बंगळुरूतील एका एटीएममध्ये महिलेवर प्राणघातक हल्ला झाला आणि एटीएमच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईत अद्याप असा निघृण प्रकार घडलेला नाही. मात्र भविष्यात तसे होणारच नाही याची शाश्वती नाही. सीसीटीव्ही बसवून किंवा नि:शस्त्र सुरक्षा रक्षक बसवून बँकांनी आपली जबाबदारी झटकली आहे. कारण एटीएम सेंटर तोडणे, एटीएममध्ये स्कीमर बसवून ग्राहकांच्या कार्डाचे क्लोन करणे, एटीएममध्ये पैसे भरायला आलेली पैशांची गाडी लुटण्यापासून एटीएमच्याच सुरक्षा रक्षकाची हत्या करणे आदी प्रकार मुंबई आणि परिसरात घडत आहेत.
जूनमधील एका घटनेने मोठी खळबळ उडाली होती. एक्सीस बँकेच्या अनेक खातेधारकांना आपल्या खात्यांतून मोठय़ा रकमा काढल्या गेल्याचे मेसेज मोबाईलवर आले. कार्ड तर स्वत:कडे होते, मग रकमा कशा काढल्या गेल्या, असा प्रश्न करत लोकांनी बँकेत धाव घेतली. तेव्हा लक्षात आले की कुणीतरी एटीएम सेंटरमध्ये स्कीमर उपकरण बसवून ग्राहकांच्या एटीएम कार्डाचे क्लोन बनवले होते. त्या क्लोनच्या आधारे दुसरे कार्ड बनवून रकमा काढल्या गेल्या होत्या. विशेष म्हणजे कुलाबा येथील पोलीस मुख्यालयाच्या अगदी बाहेर असलेल्या एक्सिस बँकेच्या एटीएममध्ये हा प्रकार घडला होता. त्यावेळी एटीएमच्या सुरक्षितेचा प्रश्न समोर आला होता. ३७ ग्राहकांचे (त्यात १३ पोलीस कर्मचारी) सुमारे १५ लाख अशा प्रकारे हडप करण्यात आले होते. या प्रकरणातले आरोपी परदेशी नागरिक असून त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. स्कीमर बसवणे अगदी दोन मिनिटांचे काम असून कुठल्याही एटीएम सेंटरमध्ये हा प्रकार होऊ शकतो.
बंगळूरच्या घटनेनंतर शहरातील एटीएम सेंटरच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत आहे. मुंबईतल्या जवळपास प्रत्येक एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी सुरक्षा रक्षक नाही. आम्ही प्रत्येक एटीएम सेंटरमध्ये सुरक्षा रक्षक ठेवा, असे बंधन बँकांवर घातला येत नाही. तो त्यांचा धोरणात्मक निर्णय आहे, असे पोलिसांनी सांगितले.
झोपाळू सुरक्षा रक्षक
मात्र, मध्यंतरी परिमंडळ ५ ने सुरक्षा रक्षक काय करतात त्याचा आढावा घेण्यासाठी एक मोहीम घेतली होती. त्या वेळी बहुतांश सुरक्षा रक्षक रात्री झोपत असल्याचे दिसून आले होते. २९ ऑक्टोबर २०१२ रोजी माहिमच्या मोरी रोड येथील आंध्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. तीन चोर या एटीएममध्ये घुसले तेव्हा एटीएमचा सुरक्षा रक्षक रोहिदास राजपूत हा चक्क झोपेत होता. चोरांनी त्याला मारहाण केली आणि यंत्र फोडायला सुरवात केली. राजपूत जागा असता तर पुढचा अनर्थ टळू शकला असता. झोपाळू सुरक्षा रक्षक आढळल्यास संबंधित सुरक्षा एजन्सी किंवा संस्थेला त्याची लेखी तक्रार करत होतो. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली असे परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. धनंजय कुलकर्र्णी यांनी सांगितले.
सुरक्षा रक्षक नेमलाच तर सशस्त्र पाहिजे. एटीएम बँकाचे सुरक्षा रक्षक प्रशिक्षित नसतात आणि त्यांच्याकडे कोणतेही शस्त्र नसते. १२ जुलै २०१२ रोजी घणसोलीच्या अभ्युदय को ऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम लुटण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनी नि:शस्त्र असलेल्या सूर्यकांत महाडिक या सुरक्षा रक्षकाची हत्या केली होती.
बंगळूरसारखी घटना मुंबईत घडण्याची शक्यता कमी आहे, असे पोलिसांना वाटते. कारण रात्री पोलिसांची गस्त असते. शिवाय कुठलाही प्रसंग आला तर पोलीस रात्री पाच मिनिटांत घटनास्थळी पोहोचू शकतात, असेही कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. अर्थात रात्री उशीरा एटीएममध्ये जाणाऱ्यांनी पुरेशी खबरदारी घेणे गरजेचेच आहे.
असे हे ‘सुरक्षित’ एटीएम
मीरा रोड पूर्वेला रेल्वे स्थानकाच्या उत्तरेला कॅनरा बँक, स्टेट बँक आणि अॅक्सिस बँकेची तीन एटीएम केंदे एकमेकांना लगटून उभी आहेत. या केंद्रात सुरक्षा कशी साधता येणार हा प्रश्नच आहे. बहुतेक वेळा तिन्ही केंद्रांसमोर एकच रक्षक खुर्चीत बसलेला असतो. काही वेळा उन्हामुळे तो समोरच्या दुकानांच्या आडोशालाही उभा राहतो तर काही वेळा पैसे काढणाऱ्या ग्राहकांमागेच उभा राहत एटीएम केंद्रातील एसीची हवा खातो. त्यामुळे आपण काय व्यवहार करतो याचीही त्याला कल्पना येऊ शकते. मात्र अनेकदा केंद्रांमध्ये एसी सुरू नसतो. कधी यंत्र बिघडलेले असते तर कधी यंत्रातील पसे संपलेले असतात. रेल्वेस्थानकाच्या अगदी जवळ असल्याने या केंद्रांवर दिवसा बरीच वर्दळ असते. त्यामुळे मग एसी नसलेल्या केंद्रात दरवाजा उघडा ठेवून पसे काढण्याचीही वेळ येते. या ठिकाणी शेअर रिक्षांची रांग असल्याने काही वेळा या केंद्रांची रिक्षांनी नाकाबंदी केलेली असते. तर रेल्वे िभतीला लागून जात असलेल्या रस्त्यावरील गर्दुल्ले कधीकधी या एटीएम केंद्रांच्या बाजूला घुटमळत असतात.
असुरक्षित एटीएमच्या काही घटना
जून २०१३
कुलाबा येथील एक्सिस बॅंकेच्या एटीएम यंत्रात स्किमर नावाचे उपकरण बसवून एटीएम कार्डाचे क्लोन करण्यात आले आणि नंतर जून महिन्यात परदेशातून ३७ खातेधारकांच्या खात्यातून तब्बल १५ लाख रुपये काढण्यात आले. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार ग्रीस देशातील दोन तरुण असल्याचे सिद्ध झाले. अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नाही.
जुलै १२, २०१२
नवी मुंबईच्या घणसोली येथील अभ्युदय कॉर्पोरेशन बॅंकेचे एटीएम लुटले. हल्लेखोरांनी निशस्त्र सुर्यकांत महाडिक यांची हत्या केली.
१ ऑक्टोबर २०१०
माहिम पश्चिमेच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रा मधील एटीएम सेंटर मध्ये पैसे भरण्यासाठी निघालेल्या . सिक्युरिट्रेन्स इंडिया प्रा लिमिटेड व्हॅनला लेडी जमशेदजी रोड येथे लुटले. तब्बल १९ लाखांची रोकड घेऊन टोळी फरार झाली
८ ऑगस्ट २०१३
खारघर येथे रेडियंट कॅश मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची गाडी एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी निघाली होती. त्यावेळी चोरांनी वाहनचालकाच्या डोळ्याच मिरची पूड टाकून १० लाखांची रोकड पळवली.
सप्टेंबर २०१२
कांदिवली येथे रायटर सेफगार्ड प्रा. लिमिटेड या सुरक्षा एजन्सीच्या वाहन चालक जीतू वाघमारे याने एचडीएफसी बॅंकेत भरण्यासाठी नेत असलेली ३२ लाखांची रोकड पळवली. अद्याप या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
एटीएम सेंटरच्या सुरक्षेचा आम्ही आढावा घेत आहोत. त्यासाठी ‘सिक्युरिटी ऑडिट’ करीत आहोत. बँकांच्या अपेक्षा, मर्यादा तपासून हा अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशींनुसार कार्यवाही करण्यात येईल. दरम्यानच्या काळात एटीएम सुरक्षेसाठी आम्ही पोलिसांची गस्त वाढविली आहे. सर्व पोलीस ठाण्यांनाही याबाबत दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हिमांशू रॉय
संग्रहित लेख, दिनांक 30th Nov 2013 रोजी प्रकाशित
एटीएम.. ऑल टाइम मनस्ताप
बंगळुरूतील एका एटीएममध्ये महिलेवर प्राणघातक हल्ला झाला आणि एटीएमच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 30-11-2013 at 06:37 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atm is not safe