बारा वर्षांपूर्वी सुरूझालेल्या आचार्य अत्रे कट्टय़ाचे रूपांतर आता संस्कृतीच्या महामार्गामध्ये झाले आहे. ठाण्यातील या कट्टय़ाने आता केवळ वेळ घालवण्याचे साधन न बनता येणाऱ्या प्रत्येक कट्टेकऱ्यांना नवी ऊर्मी दिली. येथे येणाऱ्यांना लिखाणाचा व्यासंग लावला, सादरीकरणाचे भान दिले. त्यामुळे हा कट्टा आता संस्कृती, इतिहास आणि नव्या विचारांचा वाहक बनला आहे, असे मत बुधवारी अत्रे कट्टय़ावर उपस्थित लेखकांनी व्यक्त केले.
ठाण्यातील आचार्य अत्रे कट्टय़ाच्या वतीने संकलित करण्यात आलेल्या ‘आमचा कट्टा आमची माणसे’ या पुस्तकाच्या लेखकांचा विशेष मेळावा बुधवारी अत्रे कट्टय़ावर आयोजित करण्यात आला होता. डॉ. अनंत देशमुख, मोहिनी निमकर, माधवी घारपुरे, विजयराज बोधनकर, शरद भाटे, कवी प्रसाद कुलकर्णी, बाळ बेंडखळे, मोहिनी निमकर हे या पुस्तकाचे लेखक या वेळी उपस्थित होते. या वेळी प्रत्येक लेखकाने अत्रे कट्टय़ाविषयीच्या भावना व्यक्त केल्या. अत्रे कट्टय़ाचे १२ वर्ष म्हणजे ४ हजार ३८३ दिवस आणि त्यातील सुमारे ७०० बुधवार हा या कट्टय़ाचा पसारा म्हणजे कुंभमेळ्याप्रमाणे वाढत जाणारा आहे. अत्रे कट्टा हा ज्ञानी लोकांचा कुंभमेळा बनला आहे, असे मत ज्येष्ठ इतिहास व्याख्याते वि. ह. भुमकर यांनी व्यक्त केले.
‘भुयार’ या पुस्तकाचे लेखक आणि भुयारांचा अभ्यास करणारे बाळ बेंडखळे यांनी आपल्यासारख्या जंगलात राहणाऱ्या आणि अंधारावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीस या कट्टेकऱ्यांनी हेरले, यातच या मंडळींचे वेगळेपण असल्याचे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acharya atre katta means the way of culture