राज्य सरकारचे सन २०१०-११चे निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाले असून जालना जिल्हय़ातील बदनापूर तालुक्यास मराठवाडय़ातील पहिल्या क्रमांकाच्या निर्मलग्राम तालुका पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक येत्या सोमवारी (दि. २६) औरंगाबाद येथे राज्यपालांच्या हस्ते समारंभपूर्वक पुरस्कार स्वीकारणार आहेत. सन २०१०-११मध्ये जालना जिल्हय़ातील ५९ ग्रामपंचायतींनी निर्मलग्राम पुरस्कारासाठी सरकारकडे अर्ज केले होते. पैकी २८ ग्रामपंचायती पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत. जिल्हय़ातील ७८१पैकी ४२३ ग्रामपंचायतींना आतापर्यंत हा पुरस्कार मिळाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आशाताई भुतेकर, मुख्य कार्यकोरी अधिकारी बी. राधाकृष्णन यांनी पुरस्कार मिळविणाऱ्या ग्रामपंचायतींचे अभिनंदन केले.
माहेर भायगाव (तालुका अंबड), ढासला, काजवा, सामगाव, मांजरगाव, रांजणगाव, शेलगाव (तालुका बदनापूर), आडगाव, बाणेगाव, बरंजळा, लोखंडे, दगडवाडी, जवखेडा खुर्द, जवखेडा बुद्रुक, जवखेडा ठोंबरी, वजीर खेडा, वालसा, खासला, लतीफपूर, लिंगेवाडी, नांजा, क्षीरसागर, वाडी बुद्रुक (तालुका भोकरदन), गुरुपिंप्री, मासेगाव, रवना (तालुका घनसावंगी), अकोला देव, खानापूर, निमखेडा बुद्रुक, शिंदी (तालुका जाफराबाद), नांद्रा (तालुका परतूर) या ग्रामपंचायतींना हा पुरस्कार जाहीर झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badnapur shining in nirmal gram