चमत्कार म्हणजे हातचलाखीचे प्रयोग हेही लक्षात येऊ लागले. त्यामुळे चमत्कारी बुवा बदनाम झाले. पण एखादी दहशतवादी संघटना जशी जुने नाव बदलून नव्याने आपली स्फोटक कृत्ये चालू ठेवते, त्याप्रमाणे बुवा-बाबांनी आध्यात्मिक गुरू हे नाव धारण करून, आपली कार्यपद्धती बदलून, श्रद्धाळूंना फसवण्याचे आपले मूलभूत महत्कार्य पुढे चालू ठेवले. ‘हृदयीं गुरु नांदे। फसवुनी घेऊं आनंदे?’ या मनोवृत्तीचे श्रद्धाळू भक्त त्यांना मोठय़ा प्रमाणात लाभले. गुरुबाजी का फोफावते यासंबंधी ‘उदासबोध’ या संग्रहात कवी मंगेश पाडगावकर म्हणतात :
‘प्रत्येकासी येथे हवा । कोणी तरी जबरा बुवा।
जो काढील साऱ्या उवा । मनातल्या चिंतेच्या।।
आपण शोधायचे नाही । आपण लढायचे नाही।
आपण भिडायचे नाही । आयुष्याला।।
येक गुरू फार मोठा । अध्यात्मधंद्या नाही तोटा।
तो आपुल्या धोतरा कासोटा । वज्र्य मानी ।। ’
असल्या आध्यात्मिक गुरूंचे स्तोम आज सर्वत्र माजलेले दिसते. भक्तांची संख्या अमाप आहे. बहुतेक आध्यात्मिक गुरू हे प्रच्छन्न ठकसेन असतात. शिष्यांना फसवून, आपल्या भजनी लावून त्यांचे आíथक शोषण करणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. सत्यसाईबाबा, आसारामबापू, नित्यानंद, निर्मलबाबा, वेंकटसर्वानन अशा अनेक गुरूंची ढोंगे उघड झाली. खरे स्वरूप समजले. तरी अशा ठकसेन गुरूंच्या कच्छपी लागणारे भोळसट भाविक आहेतच. परब्रह्म, परमात्मा, जीवात्मा, पुनर्जन्म, मोक्ष, ब्रह्मलोक असे शब्द कानी पडल्यावर ते श्रद्धाळू भारावून जातात. त्यांना भुरळ पडते. गुरू महान ज्ञानी आहे, असे वाटू लागते. त्याच्यावरील श्रद्धा दृढ होते.
दुसऱ्या प्रकारच्या गुरूंना वाटते, की अध्यात्मशास्त्राचा आपला परिपूर्ण अभ्यास आहे, आपण साक्षात्कारी आहो, आत्मज्ञान प्राप्त झाले आहे, आपल्यापाशी दिव्य अलौकिक शक्ती आहे, भक्ताच्या डोक्यावर हात ठेवून आपण शक्तिपात करू शकतो, ज्ञानसंक्रमण करू शकतो. अशा कल्पनेच्या राज्यात जे वावरतात ते भ्रमसेन गुरू होत. कुणाला फसवण्याचा त्यांचा हेतू नसतो. अशा भ्रमसेन गुरूंत काही जण सज्जन, सदाचारी, सत्पुरुष असू शकतात. मात्र दिव्य ज्ञान, अलौकिक शक्ती कुणापाशी नसते. खरे तर अशा शक्तीला अस्तित्वच नाही. निसर्गनियमांचे अतिक्रमण कोणीही करू शकत नाही.
काही गुरू निष्पाप, अश्राप, निरीच्छ, निर्मोही असतात. त्यांचे भक्त त्यांना विदेही, जीवन्मुक्त, देहातीत, अवलिया, पहुंचा हुवा आदमी असे समजतात. त्यांच्या भजनी लागतात. त्या गुरूंना आपल्या शरीराचे, कपडय़ांचे, खाण्या-पिण्याचे, स्वच्छतेचे भान नसते.. ‘हे इतके लोक माझ्यापुढे असे हात का जोडताहेत? गाणे कसले म्हणताहेत? समोरच्या पेटीत पसे का टाकताहेत?..’ हे त्यांना काही समजत नसते. खरे तर ते मतिमंद असतात. काही धूर्त लोकांनी त्यांना गुरू बनवून मठात बसवलेले असते. हे मूढसेन गुरू होत. अशा या आध्यात्मिक गुरूंच्या तीन तऱ्हा दिसतात.
गुरू ठकसेन असो, भ्रमसेन असो वा मूढसेन असो, प्रत्येकाचा भक्तवृंद असतोच. त्यांत ठकसेन गुरू साधनशुचिता गुंडाळून ठेवून आपल्या धंद्याचे व्यवस्थापन पद्धतशीरपणे करीत असल्याने भाविकांवर त्यांचा प्रभाव अधिक पडतो आणि त्यांना मोठय़ा संख्येने शिष्य लाभतात. सर्व गुरूंचे शिष्य आपली बुद्धी गुरुचरणी वाहतात आणि गुरूंना सर्वभावे शरण जातात. अशा भक्तांविषयी पु. ल. देशपांडे यांनी (एका भाविकाचे पात्र उभे करून त्याच्याकरवी) एक भक्तिगीत लिहिले आहे. अनेकांनी ते वाचले असेल. ते दत्तगुरूंविषयी आहे. तरी सर्वच गुरुभक्तांना आवडावे. त्यातील दोन कडवी –
‘गुरुराज मन्मनीं बसले । हृदयात माझिया ठसले ।
श्वान सुलोचन अहा गोजिरे।
जवळी बसता दिसे साजिरे
झोळीमधला प्रसाद मिळता।
स्वपुच्छ हलवित हसले। गुरुराज मन्मनीं बसले।
त्या श्वानाचा वाटे हेवा। कधी सुखाचा मिळेल ठेवा।
गुरुचरणांच्या ठायीं मजला। सात स्वर्गही दिसले । गुरुराज मन्मनीं बसले। ..’
खरे तर हे सर्व आध्यात्मिक गुरू म्हणजे सामान्य माणसे असतात. त्यांतील कोणापाशी दैवी शक्ती, अलौकिक सामथ्र्य, दिव्य ज्ञान असले काही नसते. गीतेतील श्लोक, धर्मग्रंथांतील वचने, पुराणांतील दाखले, संतसाहित्यातील अभंग, ओव्या यांतील काही गोष्टी हे गुरू (मूढसेन सोडून) तोंडपाठ करतात. बरेचसे वाचलेले, ऐकलेले असते. वक्तृत्व प्रभावी असते.. ‘ब्रह्मस्वरूप गोमातेच्या महन्मंगल मुखातून उद्भुत झालेला पवित्रतम गहनगूढ गायत्री मंत्र सर्वतोभद्र आहे. तो शिवस्वरूप असून धवलवर्णी आहे. त्या महामंत्राच्या जपाचे रहस्य पुरंजनाने रंतिदेवाला कथन केले तेव्हा त्याचा आत्मा देहमुक्त झाला. देवयानमाग्रे ब्रह्मलोकी प्रवेश करून शाश्वत अशा चिदानंदात तरंगू लागला.’ असले गुरुमुखातून येणारे अगम्य बोल ऐकले की श्रद्धाळू भक्त मंत्रमुग्ध होतात. माना डोलावू लागतात. गुरुवचन सत्य मानायचे. त्याची चिकित्सा करायची नाही. ‘कचराकुंडीजवळ असणाऱ्या गाईचे मुख महन्मंगल कसे मानणार?’ अशी शंका विचारायची नाही. भक्तांच्या या श्रद्धाळू वृत्तीमुळे जटाधारी-गोटाधारी, टिळाधारी-माळाधारी, कफनीधारी-लुंगीधारी असे सर्व गुरू इथे प्रभावी ठरतात.
गुरूमुळे भक्तांची आíथक हानी होते. वेळ आणि ऊर्जा यांचा अपव्यय होतो, पण सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे त्यांची बुद्धी पांगळी होते. भक्त आपल्या गुरूला सर्वभावे शरण जातो. गुरूचा शब्द प्रमाण मानतो. गुरू जे सांगेल ते पूर्ण सत्य असणार हे गृहीत धरतो. गुरुवचनांची चिकित्सा करणे, त्यांवर शंका घेणे पाप समजतो. गुरूचे विचार हे आपलेच विचार आहेत असे त्याला वाटते. तो स्वबुद्धीने स्वतंत्रपणे विचार करू शकत नाही. दुसऱ्याच्या आहारी जाऊन त्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे म्हणजे स्वत्व हरवून बसणे. दास्य स्वीकारणे. शरणागती पत्करणे. हा माणूसपणाचा अपमान आहे. पण भक्तांना त्यात धन्यता वाटते. मूढसेन गुरूचे भक्त त्याच्या कृपाकटाक्षासाठी आसुसलेले असतात. गुरूने त्यांच्याकडे पाहिले, आशीर्वाद दिल्यासारखा हात वर केला की भक्ताला धन्य धन्य वाटते. गुरूने कधी थप्पड मारली तर आता आपल्या मोक्षाचा मार्ग मोकळा झाला असे वाटून भक्त कृतार्थ होतो. म्हणजे अशा मतिमंद गुरूपुढे भक्ताची पूर्ण शरणागती असते. गुरुपायाशी बुद्धी गहाण असते.
काळ बदलला.. आता या गुरूंची जीवनपद्धती (लाइफ स्टाइल) खूप बदलली आहे. तरी मूळ मनोवृत्ती तशीच आहे. अशा या गुरूंचे श्रद्धाळू भक्तसुद्धा व्यासपौर्णिमेला गुरुपूजन करतात हे आपल्या समाजाचे दुर्भाग्य होय.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jul 2014 रोजी प्रकाशित
गुरुपौर्णिमेआधीची खबरदारी..
दुसऱ्याच्या आहारी जाऊन त्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे म्हणजे स्वत्व हरवून बसणे. शरणागती पत्करणे. दास्य स्वीकारणे. हा माणूसपणाचा अपमान आहे. परंतु अनेक (तथाकथित) ‘आध्यात्मिक गुरूं’च्या भक्तांना त्यात धन्यता वाटते.
First published on: 09-07-2014 at 03:13 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Precaution before guru purnima