धावपळीच्या जगात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. स्वास्थ्याचे रक्षण हे खऱ्याअर्थाने आयुर्वेदच करते, असे मत महापौर स्मिता खानापुरे यांनी व्यक्त केले.
शहरातील टाऊन हॉलच्या मदानावर आयुर्वेद महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. नगरसेविका डॉ. दीपाली साळुंके, विक्रीकर उपायुक्त डॉ. हरिहर सारंग, उपविभागीय अधिकारी डॉ. प्रताप काळे यांची उपस्थिती होती.
खानापुरे म्हणाल्या, प्राचीन काळापासून आयुर्वेदाला राजाश्रय मिळाल्याने त्याच्या अनेक शाखा झाल्या. आज तसे चित्र दिसून येत नाही. मार्केटिंग संशोधन व विकासात हे शास्त्र कमी पडले आहे. त्यामुळे आयुर्वेदाकडे नागरिकांचा कल कमी राहिला. विदेशात आयुर्वेद चिकित्सेला महत्त्व येऊ लागले आहे. केरळसारख्या ठिकाणी पंचकर्म करण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. या आयुर्वेदाचे संशोधन होण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.
आयुर्वेद हे पारंपरिक शास्त्र असून ते पारंपरिकच राहिले पाहिजे. आयुर्वेद म्हणजे केवळ जडीबुटी नाही. आयुर्वेद हे आयुष्याचे वेध सांगणारे शास्त्र आहे, असे सारंग यांनी सांगितले. आयुर्वेदातील औषध व उपचाराची माहिती देणारे विविध स्टॉल येथे उभे करण्यात आले आहेत. या वेळी तज्ज्ञ नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayurveda for health festival latur