अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीने द्राक्ष उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. त्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र शासनाने द्राक्ष उत्पादकांना सरसकट कर्जमाफी द्यावी, याकरिता निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी बुधवारी मूक मोर्चा काढला. आपल्या मागणीचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी नायब तहसीलदारांना दिले.
निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक या वर्षी अवकाळी पावसाने मेटाकुटीस आले आहेत. गोडय़ाबार छाटणीपासून सुमारे चार-पाच वेळा अवकाळी पाऊस झाला. प्रत्येक अवस्थेत गारपीट, पाऊस, थंडी या नैसर्गिक आपत्तीने डावणी, डकुज, भुरी, मणीगळ या रोगांचा मारा झाला. वाढत्या उत्पादन खर्चामुळे द्राक्ष उत्पादकांना कर्ज, उधार-उसनवाऱ्या फेडणे शक्य नाही. द्राक्ष माल परिपक्व स्थितीत असताना शनिवार ते सोमवापर्यंत झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील बागायतदारांची द्राक्ष शेती उद्ध्वस्त झाली आहे. अशा स्थितीत उत्पादकांना उभे करण्यासाठी शासनाने कर्जमाफी करण्याचा निर्णय घ्यावा आणि बँकांची कर्जवसुली थांबवावी अशी मागणी उत्पादकांनी मोर्चाद्वारे केली.
याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार सोनवणे यांना देण्यात आले. या वेळी द्राक्ष उत्पादक संघर्ष समितीचे नेते छोटुकाका पानगव्हाणे, निफाडचे सरपंच अनिल कुंदे, उपसरपंच दिलीप कापसे आदींसह शेकडो उत्पादक मोर्चात सहभागी झाले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निफाडचे निरीक्षक दिलीप निगोट, लासलगावचे निरीक्षक आर. बी. सानपे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grapes producers morcha for compensation