लातूर जिल्ह्य़ात तीव्र पाणीटंचाई आहे. पिकांची आणेवारी काढण्यात सरकारी यंत्रणेने चूक केली, तसेच लोकप्रतिनिधींनी झोपेचे सोंग घेतल्यामुळेच जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला नसल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली.
मंगळवारी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. नागनाथ निडवदे, माजी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, डॉ. गोपाळराव पाटील, गणेश हाके आदी उपस्थित होते. तावडे म्हणाले की, औसा व निलंगा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना आपण भेटी दिल्या. पाण्याची तीव्र टंचाई तेथे आहे. मात्र, जनतेकडे कोणाचेही लक्ष नाही. दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून लातूर जिल्हा निकषात बसत नसल्याचे अधिकाऱ्यांनी कळवले आहे, त्यामुळे कोणाचेच लक्ष नाही. यंत्रणेने चुकीच्या पद्धतीने पिकाची आणेवारी काढली आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून प्रशासकीय यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी आपण करणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. बुलढाणा, धुळे, जालना आदी जिल्ह्य़ांत आपण जाऊन आलो. तेथील लोकप्रतिनिधी जागरूक असल्याचे चित्र दिसले. मात्र, त्याउलट स्थिती लातूर जिल्ह्य़ात दिसून येते. सुमारे ७५ हजार हेक्टरवरील बागायती पीक धोक्यात आहे. मात्र, याचा साधा पंचनामा केला नाही. राजकीय नेतृत्व गावपातळीवर जात नाही. त्यामुळे नेमक्या समस्या काय, ते सरकारदरबारी पोहोचत नाही. किल्लारी भूकंपाच्या वेळी यंत्रणा कार्यरत होती, तशी या दुष्काळाच्या निमित्ताने होण्याची गरज आहे. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार किल्लारीत ठाण मांडून बसले होते, याची तावडे यांनी आठवण करून दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indifferent public representative and dropfull management thats why neglectness towards latur